Monday, December 23, 2024

असा रविवार, ५२ आठवडे यावा!

शनिवारी रात्री ११ वाजता हॅास्पिटलचे काम संपवून परतलो. थकलो होतो खुप.सकाळच्या सातच्या लोकलची चिंता नव्हती. गाढ झोप लागली.सकाळी ९ वाजता खिडकीत आलेल्या कबूतराच्या आवाजाने झोप मोडली.

डाव्या हाताला ठेवलेल्या बासरीच्या कव्हरने खिडकीला मारले.कबूतराचा आवाज बंद झाला.

आईच्या नऊवारी पातळाची गोधडी डोक्यावर घेऊन परत गाढ झोपलो.वाटले तिच्या कुशीत झोपलो आहे अनेक वर्षांनी!चक्क ११ वाजता उठलो.आंघोळ,पूजा आटोपली.

ओट्सचा नाश्ता, काळी कॅाफी घेऊन तंबोरा लावला आणि रियाज सुरू!

ई स्केलच्या बासरीवर षड्ज, ऋषभ, कोमल गंधार, मध्यम, पंचम, धैवत, कोमल निषाद या स्वरांमध्ये हरवून गेलो. "खेलो श्यामसंग आज होली "ही काफी रागाची बंदिश मस्त जमली. तासभर कुठे गेला कळलेच नाही.

मग स्वतःच भाकरी तयार करायचा प्रयोग केला.बायको भाजी तयार करून मिटींगसाठी गेली होती.जेवण आटोपले आणि मग ओशोचे Empty Boat ऐकत बसलो.मग तासभर काहीच केले नाही.पूर्ण रिकामा, फोन नाही, फेसबुक नाही, WhatsApp नाही.ऑफिसचा फोन नाही,निवांत एकांत!!

ओजस सोबत माऊंट मेरी, मन्नत, बॅंडस्टॅंडवर मनसोक्त फिरून आलो.

संध्याकाळी बायकोसोबत कवि सौमित्रच्या कवितांचा कार्यक्रम ऐकायला गेलो. असा रविवार..वर्षभर ५२ आठवडे यावा!

-राजेश कापसे

९८१९९१५०७०

एक वर्तुळ पुर्ण झाले!

वर्ष २००० मध्ये मी B.A.M.S.चे शिक्षण पूर्ण केले आणि पुढे काय? हा प्रश्न मनात होता. मुळात पर्याय नव्हता म्हणून मी B.A.M.S. शिकलो होतो. १२ वीमधे केमिस्ट्रीमध्ये ५ मार्क कमी मिळाले आणि M.B.B.S. हुकले. अर्थात मार्क चांगले असणे हाच एक पर्याय होता. M.B.B.S. चे शिक्षण विकत घेण्यासाठी पैसेही नव्हते. शेवटी B.A.M.S. चा पर्याय स्वीकारला.

B.A.M.S.संपल्यानंतर मनात विचार आला, जरा वेगळे काही करावे, शिकावे,मग कुणीतरी T.I.S.S.मधून Masters in Hospital Administration बद्दल सुचवले.मी तिथे गेलो.वाटले द्यावी प्रवेश परीक्षा आणि घ्यावा प्रवेश. शक्य होतं ते, पण,थांबलो क्षणभर आणि विचार केला, “बहिणींना आणि आईला किती त्रास द्यायचा.दिला तेवढा आर्थिक ताण खुप झाला,स्वत:च्या पायावर उभे रहायला हवे.” सरळ औरंगाबाद गाठले आणि जवळच्या चितेगावला प्रॅक्टीस सुरू केली.आधी M.B.B.S. आणि मग T.I.S.S चे Masters in Hospital Administration नाही जमले.पैसे मिळायचे पण चितेगावच्या प्रॅक्टीसमध्ये मन रमेना.वेगळे काहीतरी करायचे होते.मग सरळ डॅा. हेडगेवार रूग्णालयात नोकरी करायला सुरवात केली. मेडिसीन विभागात केलेले काम, मग सेवावस्ती प्रकल्पातील काम,HIV-AIDS प्रकल्पातील काम सुंदर दिवस होते ते!

Health Management आवडायला लागले आणि मुंबईत Avert Society मध्ये नोकरी पकडली. वेश्या, हिजडे, कैदी, समलिंगी व्यक्ती एक ना अनेक समाजघटकांत काम करायची संधी मिळाली.शेवटी तिथे मन रमेना.मग Sightsavers मध्ये नोकरी मिळाली आणि सार्वजनिक नेत्र आरोग्य या विषयावर काम करायची संधी मिळाली. जगभर फिरलो. लंडनला London School of Hygiene and Tropical Medicine या संस्थेत M.Sc.करायला गेलो.परत आल्यानंतर नायजेरियात जाऊन आलो आणि मग Hospital Management मध्ये रस निर्माण झाला आणि एच.व्ही.देसाई आय हॅास्पिटल आणि आता शंकरा आय हॅास्पिटलमध्ये हॅास्पिटल मॅनेजमेंटमध्ये काम करतोय. B.A.M.S. संपल्यानंतर सरळ T.I.S.S. मधून Masters in Hospital Administration केले असते तर सरळ कुठल्यातरी हॅास्पिटलमध्ये नोकरी मिळाली असती.पण हा सुंदर प्रवास झाला नसता. या प्रवासात किती माणसं भेटली. झोपडपट्ट्या ते वेश्या वस्त्यांपर्यंतचे अनेक विषय कळले.खरेतर समृध्द झालो.

T.I.S.S.मधील Masters in Hospital Administration च्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी शंकरा आय हॅास्पिटलने मला पाठवले होते.त्या सुंदर झाडांमध्ये असलेल्या T.I.S.S.च्या कॅम्पसमध्ये माझा २३ वर्षांच्या भूतकाळात रमून गेलो. एक वर्तुळ पुर्ण झाले!

-राजेश कापसे, ९८१९९१५०७०

संगीत आपल्याला वर्तमानात आणते!

मला अनेक वेळा प्रश्न पडायचा, आपण गाणे का ऐकतो? गाणे भान हरपून ऐकतो. नेमकं काय असतं त्यात भान हरपण्यासारखं? जेव्हा बासरी शिकायला लागलो तेव्हा त्याचा उलगडा झाला. माझ्या मनात दिवसभरात झालेल्या घटनांबद्दलचे, कधीकाळी झालेल्या अपमानाचे तर कधी मिळालेल्या पुरस्काराचे आणि कौतुकाचे विचार घोंगावत असतात. एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला बघितले की लगेच मन दूर भविष्यात घेऊन जाते. ही विचारांची भूत आणि भविष्यकाळातील ये जा कायमची सुरु असते. त्यात आनंद, दुःख, ताण-तणाव, उदासीनता अशा अनेक गोष्टी असतात आणि या विचारांचा अतिरेक झाला की आपण अस्वस्थ होतो.

या विचारांच्या धावपळीत मात्र आपण वर्तमानात खूपच कमी वेळ असतो.आपले मन कधी भविष्यात तर कधी भूतकाळात, कधी कुणाबद्दल द्वेष तर कुणाबद्दल प्रेम यात असते.भानावर येणे जमतच नाही, ते कायम पुढे मागे असते. ते कधी हरवतही नाही. शांत झोप लागल्यानंतर जरा विश्रांती मिळते पण जागेपणी मात्र मनाचे उपदव्याप सुरूच असतात. याबद्दल खूप वेळा विचार केला पण उत्तर कधी मिळाले नाही.

एकदिवस बासरी वाजवताना मला षड्ज वाजवता येत नव्हता. गुरुजी म्हणाले, डॉक्टर षड्ज नीट लागायला हवा असेल तर तुम्ही इथे शरीराने आणि मनाने उपस्थित असायला पाहिजे. मी त्यावेळी हॉस्पिटलच्याच विचारात होतो. माझा फोन कधी वाजेल आणि कधी हॉस्पिटलला जावे लागेल हाच विचार मनात होता. जेंव्हा त्यातून स्वतःला सावरले, फोन बंद केला आणि तंबोऱ्यासोबत षड्ज लावला आणि तो लागला तेव्हा मी फक्त तिथे त्या स्वरासोबत होतो.भान हरपून...वर्तमानात! गाणं आपल्याला रिलॅक्स करत, कारण त्यात आपण आपल्याला विसरतो आणि केवळ वर्तमानात असतो त्या गाण्यासोबत, त्या स्वरांसोबत!

-राजेश कापसे

९८१९९१५०७०

आयुष्यातील शेवटच्या क्षणांमध्ये साथ देणारी : पॅलिएटिव्ह केयर     

काही दिवसांपूर्वी सिप्ला फाउंडेशनच्या कार्यालयात काही कामानिमित्त गेलो होतो. तिथे पॅलिएटिव्ह केयर बद्दल एक पत्रक वाचले. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात कॅन्सर (३४%), दमा-श्वसनाचे विकार असलेले रुग्ण (१०.%), हृदय रोग (३८.५%), एड्स (५.%), मधुमेह (४.६%) अश्या आजारांनी पीडित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक शारीरिक आणि मानसिकरित्या त्रासलेले असतात. रुग्णाला मरण यातना सहन होत नाहीत आणि नातलगांना त्या बघवत नाहीत. अशा परिस्थितीत गरज असते पॅलिएटिव्ह केयरची म्हणजेच वेदना कमी करण्यासाठी लागणारी औषधे वेळेत दिली जाणे आणि नातलगांना मानसिक आधार देणे, त्यांचे समुपदेशन करणे महत्वाचे असते.

    प्रामुख्याने तीव्र वेदना आणि श्वासोश्वासाला त्रास होणे या दोन गोष्टींचा सामना हे रुग्ण करत असतात. त्यांना गरज असते वेदनाशामक औषधांची आणि योग्य प्रमाणात प्राणवायू देण्याची. हे उपचार वेळेत दिले गेले तर मरण यातना काही प्रमाणात कमी होऊन मृत्यू तरी सुखद होतो. आपला आजार बरा होणार नाही हे सत्य रुग्णांनी स्वीकारलेले असते. कधीतरी प्राणज्योत मालवणार आहे हे सुद्धा मनाने स्वीकारलेले असते पण मरण यातना असह्य झालेल्या असतात. कधी एकदाचा मुक्त होतो अशी अवस्था अनेक रुग्णांची असते. मृत्यूने हे सर्व प्रश्न सुटणारे असतात पण त्याबाबतची अनिश्चितता आणि वेदना असह्य अशा असतात. किमोथेरपी घेऊनही बरा न होणार कॅन्सर, असह्य वेदना, एखादी बरी न होणारी जखम आयुष्य नकोनकोसे करून टाकते. दमा-श्वसनाच्या विकाराने खोकून खोकून रुग्ण हैराण होतात. श्वास घेताना होणार त्रास असह्य झालेला असतो. तीच अवस्था असते एड्सच्या शेवटच्या अवस्थेतील रुग्णांची, खंगलेले शरीर, विविध आजारांमुळे आणि वेदनांनी अत्यवस्थ झालेले रुग्ण आणि त्याहूनही त्रासलेले नातलग बघितले की मृत्यू किती वेदनादाई असू शकतो याची कल्पनाही करवत नाही.

    सिप्ला फाउंडेशनतर्फे अशा रुग्णांना वेळेत मदत केली जाते. योग्य ती वेदनाशामक औषधे, ऑक्सिजन, दमा काही करण्यासाठीची औषधे दिली जातात. तसेच रुग्ण आणि नातलगांना मानसिक आधार देण्याचे काम ही संस्था करते. शेवटच्या या वेदनादायी क्षणांमध्ये साथ देण्यासाठी त्यांनी 'साथ साथ' ही हेल्पलाईन सुरु केली आहे. ज्यांना मदतीची आवश्यकता आहे असे रुग्ण किंवा त्यांचे नातलग 1800-202-7777 या क्रमांकावर संपर्क करून योग्य ती मदत मिळवू शकतात. शेवटच्या वेदनादायी क्षणांमध्ये साथ देणाऱ्या सिप्ला फौंडेशनला सलाम!

Sunday, December 22, 2024

आर्थिक नियोजनाची बाराखडी गिरवताना!

माझ्या मोठ्या मुलाने मला एकदा प्रश्न विचारला “डॅड, तू कधी ब्रोक झाला आहेस का?” मी विचारले “मला कळले नाही. ब्रोक होणे म्हणजे नेमके काय असते?” तो म्हणाला, “अरे सगळे पैसे खतम…सगळे काही गहाण ठेवून बरबाद होणे म्हणजे ब्रोक होणे..” मी म्हणालो, “नाही अरे तसे नाही झाले कधी.. मी आर्थिक नियोजन व्यवस्थित केले आहे…आणि करतो आहे.” मला २५ वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. माझे मामा श्री मधुकर कुलकर्णी यांनी मला आर्थिक नियोजन कसे करायचे ते शिकविले.

माझं बी.ए.एम.एस.चे शिक्षण पूर्ण झाले आणि मी संभाजीनगर येथील चितेगावला माझी प्रॅक्टिस करायचे ठरवले. प्रॅक्टिस सुरु करण्यापूर्वी माझे मामा श्री मधुकर कुलकर्णी यांनी एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, "हे बघ, आता तू व्यावहारिक जीवन जगायला सुरुवात करत आहेस. तुझ्या खिशात सदैव ५०० रुपयांची नोट असली पाहिजे. खर्च झाले की लगेच ते ५०० रुपये परत पाकीटात जमा झाले पाहिजेत. तो बेसिक बॅलेन्स तुझ्या पाकीटात असणे गरजेचे आहे." २००१ मध्ये रुपये ५०० ही रक्कम मोठी होती. मी त्यांचा सल्ला ऐकला आणि तेवढे पैसे माझ्याजवळ ठेवायला सुरुवात केली.नंतर जशी मिळकत वाढली तशी पाकिटातील बॅलेन्स रक्कमही मी वाढवत गेलो. मी कधीच गरजा वाढवल्या नाहीत आणि कधी माझ्या पाकीटातील रक्कमही कमी होऊ दिली नाही. या मोलाच्या आर्थिक नियोजनाच्या सल्ल्यामुळे आजतागायत असंख्य फायदे झाले आहेत.

नंतर लग्न ठरले.त्याआधी स्वतःचे घर असले पाहिजे असा आग्रह सुरु झाला. मला पगार कमी होता.त्यामुळे गृह कर्ज मिळणे शक्य नव्हते. मग माझी मोठी बहीण सौ.ज्योती व भाऊजी श्री गोविंद पाटील यांनी मला त्यांच्या नावावर कर्ज मिळवून दिले आणि मी घर घेतले. दोन लाख रुपये कर्ज घेतले. घर झाले, पण लग्नासाठी जेंव्हा आम्ही चर्चेला बसलो आणि खर्च काढला तेव्हा एक दिवसाच्या या लग्न नावाच्या इव्हेंटचा खर्च होता अडीच लाख रुपये. मी, माझ्या आणि बायकोच्या घरच्यांना सांगायचा प्रयत्न केला, "अहो हा खर्च करण्यापेक्षा मी माझ्या घराचे कर्ज फेडतो आणि लग्न साधे करू." पण कुणीच ऐकले नाही. वर आणि वधु पक्षांनी ५०:५० टक्के असे पैसे खर्च करून हा आमचा लग्न नावाचा एक दिवसाचा इव्हेंट पार पडला. नंतर मी पुढील दहा वर्ष माझ्या घराचे कर्ज व्याजासहीत फेडत राहिलो. योग्य निर्णय घेतला असता तर कदाचित पुढील अनेक वर्ष कर्ज फेडत बसावे लागले नसते

घराचे कर्ज, कमी पगार, घराचा खर्च हे सगळे गणित मी एका डायरीवर महिन्याच्या सुरुवातीला लिहीत असे. माझ्या खिशातील बॅलन्स कसा सुरक्षित ठेवायचा त्याचा विचार मनात असायचा. ताळमेळ चुकत होता. मी जास्त पगाराची नोकरी शोधायला सुरुवात केली. ती मिळालीही पण हे लक्षात आले की जिथे जास्त पैसा असतो तिथे समाधान नसते आणि जिथे समाधान असते तिथे पैसा फारसा नसतो! एक दिवसाच्या लग्न नावाच्या इव्हेंटसाठी मी पैसे नावाच्या रॅट रेस मध्ये अडकलो तो कायमचा! पैसे नसताना कर्ज घेऊन घर घेणे, पैसे नसताना एक दिवसाच्या इव्हेंटवर अमाप खर्च करणे हे गरजेचे असते का? पैसे असतील तर ठीक आहे पण नसताना? युधिष्ठिराला यक्षाने जे प्रश्न विचारले होते त्यापैकी एक प्रश्न होता, "जगात दुःखी कोण असतो?" त्यावर त्याचे उत्तर होते, "ज्या व्यक्तीवर कर्ज असते तो!" हा यक्ष प्रश्न आणि युधिष्ठिराचे उत्तर मला सदैव विचार करायला प्रवृत्त करते.

पुढे मला जास्त पगाराची नोकरी मिळाली आणि त्यासोबत त्या नोकरीच्या चिंताही पॅकेज मध्ये मिळाल्या. मी मुंबई नावाच्या महानगरीत कल्याण ते मालाड लोकल ट्रेनने प्रवास करणारा चाकरमानी झालो. पैसे जास्त मिळायचे पण खर्च आणि ताणतणावही वाढले. माझ्या पाकीटातील ५०० रुपयाचा बॅलन्स बिघडलेलाच होता. माझा एक गुजराथी मित्र विपुल ज्याच्याकडे कधीच वानवा नसे. त्याला मी गमतीने विपुल कॉ-ऑप बँक म्हणत असे, तो मला जेव्हा लागतील तेव्हा पैसे द्यायचा. एकदा मी त्याला विचारले, "विपुल मला पैसे कधीच पुरत नाहीत. तुझ्याकडे मात्र पैसे सदैव असतात. मला जरा आर्थिक नियोजन शिकव ना." त्याने मला मोलाचा सल्ला दिला, "हे बघ, आपली कमाई आपल्यालाच माहीत असली पाहिजे. लोकांना सांगितली की गणित बिघडते. आपण बडेजावात जातो आणि हॉटेल, पार्टी, घरच्यांच्या दागिन्यांच्या अपेक्षा एक ना अनेक या नको त्या वस्तूंमध्ये रुपया खर्च करतो. आपण जेवढे पैसे कमावतो त्यापेक्षा किमान ३०% कमी पैसे मिळतात असे समजून राहिलेले पैसे बचत करायचे आणि घरच्यांना सांगतानाही मिळणारा पगार ३०% कमी सांगायचा. मग आर्थिक गणित नीट बसते." आर्थिक नियोजनाचा हा कानमंत्र मला सदैव मदत करत आला आहे.

कल्याणला असताना मी व माझ्या पत्नीने संभाजीनगरच्या घराचे कर्ज फेडले. आम्ही कल्याणला भाड्याच्या घरात राहत होतो. संभाजीनगरच्या घराचे भाडे येत होते.कर्ज नव्हते.आता जरा बरे दिवस आले होते. मग घरातील सर्वानी आग्रह सुरु केला, "मुंबईत घर पाहिजे. नाहीतर काही खरे नाही. किती दिवस भाड्याच्या घरात राहणार." आम्ही परत दबावाला बळी पडलो.कर्ज-हप्ता-पगार-हातउसने या दुष्ट चक्रात अडकलो आणि 'स्वतःचे घर' या भ्रामक कल्पनेसाठी पुढील 20 वर्षांसाठी बँकेचा गुलाम झालो. बचत शून्य, कर्ज मोठे, हप्ता मोठा, हातउसने घेतलेल्यांचा हप्ता मोठा.. या चक्रव्यूहात आम्ही अडकलो. घरी वास्तूशांती झाली. सर्वांनी मुंबईत घर झाले म्हणून कौतुक केले.हॉल मोठा आहे हां, बेडरूम गार्डन फेसिंग आहे असे बरेच काही ऐकवले. आम्हाला मात्र कर्जाचा डोंगर कसा फेडायचा हा यक्ष प्रश्न भेडसावत होता. माझ्या पाकीटातील रुपये ५०० चे बॅलन्स परत बिघडत होते. मग परत त्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी हाच पर्याय होता. त्या नोकरीतील पॅकेजसोबत येणारे ताणतणावाचे पॅकेजही सोबत होतेच! मला नशिबाने जास्त पगाराची नोकरी मिळाली व बायकोनेही नोकरी करायला सुरुवात केली, पण जगण्यासाठी वेळ मात्र मिळत नव्हता. विपुल एक दिवस म्हणाला, 'राजेश सगळ्यात महाग कोणती वस्तू असेल तर ती वेळ आहे. ती परत कधीच येत नाही. विचार कर." गुजराथी मित्रांचा वस्तू हा शब्द मला खूप आवडतो. विपुलने वेळ या वस्तूबद्दल मला विचारात टाकले. नऊ तासाची नोकरी, पाच तास प्रवास, मग घरातील कामे यानंतर स्वतःसाठी आणि घरासाठी वेळ तसा कधीच मिळत नव्हता!

याच दरम्यान माझी ओळख लोकसत्तामध्ये अर्थविषयक लेख लिहिणारे श्री वसंत कुलकर्णी यांच्यासोबत झाली. त्यांनी मला काही मोलाचे सल्ले दिले आणि मी ते अंमलात आणले. ते म्हणाले प्रथम कर्ज आहे हे वास्तव स्वीकार, ज्या गुंतवणुकीसोबत इन्शुरन्स आहे अशी गुंतवणूक बंद कर. चांगला हेल्थ इन्शुरन्स घे. चुकून काही बरे वाईट झाले तर आपल्यानंतर कुटुंबाला मदत व्हावी व कर्जाचा डोंगर त्यांच्यावर पडू नये म्हणून एक करोड रुपयांचा टर्म इन्शुरन्स घे आणि जर चुकून अपघात झाला व अपंगत्व आले तर ते कव्हर होण्यासाठी अपंगत्व विमा काढ तो खूप स्वस्त असतो. त्याचबरोबर त्यांनी अजून दोन महत्वाचे सल्ले दिले. न चुकता म्युच्युअल फंड मध्ये थोडी थोडीशी गुंतवणूक कर आणि मुलांची वार्षिक फी, गाडीचा विमा, आरोग्य विमा, कौटुंबिक सहल, वार्षिक सण यासाठी प्रत्येक महिन्यात एक ठराविक रक्कम जमा कर ज्यामुळे कुणाकडून कर्ज घ्यावे लागणार नाही. मी त्यांचे हे सर्व सल्ले काटेकोरपणे पाळले आणि त्याचा परिणाम असा झाला की मला कधीच कुणाकडून हातउसने घ्यावे लागले नाहीत. मुलांच्या शाळेच्या फी किंवा गाडीचा वार्षिक विमा, कर्जाचा हप्ता कधी चुकला नाही. काही वर्षातच कर्जही आटोक्यात येऊ लागले. तीन चार मोठी आजारपणे होऊन गेली पण आरोग्य विमा असल्यामुळे त्याचा आर्थिक फटका कधी बसला नाही. माझे व्यक्तिगत अर्थव्यवस्थेचे आरोग्य आजपर्यंत उत्तम राहिले आहे,आणि हो, माझ्या खिशातील ५०० रुपयांची नोटही अबाधित आहे! श्री मधुकर कुलकर्णी, डॉ. विपुल कक्कड, श्री वसंत कुळकर्णी ह्या माझ्या अर्थकारणातील गुरुंमुळे माझे आर्थिक व्यवस्थापन उत्तम झाले आहे.

हळुवार मनाचा बॉस श्रीनिवास !

एव्हर्ट सोसायटीमध्ये आणि HIV-एड्स या विषयावर काम करण्याचा खूप कंटाळा आला होता. अनेक वर्षांपासून मी HIV-एड्स या विषयावर काम करत होतो. दुसरे म्हणजे मुंबईतील नवीन ठिकाणी काम करणे मला कठीण वाटत होते. मुंबईत स्थलांतरित होण्याचा निर्णय, घराची संपूर्ण जबाबदारी आणि नवीन नोकरीतील अडचणी अश्या अनिश्चित वातावरणात मी मुंबईत नवीन नोकरी शोधायला सुरुवात केली. माझ्यासोबत काम करणारे श्री खाडिलकर सर मला म्हणाले, "डॉक्टर खूप अस्वस्थ दिसताय. नवीन नोकरी शोधताय असे कळले. एक काम करा,' साइटसेव्हर्स ' या संस्थेमध्ये प्रोग्राम ऑफिसर या पदासाठी जागा निघाली आहे. बघा अर्ज करून.मी अर्ज केला आणि मला मुलाखतीला बोलावण्यात आले. त्यावेळी मी काही कामासाठी दिल्लीत गेलो होतो.

मला फोन आला, "मी श्रीनिवास सावंत बोलतोय, साइटसेव्हर्स मधून. तुमची मुलाखत (इंटरव्ह्यू)आहे १५ तारखेला." मी एकदम आनंदी झालो. समोरचा आवाजही आश्वासक होता. मी मुंबईत परतलो आणि मालाडला साइटसेव्हर्सच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे माझी प्रोग्राम ऑफिसर या पदासाठी मुलाखत घेण्यात आली.आधी ग्रुप डिस्कशन मग प्रेझेंटेशन नंतर मुलाखत असा क्रम होता. मुलाखतीसाठी सात आठजण आले होते. अगदी फर्डे इंग्लिश बोलणारे. त्यांच्यापुढे माझा निभाव लागेल की नाही अशी शं का मनात होती. पण आश्चर्य म्हणजे माझे प्रेझेंटेशन सर्वांपेक्षा चांगले झाले. मुलाखतही उत्तम झाली. एक आठवड्यानंतर मला एच.आर.मॅनेजर ऍंथोनी यांचा फोन आला, 'अहो तुमची निवड झाली आहे पण तुमचा बायोडाटा जरा व्यवस्थित लिहा. जे काम आत्तापर्यंत केले आहे ते नीट येऊ द्या त्यात." मी श्रीनिवास सावंतांना भेटलो. ते म्हणाले, 'अरे काय राजेश, एवढा चांगला इंटरव्ह्यू दिलास, तुझा बायोडेटा असा कसा लिहिला आहेस. चल मी तुला सांगतो तसे बदल कर आणि तो परत पाठव.' श्रीनिवास यांनी मला मार्गदर्शन केले आणि माझ्याकडून उत्तम बायोडाटा लिहून घेतला. मला प्रश्न पडला, 'का मदत केली असेल यांनी मला?" माझ्यासारख्या अनोळखी माणसाला का कोण मदत करेल? हा माणूस वेगळा आहे." साधारणतः एक आठवड्यानंतर मला श्रीनिवास यांचा फोन आला, ' राजेश, अभिनंदन तुझी निवड झाली आहे. २ मे रोजी कामावर रुजू हो. मिळून काम करू." या माणसाचे आभार कसे मानू ? माझ्याकडे शब्द नव्हते!

कामावर रुजू झालो आणि सार्वजनिक नेत्र आरोग्य या विषयात काम कसे करायचे, प्रोजेक्ट प्रपोजल कसे लिहायचे, नवीन पार्टनर संस्थांचे परीक्षण कसे करायचे अशा अनेक गोष्टी श्रीनिवास यांनी मला शिकवल्या. मग आम्ही सोबत प्रवास केला आणि अनेक संस्थांना भेटी दिल्या. प्रवास करताना सामाजिक काम कसे करायचे याचे प्रशिक्षण मला श्रीनिवास यांच्याकडून मिळाले. हा माणूस हाडाचा समाजसेवक असल्याची जाणीव मला झाली. साधारणतः तीन महिन्यानंतर श्रीनिवास यांनी मला भेटायला बोलावले आणि म्हणाले, 'हे बघ, तुझे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तुला मी आय हॉस्पिटलचे सर्व प्रकल्प सोपवतो. योग्य नियोजन कर आणि कामाला सुरुवात कर. ऑल द बेस्ट!" काम करतांना त्यांनी कधीच बॉसगिरी केली नाही की अनावश्यक सूचना केल्या नाहीत. पूर्ण विश्वास टाकून, मला काम करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ते माझे एक उत्तम मित्र झाले,बॉस नाही! त्यांच्यासोबत बोलतांना कधी भीती वाटली नाही. त्यांना भेटल्यानंतर एक वेगळा आत्मविश्वास निर्माण व्हायचा.

त्यांनी आमची एक सुंदर टीम तयार केली होती. श्रीनिवास, मी, सबित्रा, कल्पना, केतन, श्वेता असे आम्ही सर्वजण मिळून अंधत्व निवारण, अपंगांचे पुनर्वसन अशा विविध विषयांवर चर्चा करत असू व त्यातून त्या विषयावर प्रकल्प तयार करून आम्ही ते यशस्वीपणे राबवत असू. आमच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौ एलिझाबेथ कुरियन यांच्या मार्गदर्शनाने व श्रीनिवासजींच्या प्रयत्नाने आम्ही अंधत्व निवारणासाठी विदर्भात मोठे प्रकल्प सुरू केले, रेटीनोपथी ॲाफ प्रिमॅच्युरिटी या नवजात बालकांमघ्ये अंधत्व निर्माण करण्याऱ्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही पश्चिम महाराष्ट्रात मोठा प्रकल्प राबवला आणि आजही तो सुरू आहे.

दादर ते मालाड आम्ही सोबत प्रवास करत असू. या दरम्यान अनेक विषयांवर चर्चा होत असत. मी एकदा त्यांना म्हणालो, "श्रीनिवास, मला लंडन स्कूल ऑफ हायजिन मध्ये M.Sc.करायचे आहे." ते म्हणाले, 'तुझी इच्छा आहे ना, मग ते नक्की होईल. पुढील दोन वर्षे मला व्यवस्थित काम करून दाखव. मी तुला मदत करीन." पुढील दोन वर्षे मी अनेक प्रकल्प सुरु केले आणि मन लावून काम केले. आणि त्यांना म्हणालो, 'श्रीनिवास , दोन वर्ष झाली आहेत आणि मी माझ्या परीने कामही केले आहे. आजही माझी M.Sc. करण्याची इच्छा आहे.' ते शब्दाचे पक्के होते. त्यांनी माझी ओळख लंडन स्कूल ऑफ हायजिन मधील प्रोफेसर डॉ.क्लेयर गिल्बर्ट यांच्याशी करून दिली आणि मला त्यांच्यासोबत प्रकल्प दाखवण्यासाठी पुण्याला पाठवले. लहान मुलांमधील रेटिनोपथी या विषयावर त्या संशोधन करत होत्या आणि माझा प्रकल्प त्यांना नक्की आवडेल हे श्रीनिवास यांना माहीत होते. पुण्याला जाताना ते म्हणाले, 'राजेश , प्रकल्प दाखवल्यानंतर त्यांना तुझ्या M.Sc.बद्दल नक्की सांग. त्या मदत करतील तुला." मी त्यांनी जसे सांगितले तसे केले आणि आश्चर्य म्हणजे डॉ.क्लेयर गिल्बर्ट यांनी मला लंडन स्कूल ऑफ हायजिन मध्ये M.Sc.करता येईल व त्यासाठी त्या नक्की मदत करतील असे आश्वासन दिले. माझा माझ्यावर विश्वासच बसत नव्हता. नंतर एका महिन्यातच मला प्रवेश मिळाला आणि शिष्यवृत्ती सुद्धा! साइटसेव्हर्सने मला एक वर्षाची रजा द्यावी यासाठी श्रीनिवास यांनी खूप प्रयत्न केले आणि मी लंडनला जायला निघालो. माझे अनेक वर्षांचे अशक्य असे स्वप्न श्रीनिवास यांच्यामुळे प्रत्यक्षात आले! त्यांचे आभार मानायला गेलो. म्हणाले, 'अभिनंदन! मी काहीच केले नाही. तुझ्या नशिबात होते ते आणि you deserve it! आता चांगल्या मार्कांनी पास हो.!" हा भला माणूस आयुष्यात आला नसता तर लंडनमधील M.Sc.हे फक्त स्वप्नच राहिले असते!

मी लंडनहून परत आलो आणि पुढील काही दिवसातच माझे प्रोग्राम मॅनेजर म्हणून प्रमोशन झाले. आत्तापर्यंत स्वतः काम करत होतो. या प्रमोशननंतर मला इतरांकडून काम करून घ्यायचे होते. ते अधिक कठीण होते. माझ्या कामाचा आवाका वाढवणे गरजेचे होते. त्यासाठी श्रीनिवास यांनी मला मार्गदर्शन केले आणि मॅनेजर म्हणून घडवले. मुंबई आय केयर कॅम्पेनचे काम खूप कठीण होते. लंडन येथील ऑफिसबरोबर जवळून काम करावे लागे. मी ते आत्मविश्वासाने करत असल्याचे पाहून श्रीनिवास म्हणाले, 'राजेश प्रोग्रॅम मॅनेजर म्हणून चांगले काम करत आहेस. लवकर शिकलास. हे असेच उत्तम करत राहा." त्यांच्याकडून मिळालेली ही कौतुकाची थाप मला खूप काही देऊन गेली. साईटसेव्हर्स मधील नोकरी, मग प्रशिक्षण, लंडन मधील शिक्षण आणि नंतर प्रमोशन हे केवळ शक्य झाले श्रीनिवास यांच्या परीस स्पर्शानेच!!

आज साईटसेव्हर्स सोडून ११ वर्ष झाली आहेत तरी पण आमची मैत्री कायम आहे!

राजेश कापसे,

९८१९९१५०७०

Thursday, December 19, 2024

सर्दी, आयुर्वेद आणि मी!

ऋतू बदलला की सर्दी, शिंका, ताप, खोकला, दम लागणे,मग सीट्रीझीन, पॅरासिटेमॅाल, अँटीबायोटीक, नेब्युलायझेशन, स्टीरॅाईडचा अस्थमासाठीचा पंप असा साधारणत: अनेक वर्षांपासूनचा हा माझा आरोग्यक्रम. अगदी वर्षातून किमान चार वेळा नक्कीच असतो.मग काही दिवस रजा, कामावर रूजू झाल्यानंतर अस्वस्थ करणाऱ्या शिंका हे नेहमीचेच असते.

आयुर्वेदाचे शिक्षण घेऊनसुध्दा मी कधी आयुर्वेदिक पध्दतीने या माझ्या आजारावर उपाय केले नाहीत. कारणे खुप होती.वेळ जास्त लागेल, कामावर लवकर रूजू होता येणार नाही, खर्च अधिक होईल,बरा होईन की नाही याबद्दलही मनात शंका असे.

यावेळी वसंत सुरू झाला आणि अगदी ठरल्याप्रमाणे मला सर्दी झाली. हे मला नवीन नव्हते. पण यावेळी मी सीट्रीझीन, अँटीबायोटीक, पॅरासिटेमॅाल किंवा स्टेरॅाईड स्प्रे घ्यायचे नाहीत आणि केवळ आयुर्वेदातील सिध्दांतानुसार स्वत:वर उपचार करायचे ठरवले.

शिंका, नाकातून शेंबूड हे सुरू झाले. मी मीठ, हळद आणि कोमट पाणी वापरून दिवसातून दोन वेळा जलनेती करायला सुरुवात केली. यामुळे सायनस व नाकातील सर्व कफ निघून जाई आणि नाक स्वच्छ होत असे. कोणताही बाम किंवा तत्सम नाक मोकळे करणाऱ्या औषधांचाही वापर टाळला ( हे बामवाले स्वतःला आयुर्वेदिक म्हणत असले तरी असा कोणताही संदर्भ आयुर्वेद ग्रंथात नाही. किमान सर्दी झाल्यानंतर बाम लावा असे मी तरी कधीच वाचलेले नाही!) जलनेतीमुळे नाक चोंदणे हा प्रकारही घडला नाही. घसाही स्वच्छ होत असे.

मी दुसरा उपाय केला तो म्हणजे एक दिवस संपूर्ण विश्रांती घ्यायचे ठरवले. फोन नाही, लॅपटॅापवरील काम नाही, प्रवास नाही, मिटींग नाही इ.

तिसरा उपाय म्हणजे लंघनाचा. मी चोवीस तास काहीही खाल्ले नाही. प्रतिःश्याय बरा करण्यासाठी लंघनाचा उपाय आयुर्वेदात सांगितला आहे. लंघना दरम्यान मी गरम पाणी प्यायलो.

याचा परिणाम असा झाला की, मी तिसऱ्या दिवशी ६०% बरा झालो, चवथ्या दिवशी पुर्णपणे बरा झालो आणि पाचव्या दिवसापासून आवाजही पूर्वीसारखा झाला.

एकही पैसा न खर्च करता आयुर्वेदातील सिध्दांत वापरून मी केवळ पाच दिवसांत पूर्ण बरा झालो. Miracle of Ayurveda!

(सूचना : असा प्रयोग केवळ तज्ञ वैद्य अथवा डॅाक्टरच्या सल्ल्यानेच करावा.)

Monday, December 9, 2024

माझे वजनाचे प्रयोग

    वर्ष २००२ पर्यंत (वय २६ वर्ष) माझे वजन ७६ किलो ते ८० किलो या दरम्यान असायचे. माझ्या १७४ से. मी. उंची साठी ते तसे योग्य होते.कारण पोट कधी दिसायचे नाही. २००३ मध्ये लग्न झाले आणि नंतर वजन वाढीने मात्र वेग कधी धरला ते कळलेच नाही. ७६ किलोपासून ८६ किलोपर्यंत एका वर्षात मजल मारली. माझ्या ढेरीने फेर धरायला सुरूवात केली, चपळता कमी झाली. अचानक एक दिवस पाठ दुखायला सुरूवात झाली.     फिजीयोथेरपिस्टकडे गेलो आणि त्यांनी व्यायाम करावयास आणि वजन कमी करायला सांगितले. त्यांनी विचारले, “तुमचे कॅालेजात शिकत असतांना वजन किती होते?” मी म्हणालो ७६ किलो.” त्या म्हणाल्या, “ दहा किलो वजन कमी करा.” माझे वजन कमी करण्याचे प्रयोग सुरू झाले.

    मी सहज बोलून गेलो, “ दहा किलो वजन कमी करायचे आहे.” आपल्या देशात ९०% लोक डाएटिशीयन आहेत हे माझ्या लगेच लक्षात आले. मी फक्त वजन हा शब्द उच्चारला आणि मला अनेक सल्ले फुकट मिळाले.

1. भात बंद करा

2. रात्रीचे जेवण बंद करा

3. गोड बंद करा

4. चहा बंद करा

5. फळे खा

6. किमान एक तास चाला, व्यायाम करा.

7. ८०% डायट आणि २०% व्यायाम याने वजन कमी होते

8. पोहायला जा

9. सायकल चालवा

10. कपालभाती करा (तेंव्हा रामदेव बाबा नुकतेच उदयास येत होते )

11. आयुर्वेदिक औषधे सुरू करा

12. गरम पाणी, लिंबू, मध असे सकाळी उपाशी पोटी घ्या.

13. योगा करा

14. जोर दंड बैठका काढल्या तरी खुप आहे.अमुक एक वैद्य या वयात २०० दंड बैठका काढतात

15. तू डबल हाडी आहेस, म्हणून वजन जास्त आहे, उगाच ते कमी करायच्या फंदात पडू नको.

16. त्या काळी दिक्षीत आणि दिवेकर प्रकाशझोतामध्ये यायचे होते.त्यामुळे मला दोन वेळा खा किंवा दोन दोन तासांनी खा, असा सल्ला कोणीही दिला नाही.

17. तुझे मसल मास जास्त आहे, स्नायूंचे वजन जास्त आहे, काळजी करू नकोस

    अशा अनेक सल्ल्यांपैकी मी नेमके काय करावे ? हा गहन प्रश्न होता. माझे एक जवळचे आयुर्वेदिक डॅाक्टर मित्र वजन कमी करण्याचा दवाखाना चालवायचे. ते एक विशिष्ट तेल प्यायला द्यायचे आणि मग औषधे आणि  डाएटने वजन कमी करायचे. ते वजन कमी करण्यासाठी खुप प्रसिध्द झाले होते. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी एका मशीनने माझ्या शरीरात किती फॅट आहेत ते तपासले आणि काही रक्ताच्या तपासण्या केल्या. साधारणतः आयुर्वेदिक डॉक्टर नाडी तपासतात. पण हे जरा वेगळे वैद्य होते. मी सर्व काही त्यांनी सांगितले तसे केले. डॉक्टरांनी मला एक तेलाची बाटली आणि काही       आयुर्वेदिक गोळ्या दिल्या. ते तेल वाढत्या क्रमाने प्यायचे होते (३०, ४०, ५०, ६०, ९०,१२० मिली). जिभेला लिंबू लाऊन मी ते तेल पीत असे. हा सगळ्यात अवघड प्रकार होता. ते तेल प्यायल्यानंतर दिवसभर भूक लागत नसे. रात्री भूक लागल्यानंतर मी एक पोळी आणि वरण असे जेवण घेत असे. त्या तेलात आणि गोळ्यात काय औषधे आहेत हे मात्र त्या डॉक्टरांनी सांगितले नाही. मोघम असे काहीतरी सांगितले म्हणजे त्यात तीळाचे तेल आहे त्रिफळा आहे इ .आयुर्वेदिक डॉक्टर असे काही सांगत नसतात असा माझा अनुभव आहे. पहिल्या सहा दिवसातच माझे तीन किलो वजन कमी झाले. एकदम हलके वाटायला लागले. नंतर त्यांनी मला सकाळी एक पोळी/भाकरी आणि एक वाटी वरण आणि रात्री परत तेच असा आहार सांगितला. फळे, भाज्या, साखर, गूळ, मध, बटाटे, भात, पोहे, उपमा, साबुदाणा असे सर्व बंद करायला सांगितले. सुरुवातीला केवळ दोन वेळा आणि ते सुद्धा फक्त एक पोळी आणि वरण असे खाल्ल्यामुळे डोके दुखत असे. पण नंतर सवय झाली आणि म्हणता म्हणता केवळ तीन महिन्यात माझे १२ किलो वजन कमी झाले. एकदम हलके वाटायला लागले, मला माझे सर्व कपडे बदलावे लागले. आता एकदम मी दहा वर्षांनी लहान दिसायला लागलो! पण कुठलीच अवस्था चिरंतन नसते. मला वाटले की आता वजन कधीच वाढणार नाही. डॉक्टरांनी डायट वजन कमी झाल्यानंतरही सुरु ठेवायला सांगितले पण मी मात्र त्यांचा तो सल्ला काही मनावर घेतला नाही. मला वाटले आता वजन कमी झाले आहे ते कधीच वाढणार नाही. मी व्यायामही करत नव्हतो.यथेच्छ गोड, तीन वेळा जेवण, अधून मधून आईस्क्रिम,वड़ा पाव……पुढील केवळ एक वर्षात मी परत ९२ किलोपर्यंत कधी पोचलो ते कळलेच नाही. परत तेच… वाढलेली ढेरी, चालताना होणारा त्रास, वाढलेला आळस….

    आता वजन कमी करण्यासाठी काहीतरी करणे गरजेचे होते. मी संभाजीनगरला (औरंगाबाद) काही कामासाठी गेलो होतो. तिथे अनेक वर्षांनंतर माझे एक मित्र भेटले. सुरुवातीस मी त्यांना ओळखलेच नाही. कारण त्यांनी किमान सात किलो वजन कमी केले होते. स्वाभाविकच मी त्यांना वजन कमी करण्यासाठी काय केले? हा प्रश्न विचारला. ते म्हणाले “दिक्षीत डाएट “. तेंव्हा दिक्षीत डाएट नुकतेच फेमस होत होते. त्यांनी मला     डॅा. दिक्षीतांचा फोन नंबर दिला. मी त्यांच्याशी संपर्क केला आणि माझ्या वाढलेल्या वजनाबद्दल सांगितले. त्यांनी काही प्रश्न विचारले आणि मला एका वॅाट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. माझ्यासारखाच ओबेसिटीचा पॅटर्न असलेल्या समवयस्क व्यक्तीची ओळख करून दिली. त्याने मला दिक्षीत डाएट समजावून सांगितले.

1. दोनच वेळा खायचे. अगदी गोळ्यासुद्धा त्याच वेळी घ्यायच्या.

2. जेवणात प्रोटीन, कार्ब, सलाड असावे, गोड कमी, साखरेचा चहा, कॉफी वगैरे सगळं बंद.

3. अगदीच भूक लागली तर ताक किंवा एखादा टोमॅटो चालेल.

    असे काहीसे डाएट करायला सांगितले. मी ते लगेच सुरू केले. सकाळी ११ वाजता पहिले जेवण आणि रात्री ८ वाजता दुसरे जेवण असा क्रम सुरू केला. ४५ मिनिटे चालायला सुरवात केली. म्हणता म्हणता माझे वजन कमी व्हायला सुरुवात झाली. मी पुन्हा ७६ किलोचा झालो. हलके वाटायला लागले. ब्लड प्रेशरची गोळी ५ मिलीग्राम वरून २.५ मिलीग्रामवर आली. सगळेजण कौतुकाने चौकशी करायला लागले. कांहीजण म्हणाले, “दिक्षीतांची मात्रा लागू पडली वाटतं!” पण कांहीच दिवसांनी दिवाळी आली आणि मी दिक्षीतांची रजा घेतली ती कायमची… पुढच्या एक वर्षात मी परत ९२ किलोचा कधी झालो ते कळलेच नाही! परत तेच… वाढलेली ढेरी, चालताना होणारा त्रास, वाढलेला आळस….

परत दिक्षीत डाएट सुरू करावे असे वाटले पण नंतर मी ते करू शकलो नाही. एकदोन दिवस करायचो आणि परत किचनमध्ये जाऊन फ्रिजमध्ये असलेली चॅाकलेट्स, आईस्क्रीमवर ताव मारत असे. मग मी दिक्षीतांचा नाद कायमचा सोडला. पुढे काही महिने तसेच गेले.

एक मित्र अनेक दिवसांनी भेटला. म्हणाला, “किती वजन वाढलंय. काहीतरी कर मित्रा. करिनाने बघ झिरो फिगर केली आहे दिवेकरांच्या मदतीने. मी दिवेकरांचे पुस्तक विकत घेतले आणि अधाश्यासारखे वाचून काढले. त्या पुस्तकाच्या आधारे दर दोन तासांनी काय आणि कसे खायचे याचे वेळापत्रक तयार केले. पण झाले भलतेच..ज्या प्रमाणात खायचे ते मात्र मी कधीच पाळले नाही. दोन दोन तासांनी यथेच्छ खाल्ले आणि मी वजनाची शंभरी कधी पार केली ते कळलेच नाही. मला आता अनेक त्रास सुरू झाले होते..गुडघे दुखी, धाप लागणे, ब्लड प्रेशर वाढणे, छातीत दुखणे….

माझ्या हॅास्पिटलमधील हाऊसकिपींग सुपरवायझर मला भेटायला आले होते. त्यांना मी अनेक महिन्यांनी भेटलो होतो. ते एकदम सडपातळ दिसत होते. त्यांनी २५ किलो वजन कमी केले होते.वास्तविकपणे मी त्यांना सल्ला विचारला…ते म्हणाले, “सर, काळजी करू नका. मी आता डाएट कोच आहे. तीन महिन्यात तुमचे २० किलो वजन कमी करून देतो.” ते लगेच वजनकाटा घेऊन आले. माझे वजन, उंची, बी.एम.आय.ची मोजमापे घेतली आणि म्हणाले, “सर दोन वेळा शेक घ्यायचा, चहाची तलफ आली तर ही पावडर एक चमचा गरम पाण्यात टाकायची आणि प्यायचे. सकाळी आमचा एक वॅाटसॲप ग्रुप आहे त्यामध्ये ५ ते ६ व्यायाम करायचा. म्हणता म्हणता २० किलो कमी..” मी हे सगळे सुरू केले. वजन कमी करण्याचा हा माझा नवीन प्रयोग होता. दोन महिने हे सर्व केले पण फारसा फरक पडला नाही. मग सोडून दिले. माझे वजन फार कमी झाले नाही.

त्याच दरम्यान मला पाठदुखीचा त्रास होऊ लागला. मी माझ्या एका ॲार्थोपेडीक सर्जन मित्राकडे गेलो. तो म्हणाला, “ काय राजेश, काय बेढब झाला आहेस. पाठ दुखणारच. गोळ्या लिहून देतो, पण वजन कमी करावेच लागेल.” त्याने मला किटो डाएट करायला सांगितले. हेच काय ते शिल्लक राहिले होते. मी ते नेटाने केले आणि माझे वजन कमी व्हायला सुरुवात झाली. मी परत २० किलो वजन कमी करू शकलो. आता परत एकदा हलके वाटत होते. मित्र म्हणाला, “हे बघ. आता डाएट हा तुझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. सोडलेस तर परत वजन वाढेल. भात,भाकरी कमी कर, पोळी पूर्ण बंद. वरण, पनीर,अंडी, मासे, चिकन याचे प्रमाण जरा जास्त ठेव. तुप किंवा खोबरेल तेल वापर. गोड पूर्ण बंद. जेवण औषध आहे, ते प्रमाणातच खाल्ले पाहिजे. दररोज व्यायाम हवाच.” यावेळी वजन कमी केल्यानंतर मी मात्र कानाला खडा लावला आणि खाणे नियंत्रित केले. दररोज चालायला सुरुवात केली. प्रत्येक गोष्टीची सवय व्हायला वेळ लागतो. पण एकदा सवय झाली की ते अंगवळणी पडते. मग त्याचा त्रास होत नाही. आई सदैव म्हणते त्याचे महत्त्व पटले, “ अन्न तारी,अन्न मारी,अन्न विकार करी…”.

राजेश कापसे

९८१९९१५०७०

Saturday, December 7, 2024

आई! “अरे, कोणतीच तक्रार नाही!!”

हे लिहिताना मी भावुक झालो आहे खरेतर. मी आईला घेवून पनवेलच्या नवीन घरात आलो. हे गंगाखेड सोडल्या नंतरचे ९ वे घर. २३ वर्षांपूर्वी मी आईला, गंगाखेड सोडून माझ्यासोबत संभाजीनगर (औरंगाबादला) येण्याची विनंती केली. कुठलाही विचार न करता तिने गंगाखेडचा वाडा विकला आणि आम्ही संभाजीनगरला (औरंगाबादला) आलो. एक खोलीचं घर. कधीच तक्रार नाही. तेव्हा मला कमी पगार होता. पण तिने सांभाळून घेतले.

मग आम्ही स्वत:चा फ्लॅट विकत घेतला. ई एम आय भरणे शक्य व्हायचे नाही पण ती घरात पैसे नाहीत म्हणून चिडली नाही कधी. घरी येणारा कधीच न जेवता गेला नाही.

ती मग डॅा. हेडगेवार रूग्णालयात सेवाव्रती म्हणून काम करायला लागली. जरा रमली संभाजीनगरला (औरंगाबादला) पण मी मुंबईत नोकरी करायचे ठरविले आणि कल्याणला शिफ्ट झालो. माझ्यासोबत ती कल्याणला आली. कोणतीही तक्रार नाही.

खरंतर माझे वडील मुंबईत लोकल अपघातात वारले होते. त्या कटू आठवणी असतांनाही ती कल्याणला आली. आम्ही ब्राम्हण सोसायटीत रहायला लागलो.

मला मुंबईतले काम जमत नव्हते. खुप घालमेल व्हायची त्या नोकरीत. तिला ते लक्षात यायचं पण ती कधीच रागावली नाही. मग मला दुसरी नोकरी मिळाली आणि तिथे मी रमलो. माझ्या चेहऱ्यावरचे समाधान बघून तिला हायसं वाटलं असावं.

मग जरा प्रगती झाली, मला लंडनला शिकायला जाण्याची संधी मिळाली. फार कधी मी तिला लंडनहून फोन केले नाही पण तिने कधी तक्रार केली नाही.

नंतर स्वत:चं घर घेतलं कल्याणला. इथवर तिचं शिवणकाम सुरू होतं. तिची अनेक वर्षांची सोबतीण, तिची लाडकी मशीन होती तिच्यासोबत. पण, नवीन घरात अडगळ नको म्हणून तिने ती देऊन टाकली. कुठलीही तक्रार नाही!

मग ती हातानेच विणकाम करायला लागली. लहान मुलींचे फ्रॅाक, साड्या कितीतरीजणींना हातानेच शिवून दिल्या असतील तिने. त्या लहान मुलीं जेंव्हा खुष व्हायच्या त्यातच तिचा आनंद आजही असतो.

मी लंडनहून परत आलो आणि मला लोकल ट्रेनचा प्रवास नकोसा वाटायला लागला. मी दादरला शिफ्ट व्हायचं ठरवलं. तर म्हणाली, “तू जा.. मी कल्याणला रहाते.” कोणतीच तक्रार नाही!!

मी नायजेरियाला जायचे ठरवले. मग ती नाशिकला रहायला गेली. जरा स्थिरावली तिथे. मी परत पुण्यात नोकरी घेतली आणि तिला म्हणालो ये पुण्यात, तिने नाशिक सोडलं. कोणतीच तक्रार नाही.

मी परत मुंबईत पनवेलला यायचं ठरवलं. आई आता ८४ वर्षांची झाली आहे. ती पनवेलला माझ्यासोबत आली. पनवेलच्या घरी परत तोच उत्साह. देवघर लावले, पूजा केली, जेवण तयार केलं.कोणतीच तक्रार नाही.

२३ वर्ष, अनेक शहरं, चढउतार...पण तक्रार मात्र मुळीच नाही!

राजेश कापसे,

९८१९९१५०७०

Friday, November 29, 2024

वृध्दत्व, दारिद्र्य आणि २० रुपयाचे मोबाईल रिचार्ज!

काल आई सोबत गप्पा मारताना मोबाईल रिचार्जचा विषय निघाला. तिने नवरात्रात घडलेला एक प्रसंग सांगितला. ती म्हणाली,'२० रूपयांच्या रिचार्जलासुद्धा मोठी किंमत आहे रे!" मला काही कळले नाही. मी तिला म्हणालो, 'अगं पाच मिनिटात संपतो २० रू. रिचार्ज. काहीच होत नाही त्यात!

आई म्हणाली,"तुम्हां तरूण पिढीला नाही कळायचं ते!" नवरात्रीत एक आजी जोगवा मागत होत्या. मी १० रूपये टाकले आणि तुझ्या मावशीने १० ...झाले २० रूपये.

त्या आजी नंतर मला बाजूला घेवून गेल्या आणि खुप रडल्या. त्या म्हणाल्या, मोबाईल आहे पण मागचे दोन महिने रिचार्ज करायला पैसेच नाहीत. मुलाला विनंती केली पण तो सुद्धा नाही करत रिचार्ज. माझ्या भावाचा दोन महिने होऊन गेले पण अजुन फोन नाही आला. त्यालाही नाही पेन्शन बिन्शन..या उतार वयात नसतील पैसे त्याच्या- कडेही......माझी अवस्थाही तशीच.......मला सांगा २० रुपयांचे रिचार्ज होईल का हो?आज जोगव्यात मिळालेले २० रूपये वापरून करता येईल का मोबाईल रिचार्ज? जर तो करता आला तर मी करेन आणि बोलीन भावाला." आई त्यांना जवळच्या दुकानात घेवून गेली आणि फोन रिचार्ज करून दिला.२० रू. चा रिचार्ज! फोन रिचार्ज केल्यानंतर त्या भावाशी बोलल्या. त्यांना खुप बरं वाटलं.

२० रुपयाच्या मोबाइल रिचार्जबद्दल आईने जे सांगितले त्यामुळे मी खुप अस्वस्थ झालो. उतारवयात नसणारे पैसे, केलं जाणारं दुर्लक्ष, मनाला बोचरी वेदना देवून गेलं.

Saturday, November 23, 2024

सर्वसामान्यांना तत्परतेने मदत करणारे देवेन्द्रजी फडणवीस, एक ह्रदयस्पर्शी आठवण!

काही वर्षांपूर्वी जसोटा कुटीर, दादर पश्चिम येथील मध्यमवर्गीय सोसायटीमधील रहिवाश्यांनी ठरवले की सोसायटीची जमीन सोसायटीच्या मालकीची व्हावी. बिल्डरने जे करायचे तेच केले. सोसायटी रजिस्टर करून दिली आणि जागा सोसायटीच्या नावावर करून देतो असे आश्वासन दिले आणि पुढे काहीच केले नाही. नंतर अनेक वर्ष तशीच गेली. मग सोसायटीच्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये डीम्ड कॉन्व्हेयन्स करण्याचे ठरले आणि विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यामध्ये डीम्ड कॉन्व्हेयन्स का महत्वाचे आहे याबद्दल सर्व सभासदांना माहिती देण्यात आली आणि सर्वांनी बहुमताने तो ठराव मान्य केला.

    पुढची अडचण होती सोसायटी, बिल्डिंग आणि जागेच्या कागदपत्रांची. बिल्डरने कोणतीच कागदपत्रे दिली नव्हती. मग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी    सोसायटीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, जागेचे लेआऊट, बिल्डिंगचा नकाशा आणि सर्व फ्लॅटचे क्षेत्रफ़ळ अशी कागदपत्रे मुंबई महापालिकेतून मिळवली. पुढचा भाग होता सर्व सभासदांच्या फ्लॅटची कागदपत्रे जमा करण्याचा. काहीजणांनी रजिस्ट्रेशन केले होते तर    काहीजण हे बिल्डरचे भाडेकरू होते. त्या सर्वांची उपलब्ध असलेले सर्व कागदपत्रे (रजिस्ट्रेशन डिड, हस्तांतराचे प्रमाणपत्र, टॅक्स पावत्या इ.) जमा करण्यात आली आणि सोसायटीच्या वकीलांकडे देण्यात आली.

सोसायटीच्या सर्व सभासदांनी वकीलांचे शुल्क, कोर्ट फी आणि इतर प्रशासकीय खर्च इ.सोसायटीकडे जमा केला. मग वकीलांच्यामार्फत डेप्युटी रजिस्टार, सहकारी संस्था यांच्याकडे डीम्ड कॉन्व्हेयन्ससाठी अर्ज करण्यात आला. डेप्युटी रजिस्टारकडून बिल्डरकडे नोटीस पाठवण्यात आली पण त्याचे कोणतेच उत्तर आले नाही. सोसायटीच्या सभासदांनी मात्र डेप्युटी रजिस्टार यांच्या कार्यालयातील सर्व मिटींगना (सुनावण्या) उपस्थिती नोंदवली आणि सर्व पत्रव्यवहार नेमाने पूर्ण केला. सर्व कागदपत्रांची पूर्तता, सुनावण्यांना वेळेत उपस्थिती यामुळे शेवटी डेप्युटी रजिस्टारने जसोटा कुटीर सोसायटीच्या बाजूने डीम्ड कॉन्व्हेयन्सचा निकाल दिला. आम्ही अर्धी लढाई जिंकलो.

मग सोसाटीची एक सर्वसाधारण सभा बोलावली आणि त्यामध्ये प्रॉपर्टी कार्डसाठी जिल्हाधिकारी, मुंबई यांच्याकडे अर्ज करण्याचा ठराव पास करण्यात आला. हे काम करण्यासाठी एका व्यक्तीने आम्हाला लाखो रुपये लागतात असे सांगितले. ते सोसायटीच्या आवाक्याबाहेर होते. आम्ही त्या व्यक्तीला स्पष्ट नकार दिला आणि स्वतःच अर्ज करायचे ठरवले. डीम्ड कॉन्व्हेयन्सची ऑर्डर आणि अर्ज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केला आणि त्याची पोच पावती घेतली. पुढे एक महिन्यांनी आम्हाला तिथून पत्र आले त्यात लिहिले होते की, अजून काही कागद-पत्रांची पूर्तता करण्यात यावी अन्यथा आपला अर्ज रद्द करण्यात येईल.

    काही सभासदांनी स्टॅम्प ड्युटी भरली नव्हती त्यांना आम्ही ती भरायला सांगितली आणि त्याचे पुरावे सादर केले. आम्हाला आशा होती की आता प्रॉपर्टी कार्ड आमच्या नावावर होईल. जिल्हाधिकारी कार्यालयाने जी काही कागदपत्रे मागितली होती त्यापैकी जी आमच्याकडे उपलब्ध होती ती आम्ही जमा केली पण काम होईल की नाही याची शाश्वती नव्हती. आधीच खूप खर्च झाला होता आणि त्यात अजून खर्च करणे अशक्य होते. त्यावेळी मला माझे एक मित्र म्हणाले, तुम्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सचिव श्री अतुलजी वझे यांना भेटा. ते नक्की तुम्हाला मदत करतील.

मी श्री वझे यांना भेटलो, त्यांनी आमच्या सोसायटी बद्दल माहिती घेतली आणि लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात फोन लावला आणि म्हणाले, “तुम्ही तिथे जा तुमचे काम होईल. “काही माणसे देवासारखी भेटतात आणि मदत करतात. मी तेथील अधिकाऱ्यांना भेटलो आणि आश्चर्य म्हणजे पुढील काही महिन्यात आमच्या सोसायटीचे प्रॉपर्टी कार्डचे काम पूर्ण झाले आणि प्रॉपर्टी कार्ड तयार झाल्यानंतर मला जिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला, 'तुमचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले आहे, कृपया घेऊन जाणे." माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. देवेन्द्रजी तुमच्या कार्यालयातील टीमने आमचे काम आस्थेने पुर्ण केले. तुमचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!

राजेश कापसे,

९८१९९१५०७०

Friday, November 15, 2024

क्षमाशील देशपांडे!

कोबे, जपान येथील एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये माझ्या रिसर्च पेपरची निवड झाली आणि मला त्याठिकाणी जाण्याची संधी मिळाली. त्यासाठी मला पैशांची जमवाजमव करायची होती. हेडगेवार रुग्णालयातील डॉ अनंत पंढरे सरांनी माझ्यासाठी अनेकांशी बोलणे केले आणि मला स्कॉलरशिप मिळवून दिली. मी सगळा  हिशोब केला आणि लक्षात आले की मला अजून दहा हजार रुपयांची गरज आहे. माझ्याकडे तेव्हढे पैसे असणे कठीण होते.

रिसर्च पेपर लिहिणे, त्याची निवड होणे आणि त्या कॉन्फरन्सला जाण्यासाठी शिष्यवृत्तीही मिळाली होती. आता दहा हजार रुपयांची गरज होती. ते मिळाले नाही तर जपानला जाणे मात्र रद्द होणार होते. मी हताश होऊन घरी बसलो होतो. 

त्याच वेळी, श्री गणेश देशपांडे, आमच्या घरी आले होते. माझ्या चेहऱ्यावरील हावभावावरून, काहीतरी बिनसले असल्याचे त्यांना जाणवले. मला घरी दीपक म्हणतात. ते मला म्हणाले, 'दीपक, काय झाले. सगळे ठीक आहे ना?" मी काहीच बोललो नाही. आई म्हणाली, 'अहो त्याचे जपानला जायचे ठरले होते, पण काही कारणांनी रद्द होतेय असे म्हणाला. काहीच सांगत नाही." ते क्षणभर काहीच बोलले नाहीत. आई ने त्यांना पाणी दिले, चहा झाला आणि ते निघणार होते त्याआधी, त्यांनी वीस हजार रुपयांचा चेक माझ्या हातात दिला. म्हणाले, "ऑल द बेस्ट!" आणि ते निघून गेले. मला त्यांचे आभार कसे मानावेत ते कळेना. मला प्रश्न पडला, "त्यांना कसे कळले असेल? माझ्या मनातले कसे ओळखले असेल त्यांनी?" मी कृतज्ञतेने त्यांच्याकडे बघत होतो. 

जपानला जाण्यापूर्वी त्यांचा निरोप आला, "दीपक, जपानमधील माझे एक मित्र नाईक यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. ते टोकियो मध्ये तुझी राहण्याची व्यवस्था करणार आहेत. त्यांना जपान मध्ये गेल्या नंतर संपर्क करणे." त्यांनी मला नाईकांचा फोन नंबर दिला. मी जपानला गेलो आणि तिथल्या घाई गडबडीत नाईकांना फोन करायचे विसरून गेलो. माझा रिसर्च पेपर आणि जपान, सिंगापुर दौरा खूप चांगला झाला. माझे खूप कौतुकही झाले, सत्कार झाले. श्री गणेश देशपांडे यांनीही माझे फोन करून अभिनंदन केले. 

जपानहून परत येऊन एक दोन महिने झाले होते. श्री गणेश देशपांडे काही कामा निमित्त संभाजीनगरला आले होते. त्यावेळी ते घरी आले. येताना पुष्पगुच्छ घेऊन ते आले. माझे कौतुक केले. मला म्हणाले, 'दीपक, तू जपान मध्ये नाईकांना फोन केला नाहीस का? त्यांनी खूप वाट बघितली तुझी. तुझे हॉटेलचे बुकिंगही केले होते. त्यांचा मला फोन आला होता. ते म्हणाले, 'माझे हॉटेल बुकिंगचे पैसे वाया गेले त्याचे दुःख नाही, पण त्याने साधा फोनही नाही केला त्याचे जास्त दुःख वाटले'." ते एवढेच बोलले. रागावले नाहीत की चिडले नाहीत. नंतर म्हणाले, 'असे विसरायचे नाही कधी. काळजी घे भविष्यात." 

नाईकांनी त्यांना खूप ऐकवले असेल नक्कीच. पण गणेशजींनी अत्यंत सौम्य शब्दात मला समजावून सांगितले आणि मला माफही केले. किती सहजता होती त्यांचा माफ करण्यात! हा प्रसंग आयुष्यभरासाठी माझ्या मनावर कोरला गेला. क्षमाशील असावे तर गणेश देशपांडें सारखे!!!!

-राजेश कापसे

९८१९९१५०७०

Saturday, November 9, 2024

मैं एक वक्त्त पे एक काम करता हूं !

माझा मित्र, श्रीपाद कुलकर्णी नाशिकला स्वतःची लेबल प्रिंटिंगची मोठी कंपनी चालवतो. एकदा त्याच्या सोबत त्याच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये गेलो असता एक वेगळेच मॅनॅजमेन्ट तत्व शिकलो. त्याच्याकडे त्याच्या कामाची एक डायरी होती आणि त्यात तो सर्व कामे पेन ने लिहीत होता. साधारणतः महिन्यात करावयाच्या कामांची विस्तृत यादी त्या डायरीत त्याने लिहिली होती. ऑफिसमध्ये गेल्यानंतर सगळ्यात प्रथम तो डायरी उघडून त्यातील दिवसभरात करण्याची कामे एका लहान कागदावर लिहीत होता. मी त्याला कुतूहलाने विचारले तर तो म्हणाला, 'मी इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरात नाही. मी पेन, डायरी आणि या छोट्या फ्लॅश कार्डचा वापर करतो." मला आश्चर्य वाटले कारण एव्हडी मोठी कंपनी चालवताना सध्या बाजारात उपलब्ध असलेले हायटेक मोबाईल फोन आणि त्यातील ॲप वापरण्यापेक्षा तो चक्क डायरी, पेन आणि लहान कागद वापरात होता. स्वाभाविकपणे तो असे का करतो हा माझा पुढचा प्रश्न होता.

तो म्हणाला, 'हे बघ, मोबाईल मध्ये कामांची यादी लिहिली की त्याचे रिमाइंडर्स आपण टाकतो. मग वेळोवेळी फोन चा आवाज येतो आणि आपण फोन बघतो. फोन मध्ये कामाच्या यादी सोबत असंख्य गोष्टी असतात. वॉट्सअप, ई-मेल, मॅसेजेस, इंस्टाग्राम, फेसबुक एक ना अनेक. कामाचे रिमाइंडर बघण्यासाठी आपण फोन उघडतो आणि काम सोडून इतर गोष्टी बघण्यात आपण किती वेळ वाया घालवतो ते कळतच नाही. काम बाजूला पडते आणि नको त्यात वेळ वाया जातो. त्यापेक्षा डायरी बरी, कारण त्यात भरकटवणाऱ्या गोष्टी नसतात. ती एकटीच असते बिचारी! आणि त्यात फक्त कामेच लिहिलेली असतात. डायरी उघडल्यानंतर समोर काम असते आणि लगेच ते करायला सुरुवात करता येते."

'सध्या अनेकजण म्हणतात की आम्ही मल्टिटास्किंग करतो. व्हाट्सअप मॅसेजवर काम करतो, लगेच ई-मेल बघतो मग लगेच इन्स्टावर कंमेंट देतो, फेसबुक वर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मग ऑफिस मधील कामही करतो..... मराठीत एक म्हण आहे, "एक ना धड भाराभर चिंध्या'. अशी अवस्था असते बघ. माझी कामाची पद्धत सोपी आहे, एका वेळी एक काम! मग समोरचे काम करत असताना, मी फोन, ई-मेल, कॉम्पुटर सगळे बाजूला ठेवतो. ई-मेलला उत्तरे देण्याची वेळ नक्की केली आहे. नंतर मी ई-मेल बघतही नाही. व्हाट्सअप बघण्याची वेळही नक्की आहे. प्रत्येक तासात काही मिनिटे त्यासाठी, नंतर बंद. आलेला प्रत्येक फोन लगेच घेतला पाहिजे याचीही गरज नसते. जे महत्वाचे फोन नसतात, असे सर्व कॉल्स मी संध्याकाळी पूर्ण करतो. त्यामुळे कामे लवकर आणि व्यवस्थित होतात. कामे लक्षपूर्वक करता येतात."मल्टी-टास्किंग ऐवजी मी सिंगल टास्किंगला महत्व जास्त देतो. त्याने मला गुप्त सिनेमातील ओम पुरी यांचा एक डायलॉग ऐकवला, "मैं एक वक्त्त पे एक काम करता हूं !"

-राजेश कापसे

९८१९९१५०७०

Saturday, November 2, 2024

आनंद आणि दुःख 

विचार शून्य अवस्था आणि आनंद याबद्दल विचार करताना अनेक लहान सहान घटना आठवल्या. दिवसभर न आवडणारे काम आणि त्याहूनही नआवडणारा प्रवास केल्यानंतर जर जेवणात मनापासून आवडणारा पदार्थ असेल तर मी भान हरपून जेवण करतो आणि लगेच थकवा जाऊन फ्रेश वाटायला लागतं. 

भान हरवणे म्हणजेच विचार शून्य होणे. विचारशून्य अवस्था आणि आनंद या दोन गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. मराठीतील ‘मन हलके होणे’ हे वाक्य मला खुप आवडते. विचारांनी जड झालेलं मन विचारमुक्त झालं की हलक होतं आणि अल्हाददायक वाटायला लागतं. 

 मंबईतल्या सिमेंटच्या जंगलाचा आणि गर्दीचा कंटाळा आला की मी सिंधुदूर्गात जातो. तिथल्या निसर्गात मन कधी हरवून जातं ते कळतच नाही. मन हरवले की धावपळ, दगदग, कंटाळा हे विचार हद्दपार होतात आणि मी आनंदी होतो. 

सुंदर फुल, पेंटींग, सुगंध यामध्ये मन रमते आणि आनंददाई होते. 

संध्याकाळी जिममध्ये जाऊन व्यायाम करतांनाही विचार दूर पळून जातात. जिमधील वजने उचलतांना ज्या वेदना होतात त्यापूढे ॲाफिसात झालेल्या अपमानाच्या शाब्दिक वेदना क्षुल्लक वाटायला लागतात आणि माझा प्रवास परत आनंदी होण्याकडे सुरू होतो. 

माझ्या ऐका मित्राला पोहायला खुप आवडते. पाण्यात उडी  मारली की तो पाण्या सोबत एकरूप होतो आणि दुनिया विसरतो… भान हरपून पोहतो. 

सोमवार ही आठवड्याची सुरवात, त्या दिवशी ॲाफिसात बरीच कामे असतात.  सोमवारी संध्याकाळी माझा बासरीचा क्लास असतो. गुरूजींना नमस्कार करून फोन बंद केला आणि षड्ज लावला की पुढचा एक तास मी भान हरपून बासरी शिकतो. क्लास संपल्या नंतर मी आनंदाच्या अत्युच्च शिखरावर असतो. 

आपल्या आवडत्या गायकाचे गाणे ऐकताना आपली समाधीच लागते! म्हणजेच आपण विचारशुन्य होतो. 

दुःखातून जाताना आपल्या मनाची अवस्था नेमकी  विरुध्द असते. असंख्य विचार मनात असतात. आपली जवळची व्यक्ती जग सोडून गेल्या नंतर त्या व्यक्तीच्या आठवणींनी मन भरून जातं. डोळे भरून येतात. आपण दुःखाच्या गर्तेत लोटले जातो. 

कुणी टाकून बोलले, अपमान केला की त्याबद्दलचे विचार मनात चक्री वादळा सारखे घोंगावू लागतात आणि डोकं जड होतं. 

दुःखाकडून आनंदाकडे जाण्याचा मार्ग खुप सोपा आहे.. मन हलक करण्याचा मार्गही खुप सोपा आहे….भान हरवून जाईल असे काही तरी करावे. संगीत, व्यायाम, खेळ, आवडत्या व्यक्तीचा सहवास, आपल्या आवडत्या पेट (कुत्रा, मांजर) सोबत घालवलेला वेळ, जवळच्या मित्राशी मारलेल्या मोकळ्या गप्पा, चांदण्यांनी भरलेलं आकाश, हिरवागार डोंगर किंवा अथांग समुद्र ….हे अखर्चिक उपाय किती अमूल्य आहेत, नाही का?

-राजेश कापसे

९८१९९१५०७०

Thursday, October 3, 2024

बासरीचे धडे गिरवतांना...


कॉलेजमध्ये असताना हिरो चित्रपटातील फेमस धून मी बासरीवर वाजवायला शिकलो होतो.तेव्हापासून बासरी हे वाद्य आवडायला लागले. कधीतरी ते शिकू असे तेव्हा ठरवले होते. योग,प्रारब्ध,वेळ यावी लागते.या सर्व गोष्टींवर माझा खूप विश्वास आहे. त्याचे कारणही तसेच आहे. बासरीवर हिरोची धून मी १९९६ ला शिकलो आणि नंतर अनेक वर्ष साधारणतः २००१ पर्यंत बासरी शिकणे काही झाले नाही. अचानक २००१ मध्ये एक दिवस मी माझे डॉ. हेडगेवार रुग्णालयातील काम संपवून घरी जात असताना माझ्या बहिणीकडे गेलो असता माझा भाचा अश्विन बासरीवर सा रे ग मा वाजवत असताना मी ऐकले. हा नक्की कुठेतरी बासरी शिकत असेल असे वाटले आणि क्षणाचाही विलंब न करता मी त्याला विचारले, 'कुठे शिकतोस बासरी? मलाही शिकायची आहे." अश्विन म्हणाला, "मामा, आपल्या घराजवळच पंडित श्रीपाद कुलकर्णी रहातात 'सुरश्री' बंगल्यात. मी त्यांच्याकडे बासरी शिकतो. चल एक दिवस माझ्यासोबत." त्याच दिवशी संध्याकाळी मी गुरुजींकडे गेलो.

गुरुजींच्या 'सुरश्री' बंगल्यात शिरताना बासरीचे सुंदर स्वर ऐकू येत होते. दरवाजा उघडाच होता. अश्विनने माझी ओळख गुरुजींबरोबर करून दिली. मी गुरुजींच्या पाया पडलो. त्यांनी चौकशी केली, 'काय डॉक्टर, कुठे प्रॅक्टिस करता. बासरी शिकायची आहे? बरं..." त्यांनी मला एक बासरी दिली आणि म्हणाले, 'जरा वाजवून दाखवा." मी हिरो चित्रपटातील माझी आवडती धून वाजवून दाखवली. म्हणाले, 'ठीक आहे. उद्यापासून या. सकाळी ७ वाजता येताना पेन आणि फुलस्केप वही घेऊन या.' मी दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो. गुरुजींच्या पाया पडलो. त्यांनी माझी वही घेतली आणि त्यावर llश्रीll असे स्वतः लिहिले आणि ती माझ्याकडे दिली. मला बासरी हातात घेऊन वाजवायची घाई होती. गुरुजींनी मला थांबवले. "डॉक्टर, आधी थेअरी नीट समजून घ्या. नंतर बासरी हातात घ्या." त्यांनी मला ५० अलंकार, सर्व थेअरी लिहून घ्यायला सांगितले. लिहून झाल्यानंतर सगळ्यात प्रथम अलंकारांचा रियाज करण्याचे वेळापत्रक माझ्या वहीत लिहून दिले. सोमवार : १ ते १० अलंकार, बुधवार --१० ते २०, शुक्रवार - २० ते ३० . मग A स्केलची बासरी दिली आणि 'सा' वाजवायची प्रॅक्टिस करायला सांगितले आणि त्या दिवशी मी सा रे ग म प ध नी सा वाजवायला शिकलो. गुरुजी म्हणाले, 'डॉक्टर, 'सा म प' या सुरांवर लक्ष द्या. अलंकारांची भरपूर प्रॅक्टिस करा. अलंकार पक्के झाले पाहिजेत. मग पुढे जाऊ." मी अलंकार वाजवायला शिकलो. माझे अलंकार ऐकून गुरुजी म्हणाले, "डॉक्टर, पंचम मजबूत वाजला पाहिजे. प्रयत्न करा, नक्की जमेल. अलंकार चांगले वाजवताय पण ते सर्व लयीत वाजवता आले पाहिजेत. अलंकार पक्के करा त्यातच सर्व आहे." माझे अलंकार चांगले तयार झाले आणि मग गुरुजींनी मला स्वतः तयार केलेल्या A आणि E स्केलच्या बासऱ्या दिल्या. मग त्यांनी राग शिकवायला सुरुवात केली. राग कसा वाजवायचा हे समजावून सांगताना गुरुजी सांगत, "डॉक्टर, जेवण करताना ताटात भाजी असते.चटणी असते. कोशिंबीर असते. लोणचे असते. खूप काही गोडधोड असते, पोळी, वरण, भात आपण ते चव घेऊन त्याचा आस्वाद घेऊन खात असतो. तसेच रंगाचे असते. आलाप, अस्थायी, अंतरा मग परत अस्थायी मग काही लहान ताना, मिश्र ताना, मोठ्या ताना, झाला असा आनंद घेत राग वाजवायचा. मग त्यात रंगात येते." काही महिने भूप शिकल्यानंतर त्यांनी हंसध्वनी, दुर्गा, वृन्दावनी सारंग, मालकंस असे अनेक राग शिकवले. मला बासरीत चांगली गती यायला लागली होती. गुरुजी म्हणायचे, 'डॉक्टर, आता तुम्हाला मी माझ्यासोबत कार्यक्रमांना साथ देण्यासाठी घेऊन जाईन." ते माझ्यासाठी सर्वात मोठे प्रशस्तीपत्र होते. पण प्रारब्धात काही वेगळे लिहिले होते. मी संभाजीनगर (औरंगाबाद) येथील नोकरी सोडली आणि मुंबईत आलो आणि बासरी पासून दूर गेलो.

एकदा पुण्यात डॉ.अनिल अवचट यांच्याकडे गेलो असता त्यांच्या बासऱ्या बघितल्या आणि त्यांना म्हणालो, "बाबा, बासरी वाजवू का?" त्यांनी बासरी दिली. इलेक्ट्रॉनिक तंबोरा सुरु केला आणि म्हणाले वाजव. मी भूप वाजवला. अनेक वर्षांनी बासरी वाजवत होतो. ते म्हणाले, "अनेक वर्षांनी वाजवतो आहेस का? चांगली वाजवलीस." मग बाबानी बासरी वाजवली. मी तल्लीन होऊन गेलो. मी विचारले, 'बाबा, तुझ्यासारखी बासरी मला कशी वाजवता येईल?" बाबाचे उत्तर खूप सुंदर होते, "हे बघ राजेश, बासरी वाजवताना एका सुरांतून अलगद दुसरा सूर निघाला पाहिजे अगदी सहज सावकाश.मग त्यात सुंदरता येते. बघ प्रयत्न करून".मी मुंबईत परत आलो आणि अनेक वर्षांनी बासरीचा रियाज सुरु केला. नंतर जेव्हा जेव्हा बाबाकडे जायचो तेव्हा बासरी वाजवायचो आणि बाबाची बासरी ऐकायचो. एका सुरांतून दुसऱ्या सुरापर्यंतचा अलगद प्रवास आणि त्यातील गोडवा मी बाबाकडून शिकलो.

मुंबईच्या धावपळीत बासरी वाजवण्यात सातत्य मात्र राहिले नाही. त्यावेळी "ऑनलाईन" हा प्रकार फारसा नव्हता. त्यामुळे पंडित श्रीपाद कुलकर्णी गुरुजींकडून बासरी शिकणेही शक्य नव्हते आणि कल्याण ते मालाड दररोजचा प्रवास करून दुसरे काहीच करणे शक्य नव्हते. मग लंडन,नायजेरिया असा शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने बराच प्रवास झाला. त्यामुळे बासरी थोडी बाजूला पडली. पण अधून मधून वाजवायचो. अनेक वर्ष निघून गेली आणि कोरोनाच्या काळात परत बासरी शिकायचे ठरवले. माझ्या एका मित्राकडे पंडित रोणु मजुमदार सरांचा फोन नंबर होता. तो त्याच्या कडून घेतला आणि पंडितजींना फोन केला.ते म्हणाले तुमचं रेकॉर्डिंग मला पाठवा. मग कळवतो. माझे हंसध्वनी रागाचे रेकॉर्डिंग त्यांना पाठवले आणि त्यांचे एक दोन दिवसांनी उत्तर आले, 'राजेश, मै आपको सिखाऊंगा." पंडितजींकडून बासरी शिकायला मिळणार या कल्पनेनेच मी सुखावून गेलो. मग पंडितजींनी माझे ऑनलाईन क्लास सुरु केले. माझी ओळख त्यांनी संगीतातील दहा थाटांबरोबर करून दिली आणि माझ्याकडे असलेले ५० अलंकार या दहा थाटांत वाजवायला सांगितले. आता मला ५०० अलंकारांचा रियाज करायचा होता. मी खूप अभ्यास केला आणि या दहा थाटांची चांगली तयारी झाल्यानंतर पंडितजींनी मला गायकी अंगाने बासरी कशी वाजवायची ते शिकवले. पुढे तीन वर्ष मी सातत्याने त्यांच्याकडून बासरी शिकलो आणि काही राग उत्तम तयार झाले. मी वाजवलेला यमन राग ऐकून पंडितजी म्हणाले, "राजेश ये स्टेज जानेके लायक हो गया है. वा!बहोत सुंदर!" माझ्यासाठी हे दुसरे महत्वाचे प्रशस्तिपत्रक मिळाले. कोरोना नंतर सगळे काही सुरळीत व्हायला सुरु झाले.लॉकडाऊन संपला आणि पंडितजींचे अनेक कार्यक्रम सुरु झाले आणि त्यांना वेळ मिळेनासा झाला. पण दोन तीन महिन्यात एक असा एखादा क्लास ते घेत. यावेळी मात्र मी ठरवले होते की बासरी शिकणे सुरु ठेवायचे.

इच्छा असली की मार्ग सापडतो.अर्थात ते नशिबातही असावे लागते. पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल मध्ये मी कामाला सुरुवात केली आणि आमच्या शेजारी असलेल्या शिव मंदिरात माझी भेट श्री भुरे सर यांच्याशी झाली. त्यांनी घरी चहासाठी बोलावले आणि त्यांच्या घरी मी तबला बघितला आणि त्यांना कुतूहलाने त्याबद्दल विचारले. ते म्हणाले, त्यांचा मुलगा श्री पांचाळ सर यांच्याकडे तबला शिकतो आहे आणि तो विशारदच्या परीक्षेची तयारी करत आहे. मी त्यांना बासरी बद्दल सांगितले. ते म्हणाले, "डॉक्टर गांधर्व विद्यालयाच्या परीक्षा द्या. अभ्यासही होईल आणि बासरी उत्तम शिकाल." मी श्री पांचाळ सर याना भेटून लगेच अर्ज भरला. सर म्हणाले, 'तुम्ही दुसरी परीक्षा देऊ शकता." मी दुसऱ्या परीक्षेचा सिलॅबस घेतला आणि तयारी सुरु केली. काही राग नवीन होते आणि ते शिकण्याची गरज होती. काय करावे असा मी विचार करत होतो. त्याच दिवशी माझ्या हॉस्पिटलमध्ये पनवेलमधील एक चार्टर्ड अकाउंटंट श्री पाटील सर आले होते. त्यांनी माझ्या केबिन मध्ये बासरी बघितली आणि म्हणाले, 'अहो माझे मित्र पंडित एकनाथ ठाकूर उत्तम बासरी वादक आहेत." मी क्षणाचाही विलंब न करता त्यांचा फोन नंबर घेतला आणि पनवेलच्या मिडल क्लास कॉलोनीतील त्यांच्या घरी गेलो.

पंडित एकनाथ ठाकूर सरांकडे खूप विद्यार्थी बसले होते आणि ते त्यांना बासरी शिकवत होते. मी सरांच्या पाया पडलो. त्यांनी E स्केलची बासरी दिली आणि मला वाजवायला सांगितले. मी यमन वाजवला. सर म्हणाले, "या डॉक्टर. आपण दुसऱ्या परीक्षेची उत्तम तयारी करू. दोन महिनेच आहेत आपल्याकडे, पण काळजी करू नका मी शिकवीन तुम्हाला." त्यांचा प्रेमळ आणि आश्वासक स्वभाव मला आत्मविश्वास देऊन गेला. पुढच्या दोन महिन्यात त्यांनी माझ्या कडून आठ राग तयार करून घेतले.ताल शिकवले. खमाज रागातील "वैष्णव जन तो .." हे भजन शिकवले आणि परीक्षेची तयारी पूर्ण झाली. मी सरांचे आशीर्वाद घेऊन परीक्षेला गेलो. परीक्षा उत्तम झाली आणि मी विशेष प्राविण्यासह परीक्षा पास झालो. बासरीचे शिक्षण पंडित एकनाथ ठाकूर सर आणि कधी कधी पंडित रोणू मजुमदार सर यांच्याकडे सध्या सुरु आहे. कण स्वर, आलाप, विलंबित ख्याल आणि अनेक नवीन राग शिकतोय. पंडित एकनाथ ठाकूर सर संगीतातील क्लीष्ट रचना सहज करून शिकवतात. बासरी वाजवताना त्यात सौंदर्य कसे आणायचे, त्यात कण स्वर कसे वाजवायचे हे शिकताना मी स्वतःला विसरून जातो. मन विचारशून्य होते. ताण कुठे निघून जातो ते कळतही नाही. सर म्हणतात, "डॉक्टर, बासरी सुंदर वाजवण्यासाठी मनही सुंदर होणे गरजेचे आहे. राग, अहंकार बाजूला ठेवला तरच बासरीवर राग चांगला वाजवता येतो." सरांच्या प्रेमळ स्वभावाचा आणि त्यांच्या सुरेल स्वरांचा मी आनंद घेतो आहे. अलंकार पर्यंत शिक्षण पूर्ण करायचे ठरवले आहे. प्रारब्धात असेल तर हा संकल्प नक्की पूर्ण होईल!

गुरु शिष्याचे अजोड नाते: पंडित एकनाथ ठाकूर आणि श्री थंपी

मी पंडित एकनाथ ठाकूर यांच्याकडे बासरी शिकायला सुरुवात केली. एकदा माझ्याकडे बासरी नव्हती. पंडितजींनी मला बासरी दिली आणि स्वरमाला सुरू केली व म्हणाले, “डॉक्टर, ही बासरी थंपींची आहे आणि स्वरमालाही.” हे सांगताना पंडित एकनाथ ठाकूर हळवे झाले. मी पंडितजींना थंपीबद्दल विचारले. पंडितजी त्यांच्याबद्दल सांगत होते ते ऐकताना माझ्याही डोळ्यात पाणी आले.

थंपी मूळचे केरळचे. मुंबईत कामानिमित्त आले आणि मालाडला स्थाईक झाले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी सेवा निवृत्ती घेऊन बकेट लिस्टमधील अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी त्यांनी मालाडचे त्यांचे घर विकले आणि पनवेल जवळ स्वतःचे घर घेऊन ते कुटुंबासह कायमचे शिफ्ट झाले.

नोकरीच्या धावपळीत बासरी शिकायची इच्छा अपूर्ण राहिली होती. पनवेलमध्ये आल्यानंतर त्यांना कुणीतरी पंडित एकनाथ ठाकूर सरांचा पत्ता दिला आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पंडितजींचे शिष्यत्व स्वीकारले आणि बासरी शिकायला सुरुवात केली. केरळवरून बासऱ्यांचा सेट आणला.स्वरमाला विकत घेतली आणि बासरीचे शिक्षण सुरू झाले. हृदयापासून शिकणारा शिष्य आणि सहृद होऊन शिकवणारा गुरु असा दुग्धशर्करा योग जुळून आला. अगदी एक महिन्यात थंपी बासरी चांगली वाजवू लागले.

त्यांची जिद्द आणि चिकाटी खूप होती. क्लासची वेळ ते कधी चुकवत नसत. एकदा त्यांच्या स्कुटरचा अपघात झाला.त्यांच्या पायाच्या अंगठ्याचे नख पूर्ण निघाले.ते तसेच पंडित एकनाथ ठाकूर सरांच्या घरी क्लाससाठी हजर! पंडितजींचे लक्ष त्यांच्या अंगठ्याकडे गेले आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी घरातील औषधांनी त्यांचा अंगठा स्वच्छ केला.अंगठ्याला मलम लावून पट्टी बांधली. आपल्या गुरूने केलेल्या या सेवा-सुश्रुषेने थंपी भारावून गेले. ते म्हणाले, “आपल्या शिष्यांवर आईसारखे प्रेम करणारे तुमच्या सारखे गुरु मिळणे नशिबात असावे लागते.”

बासरीवर वेगवेगळे राग, गाणी असे शिक्षण सुरु होते. पनवेलच्या जवळपास असलेल्या डोंगरांवर ट्रेकिंगलाही ते पंडितजींसोबत जायचे. एकदा ट्रेकिंगला गेले असता वयाच्या सत्तरीत असलेल्या पंडित एकनाथ ठाकूरांनी माथेरानचा ट्रेक थंपींच्याआधी पूर्ण केला. पन्नाशीत असलेले थंपी पंडितजींच्या पुढे नतमस्तक झाले.

थंपींच्या आयुष्यातील संध्याकाळ खूप सुंदर सुरू होती. अचानक कोरोनाने थैमान घातले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वयाच्या पन्नाशीत असलेले थंपी गेले.

सौ. थंपींना भेटायला पंडितजी गेले तेंव्हा त्यांना थंपींच्या सर्व बासऱ्या, स्वरमाला पंडितजींना दिल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होते. त्या म्हणाल्या, “पंडितजी, थंपी गेले, पण त्यांच्या या बासऱ्या, स्वरमाला तुमच्याकडे कायमस्वरुपी जिवंत राहतील. माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहे.”

आजही अनेक वर्षांनंतर आम्हाला बासरी शिकवताना पंडित एकनाथ ठाकूर थंपींची स्वरमालाच लावतात.त्या रूपाने त्यांचा आवडता शिष्य त्यांना दररोज भेटतो!

- राजेश कापसे

Wednesday, October 2, 2024

भगवद्गीतेचे संस्कार करणारे ऋषितुल्य डॅा. मिलिंद पाटील सर

सरांचे अचानक जाणे मनाला चटका लावून गेले. १९९४ मध्ये पोदार आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर पहिली ओळख झाली ती डॉ. मिलिंद पाटील सरांची. सर हिंदी मध्ये बोलायचे. संस्कृत संहिता सिध्दांत हा विषय सर शिकवत असत. तर्कसंग्रह, सुश्रुत संहिता, अष्टांग संग्रह आणि संस्कृत हे विषय सरांचे आवडीचे. हे अवघड विषय सोप्या पद्धतीने ते शिकवायचे. सरांच्या लेक्चरसाठी सर्वच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असायचे. संस्कृत सारखा अवघड विषय सरांनी सोपा करून शिकवला. पण संस्कृत आणि संहितासिध्दांत याही पलीकडे त्यांच्या कडून मी खूप काही शिकलो.

त्या काळात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जात असे. त्या स्पर्धेत मी भाग घ्यावा असे सरांनी मला सुचवले. मी माझे नाव नोंदवले आणि तयारी सुरू केली. भाषण लिहून झाल्यावर मी ते सरांना वाचायला दिले. ते वाचून त्यांनी मला त्यात सुधारणा सुचवल्या आणि माझी उत्तम तयारी करून घेतली. स्पर्धेला जाताना मी सरांचे आशिर्वाद घ्यायला गेलो, म्हणाले, “तू तुझी तयारी उत्तम केली आहेस. बक्षीसाची अपेक्षा न ठेवता उत्तम भाषण कर. शुभेच्छा!” स्पर्धेत मी जिंकणार का? कोणते बक्षीस मिळणार हे दोन चिंतेत टाकणारे विचार आता गौण झाले होते. नावाजलेल्या अशा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मी प्रथमच सहभागी झालो होतो पण मनात भीती अजिबात नव्हती कारण ती सरांनी सांगितल्याप्रमाणे मी भाषणाच्या परिणामाचा विचार करत नव्हतो. माझे भाषण उत्तम झालं आणि या स्पर्धेत मला पहिले पारितोषिक मिळाले. माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. हे केवळ सरांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाले होते!

माझी पहिल्या क्रमांकाची ट्रॅाफी सरांना दाखवली. सरांनी माझे अभिनंदन केले आणि म्हणाले, “बघ, बक्षीस कोणते मिळणार याचा विचार केला असतास तर भाषणात लक्ष लागले नसते. हे लक्षात ठेव सदैव! भगवद्गीतेमध्ये आहे रे हे सर्व. मी तुला त्याचे आचरण करायला सांगितले एवढेच!”

भगवद्गीता वाचावी आणि समजून घ्यावी असे माझ्या मनात आले. गंगाखेडला गीतेचा १२ अध्याय आम्हाला पाठ करायला लावला होता ,पण त्याचा अर्थ कधीच कळला नव्हता आणि एकदोन वेळा तो म्हणताना चूक झाली म्हणून ओरडा पडला होता त्यामुळे मी भगवद्गीता या ग्रंथाच्या नादी कधी लागलो नाही. पण डॅा. मिलिंद पाटील सरांमुळे मी भगवद्गीता वाचायला लागलो. सरांनी मला संस्कृत श्लोक आणि त्याखाली मराठीत भाषांतर अशी गीता भेट दिली. “हे बघ, गीता वाचताना दोन बिंदू लक्षात ठेवायचे, "

१. अध्याय १: अर्जुन उवाच। दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्।

सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ॥28॥

२. अध्याय १८ अर्जुन उवाच।

नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत।

स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥73॥

आपल्या दररोजच्या जीवनात पहिला प्रसंग अनेकदा येतो. आपण अस्वस्थ, उदास असतो. मनातून हरलेलो असतो, शस्त्र टाकून देतो… पण भगवद्गीता वाचून आणि त्यातील श्रीकृष्णाने दिलेल्या संदेशाचे पालन करून “नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा” ही मनाची अवस्था प्राप्त करून युध्दाला सज्ज व्हायचे असते.

मी अनेक वर्षे पहिला अध्याय ते अठरावा अध्याय असे गीतेचे वाचन केले. गीतेच्या सुरवातीलाच गीता वाचन केल्याने काय फळ मिळते असे लिहिले होते.. की. जो व्यक्ती दररोज १८ अध्याय नित्य पठण करतो त्याला ज्ञान प्राप्ती होते आणि त्याला परमपद प्राप्त होते.… त्याबद्दल मी सरांना विचारले तेंव्हा त्यांचे उत्तर खूप समर्पक होते,” राजेश, ते बाजूला ठेवूनच गीतेचा अभ्यास करायला हवा. गीता फलशृती वाचनाची गोडी लागावी यासाठी आहे, सामान्य लोकांसाठी. नाहीतर ते वाचणारच नाहीत. ज्याला समज आहे त्याला फलशृतीची गरज नाही.”

मी अभ्यास करतो आहे की नाही याकडे सरांचे लक्ष असायचे. अभ्यास न करता, मी उगाच पुस्तके विकत घेत असे आणि अभ्यास करण्याचे नाटकच जास्त करत असे. हे त्यांना लक्षात आले तेंव्हा माझ्यावर ते रागावले नाहीत पण कॅालेजमधील इक्लेअर डे च्या दिवशी चॅाकलेट सोबत जे कार्ड मला त्यांनी पाठवले त्यात लिहिले होते, “"खरश्चन्दन भारवाही भारस्य वेत्ता न तु चन्दनस्य ।" पाठीवर चंदनाचे ओझे वाहणाऱ्या गाढवाला त्या चंदनाचे महत्व कळत नाही. अभ्यास कर, नाटक करू नकोस! मला जे कळायचे ते कळले आणि मी अभ्यासाला लागलो.

नंतर अनेक वर्षे सरांची भेट झाली नाही. मी पनवेलला शंकरा आय हॅास्पिटल मध्ये काम करायला सुरुवात केली आणि पनवेल स्टेशनवर सरांची भेट झाली. सर म्हणाले, “ तू भेटला नाहीस अनेक वर्षे पण तू BAMS नंतर जे लंडनला MSc केलेस आणि वेगवेगळ्या संस्थेत काम केले आहेस त्याबद्दल मला माहिती आहे. माझे लक्ष आहे तुझ्याकडे अजून! “ माझे डोळे पाणावले! माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सर आवर्जून आले होते आणि त्यांनी माझे कौतुक केले.

आज सरांचा वाढदिवस, मी त्यांना फोन करणार होतो आणि मेसेज आला,” सरांचे दुःखद निधन झाले आहे.” अचानक जाण्याने अस्वस्थ झालो.

आयुर्वेद, भगवद्गीता, संस्कृत, हिंदी यावर प्रभुत्व असणाऱ्या आणि त्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि हे सर्व सहज करून शिकवणाऱ्या या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण श्रध्दांजली!

“वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्वाति नरोऽपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही।।”

राजेश कापसे

९८१९९१५०७०

Thursday, September 26, 2024

निर्णय घेणे महत्वाचे, त्याचे परिणाम नंतरच समजतात!

संभाजीनगर (औरंगाबाद) पासून पंधरा कि.मी. अंतरावर असणाऱ्या चितेगाव या लहान गावात मी माझे क्लिनिक सुरु केले होते. सात आठ महिने प्रॅक्टिस केल्यानंतर मला त्याचा कंटाळा यायला लागला आणि काहीतरी वेगळे करावे असे मला सतत वाटत होते. माझी प्रॅक्टिस तशी बरी सुरु होती, कमाई तशी चांगली होत असे. पण त्यात मन रमत नसे. मला वाटायचे की अजून शिकले पाहिजे. त्याचबरोबर मला सामाजिक कामाचीही आवड होती. काहीतरी चांगले काम करायला हवे असेही वाटत असे. मी जे काही करतोय ते फक्त स्वतःसाठी आहे याची खंत वाटत असे. 

संभाजीनगर (औरंगाबाद) येथे असलेल्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाबद्दल आणि त्यांच्या सामाजिक कामाबद्दल बरेच ऐकले होते. माझे काही मित्रही तिथे काम करायचे. माझे क्लिनिक बंद करावे आणि डॉ. हेडगेवार रुग्णालयात काम करावे असे अनेक वेळा मनात येत असे. पण त्यात अनेक अडचणी होत्या. स्वतःची चांगली सुरु असलेली प्रॅक्टिस बंद करून नोकरी करणे हा तसा मोठा निर्णय होता. कारण प्रॅक्टिस सुरु करण्यासाठी बराच खर्च झाला होता. त्यामुळे अचानक ती बंद कारण्याचा निर्णय घरातील कुणीही मान्य केला नसता. त्यापेक्षाही एक महत्वाचा प्रश्न होता, नोकरीत पगार किती मिळणार हा. प्रशिक्षणार्थी म्हणून सुरुवातीला पगार नक्कीच कमी मिळणार होता. 

माझे क्लिनिक बंद करून नोकरी करण्याचा निर्णय जेंव्हा मी घरी सांगितला तेंव्हा आभाळ कोसळले. सर्वांनी त्याला कडाडून विरोध केला. माझ्या मनात "To be not to be" हा गोंधळ सुरु होता. या कठीण काळात माझी ओळख डॉ.अभय शिरसाट यांच्याशी झाली. डॉ.अभयचे माझ्यासारखेच बी.ए.एम.एस.पर्यंत शिक्षण झाले होते आणि तो संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये स्वतःचे क्लिनिक चालवत होता. अत्यंत शांत, सुस्वभावी असा डॉ.अभय खूप बॅलेन्सड आहे आणि त्याची विचार करण्याची पद्धत तर्कनिष्ठ (रॅशनल) होती. माझ्या मनातील सर्व गोंधळ मी त्याच्यासमोर व्यक्त केला. माझे सगळे बोलणे ऐकून घेतल्यानंतर तो म्हणाला, "राजेश, निर्णय घेणे महत्वाचे असते. आपण घेतलेला निर्णय बरोबर अथवा चूक आहे की नाही हे केवळ निर्णय घेतल्यानंतरच ठरते. पण निर्णय न घेणे किंवा अनिर्णित असणे ही अवस्था मात्र अत्यंत घातक असते. कोणताही निर्णय घेतल्यानंतर त्याचे चांगले वाईट परिणाम हे होतच असतात आणि त्याची मानसिक तयारी आपण करणे गरजेचे असते. त्यामुळे तुझ्या मनातला जो गोंधळ सुरु आहे तो केवळ निर्णय घेतल्यानंतरच संपणार आहे." 

मला त्याचे म्हणणे पटले. त्या रात्री बराच विचार केल्यानंतर माझे चितेगावचे क्लिनिक बंद करायचे आणि डॉ. हेडगेवार रुग्णालयात नोकरीसाठी अर्ज करायचा आणि मिळाली तर तेथे जॉईन व्हायचे असा निर्णय मी घेऊन टाकला. मन एकदम शांत झाले आणि नवीन मार्ग दिसायला लागला. अर्थात त्याचे चांगले वाईट परिणाम असणारच होते. 

कालांतराने सहा वर्ष डॉ. हेडगेवार रुग्णालयातील नोकरी सोडून मुंबईत नवीन नोकरी करण्याचा आणि मुंबईत कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा अत्यंत कठीण निर्णय घेण्याची जेंव्हा वेळ आली तेंव्हा मला डॉ. अभयचा सल्ला आठवला, "निर्णय घेणे महत्वाचे, परिणाम नंतरच कळतील!" मी मुंबईत परतलो आणि तिथे कायम स्वरूपी स्थायिक झालो. पुढे लंडनला शिकायला जाण्याचा निर्णय असेल किंवा नायजेरियामध्ये काम करण्याचा निर्णय असेल अथवा कल्याणहून डायरेक्ट दादरला स्थायिक होण्याचा निर्णय असेल मी ते सर्व निर्णय हिमतीने घेतले. कारण "निर्णय घेणे महत्वाचे असते" हा डॉ. अभयचा सल्ला मला सदैव आठवतो आणि प्रेरणा देतो.

राजेश कापसे

९८१९९१५०७०

https://rajeshkapsebooks.com/

आयुष्यात अनेक गोष्टी पॅकेज डीलसारख्या असतात : रत्नाकर पाटील

माझ्या पहिल्या नोकरीत साधारणतः पाच वर्षे काम केल्यानंतर माझ्या कुरबुरी वाढायला लागल्या. जरा खटके उडायला लागले. स्वतःकडून आणि संस्थेकडून अपेक्षा जास्त वाढल्या. पण ज्या चौकटीत मी काम करत होतो त्यामध्ये माझ्या वाढलेल्या आर्थिक अपेक्षा आणि हवी असलेली पदोन्नती त्यावेळी पूर्ण होणे शक्य नव्हते. मी जरा अधिकच अस्वस्थ होतो. त्यावेळी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे विद्यार्थी परिषदेचे प्रतिभा संगम हे साहित्य संमेलन होते.त्यासाठी रत्नाकर दादा आला होता. मी आवर्जून त्याला भेटायला गेलो.

नेहमीप्रमाणे त्याने "काय मित्रा, कसा आहेस?" असे म्हणून स्वागत केले. मी जरा नाराज असल्याचे त्याला जाणवले. "काय! सगळे ठीक सुरु आहे ना?" असे त्याने विचारले. मी माझ्या मनातील खदखद त्याच्यासमोर व्यक्त केली. माझ्या वाढत्या आर्थिक गरजा, मला अपेक्षित असलेली पदोन्नती आणि मी 'बी.ए.एम. एस'. असल्यामुळे माझ्या प्रगतीसाठी असणाऱ्या मर्यादा इ. मी त्याला सांगितले.

रत्नाकरदादाची प्रतिक्रिया खूप छान होती. तो म्हणाला," हे बघ, आयुष्यात अनेक गोष्टी ह्या पॅकेज डीलसारख्या असतात. पॅकेज म्हटले की त्यात चार चांगल्या वस्तू असतात, दोन कमी दर्जाच्या आणि काही अगदीच कामचलाऊ असतात. पॅकेज म्हणून आपण ते लगेच विकत घेतो. पण उघडल्यानंतर मात्र लक्षात येते की सगळेच काही चांगले नाही. तरीपण आपण ते स्विकारतो. जे चांगले आहे ते वापरतो आणि जे अगदीच कामचलाऊ असते ते बाजूला टाकतो. नोकरी, व्यवहार, मैत्री या सगळ्यात पॅकेज डील कुठेतरी असतंच. त्यात सगळेच मनासारखे आणि उत्तम कधीच मिळत नाही. जर ते टिकवायचे असेल तर चांगले ते घ्यायचे आणि वाईट ते सोडून द्यायचे. असे केले तरच दीर्घकाळ समाधानाने काम करता येते. पण त्यातले सगळेच नकोसे झाले तर मात्र पर्याय शोधणे गरजेचे असते. कारण आनंदी असणे गरजेचे तरच मजा आहे यार. बघ विचार करून..." आम्ही चहा घेतला आणि मी निघालो.

रत्नाकरदादाने सांगितलेल्या पॅकेज डीलच्या कन्सेप्टचाच मी दिवसभर विचार करत होतो. माझ्या त्या नोकरीत अनेक चांगल्या गोष्टी होत्या. सुरक्षितता होती. समाजासाठी काहीतरी उत्तम करत असल्याचे समाधान होते. चांगले सहकारी होते. काही अडचणी होत्या, नक्कीच. पण पॅकेज डीलप्रमाणे सगळेच कसे चांगले असेल. नंतर मी एक वर्ष तिथे काम केले. पण एक वेळ अशी आली की हाताशी असलेले पॅकेज डील बाजूला सारून त्यातून बाहेर पडून थोडे मोठे पॅकेज डील स्विकारायचे ठरवले.मी नोकरी सोडली. मुंबईत आलो. नवीन ठिकाणी नवे पॅकेज डील होते.पगार भरपूर होता. पद, प्रतिष्ठा होती, पण सुरक्षितता नव्हती. समाधान नव्हते.शेवटी हेही एक पॅकेज डीलच होते. थोडे गोड, थोडे खारट, थोडे कडू स्विकारणे गरजेचे होते!

राजेश कापसे

९८१९९१५०७०

https://rajeshkapsebooks.com/

Friday, September 20, 2024

आभाळा एवढी मोठी स्वप्नेही प्रत्यक्षात आणता येतात : डॉ अनंत पंढरे

डॉ. हेडगेवार रुग्णालयात दीड वर्ष विविध विभागात काम केल्यानंतर मला तिथे पर्मनन्ट करायचे असा निर्णय झाला. माझी नोकरी पक्की झाली. रुग्णालयाच्या नागरी सेवा वस्ती प्रकल्पावर वैद्यकीय अधिकारी म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली. रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक या जबाबदारी व्यतिरिक्त, नागरी सेवा वस्ती या प्रकल्पाचे पालक म्हणून डॉ अनंत पंढरे सर काम बघायचे. रुग्णालयात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतांना सरांसोबत ओळख झाली होती.त्यांचे भारदस्त व्यक्तिमत्व, प्रभावी आवाज, अनेक नामवंत व्यक्तींसोबत त्यांचा असलेला परिचय, रुग्णालयासाठी त्यांनी उभा केलेला निधी, या आणि अश्या अनेक गोष्टींमुळे त्यांच्याबद्दल आम्हां सर्वांमध्ये एक आदरयुक्त भीती होती.

माझी नागरी सेवा वस्ती प्रकल्पावर नियुक्ती झाल्यानंतर त्या प्रकल्पाचे पालक या नात्याने त्यांनी मला भेटायला बोलावले. मनात भीती होती.छातीत धडधडत होते. मी त्यांच्याकडे संकोचलेल्या अवस्थेत गेलो. त्यांच्या सहाय्यकाला सांगितले आणि प्रतीक्षागृहात त्यांच्या निरोपाची केबिन बाहेर वाट बघत बसलो. त्यांच्या सहाय्यकाने त्यांना मी आल्याचे सांगितले. आश्चर्य म्हणजे सर स्वतः बाहेर आले. त्यांनी माझे स्वागत केले आणि म्हणाले "काय राजेश, काय म्हणतोस?कसा आहेस? अरे एवढा घाम का आहे तुझ्या कपाळावर? बस.पाणी घे." त्यांच्या केबिनमध्ये हेडगेवार रुग्णालयाच्या त्यावेळी तयार झालेल्या आणि भविष्यातील भव्य वास्तूचे चित्र होते. 

ते म्हणाले "राजेश अभिनंदन! तुला शुभेच्छा देण्यासाठी मी बोलावले आहे. तू जे नागरी सेवा वस्त्यांमध्ये काम करणार आहेस ते तेथील लोकांसाठी आणि संस्थेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी तुला शुभेच्छा!" सरांनी मला एक सुंदर ग्रीटिंग कार्ड दिले, त्यावर त्यांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिले होते, "अंत्योदयासाठी हार्दिक शुभेच्छा! आपण सोबत मिळून मोठे काम करू.ऑल द बेस्ट!" आमची भेट संपली आणि भारावलेल्या अवस्थेत मी तेथून बाहेर पडलो.

माझे काम सुरु झाले. सरांसोबत प्रत्येक आठवड्यात आमची आढावा बैठक असे. त्यात ते आमच्यासमोर सदैव मोठे आव्हान ठेवायचे. प्रत्येक काम हे जागतिक दर्जाचे आणि भव्य असले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. त्यासाठी लागेल ते सर्व उभे करण्याची त्यांची तयारी असायची. मिलिंदनगर या सेवावस्तीमध्ये वस्ताद लहुजी साळवे आरोग्यकेंद्राची नवीन इमारत बांधायची होती. डॉ. दिवाकर कुलकर्णी सर म्हणाले, "आरोग्यकेंद्राची इमारत लहुजींचे व्यक्तिमत्व प्रकट करणारी असावी. त्यांचे ते स्मारक व्हावे." डॉ पंढरे सरांनी सर्वांशी चर्चा केली आणि वस्ताद लहुजी साळवे यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून ती इमारत कशी असेल याबद्दल वास्तुविशारदाला कळवले. वास्तुविशारदाने जेव्हा इमारतीचा आराखडा आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले तेव्हा संस्थेतील अनेकांनी असे मत व्यक्त केले की, "सेवावस्तीतील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एवढा खर्च का करायचा? साधी छोटी अशी इमारत बांधा खूप झाले." पण सर त्यांच्या मतावर ठाम होते.जे करायचे ते भव्यच असायला हवे, त्यात कोणतीही कसूर नको. या       इमारतीसाठी त्यांनी निधी उभा केला आणि एक भव्य स्मारक "वस्ताद लहुजी साळवे आरोग्य केंद्र" या रूपाने दिमाखात उभे राहिले. हे सर्व काम डॉ. हेडगेवार रुग्णालयाची त्यांची प्रमुख जबाबदारी सांभाळून ते करत असत. Passion या इंग्रजी शब्दाचा अर्थ डॉ अनंत पंढरे सरांच्या कामाची पद्धत अनुभवताना मला समजला!

काही दिवसांनी मला डॉ दिवाकर कुलकर्णी सर यांनी HIV-AIDS जनजागृती प्रकल्पाची जबाबदारी दिली. जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने काही कार्यक्रम करायचे होते. मी एक लहान रॅली करावी असे ठरवले आणि त्याबद्दल डॉ अनंत पंढरे सरांना सांगायला गेलो. सर म्हणाले, "लहान का? आपण संपूर्ण संभाजीनगर (औरंगाबाद) शहराला कळेल असे भव्य काहीतरी करू." क्षणाचाही विलंब न करता ते मला त्यांच्या कारमधून संभाजीनगर (औरंगाबाद)च्या प्रमुख अशा क्रांती चौक येथे घेऊन गेले आणि क्रांती चौक ते देवगिरी कॉलेज अशी भव्य मॅरेथॉन आयोजित करायचे नियोजन त्यांनी मला समजावून सांगितले. १ डिसेंबर रोजी या मॅरेथॉनसाठी संभाजीनगर (औरंगाबाद) मधील डिस्ट्रिक्ट कलेक्टर, कमिशनर, खासदार, आमदार, महापौर आणि सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. तो कार्यक्रम त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला!

HIV-AIDS या विषयावर काम करत असताना मी "Impact of Behaviour Change Communication on Slum Population " हा एक रिसर्च पेपर लिहिला आणि तो जपान मध्ये होणाऱ्या एक कॉन्फरंससाठी पाठवला आणि आश्चर्य म्हणजे त्याची निवडही झाली पण मला स्कॉलरशिप मिळाली नव्हती. मी हे सरांना सांगायला गेलो. क्षणार्धात ते म्हणाले, "राजेश,  २ जुलैला हा रिसर्च पेपर तू जपान येथील कोबे येथे सादर करायला जायचे आहेस! मी तुला सर्व ती मदत करतो." माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता! माझ्यासाठी असे काहीतरी अशक्यप्राय  होते कारण मी परदेशात सोडा, विमानानेही कधी प्रवास केला नव्हता! त्यात जपानला जाणे हे स्वप्नवतच होते. पण पंढरे सरांनी ठरवले की ते कितीही अशक्यप्राय असले तरीही प्रत्यक्षात येतच असे. केवळ एका महिन्यात त्यांनी माझ्या जपानवारीसाठी लागणाऱ्या निधीची व्यस्था केली आणि २ जुलै २००५ मध्ये मी माझा रिसर्च पेपर कोबे, जपान येथे सादर केला. माझे सादरीकरण झाल्यानंतर मी सरांना फोन केला. त्याच दिवशी सरांचा वाढदिवस होता. सर म्हणाले, "अभिनंदन राजेश! अभिमान वाटतो तुझा.माझ्या वाढदिवसाचे हे सर्वात मोठे गिफ्ट आहे."  ज्युनियरला डावलून स्वतः परदेशात जाणारे बॉस अनेकांनी बघितले असतील, पण माझ्यासारख्या ज्युनियरला परदेशात पाठवणाऱ्या बॉसबरोबर मी काम केले आहे याचा मला अभिमान वाटतो!

डॉ.हेडगेवार रुग्णालयातील अत्यंत नाविन्यपूर्ण अशी ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असणारा "सेवाव्रती" हा उपक्रम, जागतिक दर्जाची "दत्ताजी भाले" रक्त पेढी किंवा "संगणक प्रज्ञा" हा सेवावस्तीतील मुलांसाठी सुरु केलेला प्रकल्प, आसाममधील भव्य हॉस्पिटल  या आणि अश्या असंख्य प्रकल्पांची संकल्पना तयार  करणे, त्यासाठी लागणार निधी उभा करणे आणि ते उत्तम पद्धतीने चालतील यासाठी प्रयत्न करणे हे काम सर अव्याहतपणे करत आहेत.

अनेक वर्षांनी नुकताच मी डॉ.हेडगेवार रुग्णालयात काही कामानिमित्त गेलो होतो. २३ वर्षांपूर्वी डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या पूर्णाकृती इमारतीचे जे चित्र सरांच्या   केबिनमध्ये मी बघत असे नेमकी तशीच भव्य इमारत पाच एकर जागेत दिमाखाने उभी राहिली होती आणि एवढेच नाही तर "श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज" च्या त्याहूनही मोठ्या प्रकल्पाचे काम सुरु झाले होते.

अनंत भव्य दिव्य स्वप्नं प्रत्यक्षात आणणाऱ्या डॉ. अनंत पंढरे सर यांच्याबरोबर मला काही वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि मी मोठी स्वप्ने बघून प्रत्यक्षात आणायला शिकलो. ईश्वराचे रूप अनादी-अनंत असते हे मी ऐकले आहे. अनादी नाही पण "अनंत" रूप मी जवळून बघितले आहे

Saturday, September 14, 2024

अंधत्व समजून घेताना!

२ मे २००८, केतन सोबत साईटसेव्हर्स या संस्थेत रूजू झालो. या संस्थेमध्ये नोकरी  मिळण्यासाठी जी मुलाखत घेण्यात आली होती त्यामध्ये सामुहीक चर्चा (ग्रुप डिस्कशन ) हा एक  महत्वाचा भाग होता. मुलाखतीसाठी निवड झालेले सर्व उमेदवार त्यात सहभागी झाले होते. चर्चेचा विषय होता, “अंध व्यक्तींचे  शिक्षण”. मी जे काही थोडेफार वाचले होते त्याआधारे बोलायला सुरूवात केली. “ अंध व्यक्तींना शिक्षण देण्यासाठी ब्रेल भाषेचा वापर केला पाहिजे, ॲाडीओ बुक्सचे ग्रंथालय असले पाहिजे, त्यांच्यासाठी वेगळ्या शाळा असायला हव्यात इ .” मुलाखतीसाठी जे इतर उमेदवार होते त्यामध्ये एक अंध व्यक्ती होती. माझ्या नंतर त्या अंध व्यक्तीने बोलायला   सुरुवात केली. ते म्हणाले, “Nothing about us without us” हे वाक्य आधी लक्षात ठेवा. आमच्या बद्दल विचार करणार असाल तर तो आमच्या सहभागा- शिवाय करू नका आणि हो ब्रेल ही लिपी आहे भाषा नाही आणि अंधांसाठी वेगळ्या शाळा असाव्यात पण त्या फक्त प्राथमिकच, त्यानंतर त्यांना सर्व मुलांसोबतच शिक्षण दिले पाहिजे.”  हे सर्व केतन कोठारी अस्खलित इंग्रजीमध्ये ब्रिटीश लोकांच्या शैलीत बोलत होता. माझे अंध व्यक्ती आणि त्यांचे जग याबद्दलचे अज्ञान केतन कोठारीच्या एकदोन वाक्यातच स्पष्ट झाले.ही नोकरी मला मिळणार नाही हे मला सामुहिक चर्चेच्या सत्रानंतर मनोमन वाटायला लागले. केतनच्या व्यक्तीमत्वाने मी मात्र प्रभावित झालो तो कायमचा. नंतर माझे प्रेझेंटेशन आणि मुलाखत चांगली झाली पण केतन समोर मी काही टिकणार नाही हे माझ्या लक्षात आले. पुढील कांही दिवसांत ईमेल आली आणि माझी निवड झाली आहे आणि २ मे ला नोकरीवर रूजू व्हायचे आहे असे त्यात लिहीले होते. मनात विचार आला, “ एकच जागा होती, जर माझी निवड झाली असेल तर केतनला डावलले गेले असणार!” 
मी २ मे २००८ रोजी मालाड येथे असणाऱ्या साईटसेव्हर्सच्या कार्यालयात रूजू होण्यासाठी गेलो. तिथे केतनही जॅाईन होण्यासाठी आला होता. नंतर कळले की आधी एकच पोस्ट होती पण आम्हा दोघांचे इंटरव्ह्यू या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आवडले आणि त्यांनी आम्हां दोघांनाही कामावर घ्यायचे ठरवले. मला एक नवीन मित्र मिळाला. 

एका अंध व्यक्ती सोबत काम करण्याचा तसा हा माझा पहिलाच प्रसंग होता. हा प्रवास कसा करणार? ईमेल, संगणकाचे काय? ते कसे काय जमणार, जेवणाचे काय? आणि हा देशभर प्रवास कसा करणार? पैशांची देवाण घेवाण … असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते. 

आम्ही सोबत काम करायला सुरुवात केली आणि एक नवीन जग माझ्यासमोर उलगडू लागलं. केतनला कंप्युटर दिला गेला आणि त्यावर त्याने जॅाज नावाचे एक सॅाफ्टवेअर इन्स्टॅाल करून घेतले. केतन अत्यंत शिताफीने संगणक सुरू करायचा आणि नंतर जॅाजच्या मदतीने ते तो वापरायचा. ईमेल वाचणे, त्याला उत्तरे देणे, प्रोजेक्ट प्रपोजल तयार करणे अशी सर्व कामे तो करत असे. त्याने संगणक सुरू केले की जॅाजचा आवाज सुरू होत असे आणि त्या सॅाफ्टवेअरच्या सुचनांनुसार तो संगणकावर काम करत असे. जॅाज त्याला आलेले ईमेल वाचत असे आणि त्याने जे त्या मेलला उत्तर लिहीले आहे ते वाचून दाखवत असे. कानाला हेडफोन असायचा पण एक दोन तास काम केल्यानंतर तो हेडफोन काढून ठेवायचा. जॅाजचा आवाज सुरू असल्याने मला माझे काम करतांना त्रास होत असे. मी एकदा चिडून म्हणालो, “केतन अरे हेडफोन लाव ना. त्रास होतोय त्या आवाजाचा.” त्याचे उत्तर होते, “मित्रा फक्त पाच मिनिटे झाली आहेत हेडफोन काढून तर इतका कंटाळलास. तो आवाज हेच माझं आयुष्य आहे!” मी निःशब्द झालो. मला माझीच लाज वाटली. त्यानंतर मी त्याला कधीच त्या आवाजावरून बोललो नाही. नंतर माझीही त्या आवाजाशी मैत्री झाली. एकदा तो सहज म्हणून गेला, " जब बच्चा जन्म लेता है तो वह रोता है और सब सगे संबंधी खुषीसे हसते है! पर, बच्चा अगर अंधा हो तो बच्चा तो रोता है....मां बाप भी रोते है..." माझे डोळे पाणावले!

मला सतत वाटायचे माझा स्वतःचा लॅपटॅाप असावा. मी एकदा केतनसमोर ते व्यक्त केले, एका आठवड्यात या माझ्या मित्राने उत्तम स्थितीत असलेला लॅपटॅाप अत्यंत कमी किमतीत मला मिळवून दिला.
केतन ॲाडिओ बुक्स ऐकायचा. त्याच्याकडे अशा पुस्तकांची मोठी लायब्ररीच होती. मी कल्याण ते मालाड असा प्रवास करत असे. पुस्तक वाचण्या ऐवजी मी ॲाडिओ बुक्स ऐकावे असे ठरवले. केतनला सांगितले, तो म्हणाला आठवडाभर थांब. त्याने लॅमिंगटन रोडवर    जाऊन माझ्यासाठी एक एम पी ३ प्लेअर आणला आणि त्यात काही ॲाडिओ बुक्स टाकून दिली. त्याचे आभार कसे मानावे ते मला कळत नव्हते! 

केतनने राज्यशास्त्र विषयात एम.ए. केले होते आणि त्यात त्याला मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदकही मिळाले होते हे विशेष! आणि साइटसेव्हर्स मध्ये काम करताना तो सोशल आन्त्रप्रिनरशीपमध्ये नरसी मोन्जी कॅालेजात एम.बी.ए करत होता. क्रिकेट,साहित्य ते राजकारण अशा अनेकविध विषयांवर आमच्या गप्पा होत असत. 

आम्ही लोकलने सोबत प्रवास करत असू. तो माटुंग्याला उतरायचा. बांद्राचा नाला आला की तो लगेच म्हणायचा, “देख बांद्रा आ गया.” मी त्याला विचारले, कसे ओळखलेस तू? म्हणायचा “अरे सोपे आहे. एवढा घाण वास फक्त इथेच येतो."

माझ्या अनेक गुजराथी मित्रापैकी, गुजराथी भाषेच्या प्रभावाशिवाय स्वच्छ मराठी आणि उत्तम इंग्लिश बोलणारा हा माझा एकमेव मित्र!

आम्ही सोबत प्रवास करतांना मी त्याचा हात पकडायचो आणि त्याला सोबत घेऊन जायचो. एक दिवस मला न दुखावता तो म्हणाला असे ओढत जाऊ नकोस रे,मला चालता येते. त्याने अंध व्यक्तीला सोबत घेऊन कसे चालायचे याचे साईटेड मॅन टेक्निक समजावून सांगितले. मग मी त्याचा उजवा हात माझ्या डाव्या हाताजवळ ठेवायचो, तो माझा डावा दंड पकडायचा आणि आम्ही चालायचो, रस्त्यात खड्डा, पायरी असेल तर त्याला मी सांगयचो. 

कधी कधी आम्ही चर्चगेट जवळ असलेल्या एका हॅाटेलमध्ये जेवायला जात असू. स्टेशनला उतरल्यानंतर त्या हॅाटेलपर्यंतचा रस्ता केतन मला दाखवायचा. कधी बुफे असेल तर तिथे काय पदार्थ ठेवले आहेत हे सांगूनच त्याला वाढणे अपेक्षित असे. ‘पंगत’ ही भारतीय जेवणाची पध्दतीच सर्वसमावेशक आहे हे त्याचे ठाम मत असे. आम्ही सोबत एक दोन चित्रपटही बघितले. मला प्रश्न पडत असे की हा त्या चित्रपटांत काय बघणार? त्यावर केतनचे उत्तर असायचे, “चित्रपट बघायचा नसतो. अनुभवायचा असतो.” आम्ही कुठे मिटींगला गेलो की तो  म्हणायचा, “राजेश, मला फक्त खुर्चीला स्पर्श करून दे, मी माझा बसू शकतो.” 

आम्ही बऱ्याच वेळा परराज्यात प्रवासाला सोबत जात असू. जेंव्हा हॅाटेल मध्ये मुक्काम असायचा तेंव्हा त्याच्या रूममध्ये कुठे काय आहे ते त्याला दाखवून दिले की काम झाले. कधी कधी लाईट गेल्यानंतर माझी पंचाईत होत असे. लाईट कधी येणार याची मी अस्वस्थ होऊन वाट बघत असे. त्यावेळी केतन म्हणायचा “लाईट गेल्या नंतर तू अपंग होतोस. मला त्याचा काहीच त्रास होत नाही. हा फायदा आहे बघ अंध असण्याचा.” अशावेळी मी स्तब्ध होऊन त्याच्याकडे बघत असे. 

दर तीन महिन्यांनी त्याचा रेल्वेचा पास काढण्यासाठी मी त्याच्या सोबत जात असे. तो अंध आहे हे त्या रेल्वे क्लार्कला कळत असे पण अपंगत्व प्रमाणपत्राची प्रत द्यावी लागत असे आणि त्याची मुळ प्रतही दाखवणे गरजेचे असे. हे नसेल तर पास मिळायचा नाही. केतन म्हणायचा,” अरे प्रत नसेल तर झेरॅाक्सच्या दुकानात धक्के खात जा आणि परत या हे नेहमीचेच असते. जरा जास्त वेळ काढूनच मी ही कामे करतो." 

सहा वर्ष आम्ही सोबत काम केले आणि मी अंधत्व अनुभवले. त्यातले चढ उतार बघितले. केतन आता सेंट झेवियर्स कॅालेजात मोठ्या पदावर काम करतो. केतननी दिलेली ॲाडीओ बुक्स, लॅपटॅाप, उत्तम इंग्रजी बोलण्यासाठी केलेले मार्गदर्शन आणि त्याहीपेक्षा अत्यंत खडतर स्थितीमध्ये हसत खेळत जगण्याचा त्याचा स्वभाव यामुळे मी समृध्द झालो.