ऋतू बदलला की सर्दी, शिंका, ताप, खोकला, दम लागणे,मग सीट्रीझीन, पॅरासिटेमॅाल, अँटीबायोटीक, नेब्युलायझेशन, स्टीरॅाईडचा अस्थमासाठीचा पंप असा साधारणत: अनेक वर्षांपासूनचा हा माझा आरोग्यक्रम. अगदी वर्षातून किमान चार वेळा नक्कीच असतो.मग काही दिवस रजा, कामावर रूजू झाल्यानंतर अस्वस्थ करणाऱ्या शिंका हे नेहमीचेच असते.
आयुर्वेदाचे शिक्षण घेऊनसुध्दा मी कधी आयुर्वेदिक पध्दतीने या माझ्या आजारावर उपाय केले नाहीत. कारणे खुप होती.वेळ जास्त लागेल, कामावर लवकर रूजू होता येणार नाही, खर्च अधिक होईल,बरा होईन की नाही याबद्दलही मनात शंका असे.
यावेळी वसंत सुरू झाला आणि अगदी ठरल्याप्रमाणे मला सर्दी झाली. हे मला नवीन नव्हते. पण यावेळी मी सीट्रीझीन, अँटीबायोटीक, पॅरासिटेमॅाल किंवा स्टेरॅाईड स्प्रे घ्यायचे नाहीत आणि केवळ आयुर्वेदातील सिध्दांतानुसार स्वत:वर उपचार करायचे ठरवले.
शिंका, नाकातून शेंबूड हे सुरू झाले. मी मीठ, हळद आणि कोमट पाणी वापरून दिवसातून दोन वेळा जलनेती करायला सुरुवात केली. यामुळे सायनस व नाकातील सर्व कफ निघून जाई आणि नाक स्वच्छ होत असे. कोणताही बाम किंवा तत्सम नाक मोकळे करणाऱ्या औषधांचाही वापर टाळला ( हे बामवाले स्वतःला आयुर्वेदिक म्हणत असले तरी असा कोणताही संदर्भ आयुर्वेद ग्रंथात नाही. किमान सर्दी झाल्यानंतर बाम लावा असे मी तरी कधीच वाचलेले नाही!) जलनेतीमुळे नाक चोंदणे हा प्रकारही घडला नाही. घसाही स्वच्छ होत असे.
मी दुसरा उपाय केला तो म्हणजे एक दिवस संपूर्ण विश्रांती घ्यायचे ठरवले. फोन नाही, लॅपटॅापवरील काम नाही, प्रवास नाही, मिटींग नाही इ.
तिसरा उपाय म्हणजे लंघनाचा. मी चोवीस तास काहीही खाल्ले नाही. प्रतिःश्याय बरा करण्यासाठी लंघनाचा उपाय आयुर्वेदात सांगितला आहे. लंघना दरम्यान मी गरम पाणी प्यायलो.
याचा परिणाम असा झाला की, मी तिसऱ्या दिवशी ६०% बरा झालो, चवथ्या दिवशी पुर्णपणे बरा झालो आणि पाचव्या दिवसापासून आवाजही पूर्वीसारखा झाला.
एकही पैसा न खर्च करता आयुर्वेदातील सिध्दांत वापरून मी केवळ पाच दिवसांत पूर्ण बरा झालो. Miracle of Ayurveda!
(सूचना : असा प्रयोग केवळ तज्ञ वैद्य अथवा डॅाक्टरच्या सल्ल्यानेच करावा.)
No comments:
Post a Comment