Monday, December 23, 2024

संगीत आपल्याला वर्तमानात आणते!

मला अनेक वेळा प्रश्न पडायचा, आपण गाणे का ऐकतो? गाणे भान हरपून ऐकतो. नेमकं काय असतं त्यात भान हरपण्यासारखं? जेव्हा बासरी शिकायला लागलो तेव्हा त्याचा उलगडा झाला. माझ्या मनात दिवसभरात झालेल्या घटनांबद्दलचे, कधीकाळी झालेल्या अपमानाचे तर कधी मिळालेल्या पुरस्काराचे आणि कौतुकाचे विचार घोंगावत असतात. एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला बघितले की लगेच मन दूर भविष्यात घेऊन जाते. ही विचारांची भूत आणि भविष्यकाळातील ये जा कायमची सुरु असते. त्यात आनंद, दुःख, ताण-तणाव, उदासीनता अशा अनेक गोष्टी असतात आणि या विचारांचा अतिरेक झाला की आपण अस्वस्थ होतो.

या विचारांच्या धावपळीत मात्र आपण वर्तमानात खूपच कमी वेळ असतो.आपले मन कधी भविष्यात तर कधी भूतकाळात, कधी कुणाबद्दल द्वेष तर कुणाबद्दल प्रेम यात असते.भानावर येणे जमतच नाही, ते कायम पुढे मागे असते. ते कधी हरवतही नाही. शांत झोप लागल्यानंतर जरा विश्रांती मिळते पण जागेपणी मात्र मनाचे उपदव्याप सुरूच असतात. याबद्दल खूप वेळा विचार केला पण उत्तर कधी मिळाले नाही.

एकदिवस बासरी वाजवताना मला षड्ज वाजवता येत नव्हता. गुरुजी म्हणाले, डॉक्टर षड्ज नीट लागायला हवा असेल तर तुम्ही इथे शरीराने आणि मनाने उपस्थित असायला पाहिजे. मी त्यावेळी हॉस्पिटलच्याच विचारात होतो. माझा फोन कधी वाजेल आणि कधी हॉस्पिटलला जावे लागेल हाच विचार मनात होता. जेंव्हा त्यातून स्वतःला सावरले, फोन बंद केला आणि तंबोऱ्यासोबत षड्ज लावला आणि तो लागला तेव्हा मी फक्त तिथे त्या स्वरासोबत होतो.भान हरपून...वर्तमानात! गाणं आपल्याला रिलॅक्स करत, कारण त्यात आपण आपल्याला विसरतो आणि केवळ वर्तमानात असतो त्या गाण्यासोबत, त्या स्वरांसोबत!

-राजेश कापसे

९८१९९१५०७०

1 comment:

  1. छान लेख. 👌संगीत काही क्षण तरी आपल्याला आपल्या ताण-तणावापासून दूर ठेवते. मन शांत, स्थिर करते.

    ReplyDelete