






वयाच्या चाळीशीत टक्कल पडायला सुरुवात झाली. सुरुवातीला वाटलं — “अरे दोन केस गेले तर काय होतं?”
पण ४५ व्या वर्षी परिस्थिती अशी झाली की डोक्यावरचा “प्लॉट” पूर्ण रिकामा झाला.
आरशात बघताना वाटायचं — “हा मी की माझ्या आजोबांचा फोटो?”
हॉस्पिटलमध्ये माझा डॉक्टर मित्र Hair Transplant करून आला. ६–७ महिन्यांत तर त्याचे केस असे भरले की पाहून मला वाटलं — अरे बाप रे, हा तर परत २५ चा झालाय!
तेव्हा मीही मनाशी ठरवलं, “बस्स! आता माझ्या टकलावरही शेती करायचीच.”
पण मुद्दे कठीण:
खर्च — भारी!
संपूर्ण टक्कल करणे — दु:खद!
दाढीचे केस उपटणे — भीषण!
लोकल अॅनेस्थेशिया — सुयांचा पाऊस!
मित्र म्हणाला “कर रे! काही होत नाही!”
बायको म्हणाली “करायलाच पाहिजे! मला माझा नवरा पुन्हा तरुण दिसायला हवा!”
(आणि इथेच माझा निर्णय पक्का झाला.)
Transplant center मध्ये गेल्यावर माझी तपासणी झाली. मग माझे केस टक्कल करून मार्किंग सुरू झाले.
लोकल अॅनेस्थेशिया देताना इतक्या सुया टोचल्या की मला वाटलं — “हे भयंकर आहे. शक्य होईल का मला?”
दाढीचे केस काढताना काय वेदना! आणि मग तेच केस सुयांनी टोचून माझ्या टकलावर रोपण!
मी मनात म्हणत होतो — “डोक्यावर शेती करण्यापेक्षा ऊसाची शेती केली असती तर बरे झाले असते. किमान गोड तरी लागले असते!”
दुसऱ्या दिवशी उठलो तर चेहरा पूर्ण सुजलेला!
क्षणभर वाटलं — “हे काय… केस वाढवायला आलो होतो आणि सुजलेला भयंकर चेहरा घेऊन घरी आलो?”
डॉक्टर शांत स्वरात म्हणाले : “दोन दिवसात उतरते.”
मी घाबरलेला: “माझं आयुष्य उतरतंय की सुज उतरतेय?”
आठवड्यानंतर खपल्या काढल्या. मग सुरू झाली प्रतिक्षा…
दररोज आरशात बघणे सुरू झाले — जणू काही IPL auction मधला खेळाडू जसा आपला नंबर कधी लागतोय म्हणून वाट पाहतो, तसा मी केस कधी उगवतील म्हणून वाट बघत होतो.
५–६ महिन्यांनी शेवटी पहिला केस उगवला!
तो एक केस पाहून मी इतका आनंदी झालो जसा शेतकऱ्याला पहिला मोसमी पाऊस आला की होतो.
मग गोळ्या, लोशन, खास शॅम्पू, बिसलेरीचे पाणी — माझा टक्कल राजा आता VIP treatment घेत होता.
हळूहळू “शेती” भरभरून यायला लागली.
आणि आज…
पाहता पाहता टक्कल केसांनी भरून गेले..आणि माझा आत्मविश्वास परत आला आणि मीही किमान 10 वर्षांनी तरी कमी वयाचा दिसायला लागलो!
-राजेश कापसे
दादर,घाटकोपर,मुलूंड,ठाणे,डोंबिवली उतरत्या क्रमाने सगळीच ठिकाणं महाग न परवडणारी म्हणून कल्याण त्यातल्या त्यात बरे म्हणून नक्की केले. पुढची पाच वर्षे कल्याणहून दादर १ तास व तिथून मालाड ४५ मि. व तसाच परतीचा प्रवास दररोज किमान चार तास लागणार.अनेकवेळा वाटले की दादरला शिफ्ट व्हावं.पण मनाची तयारी व्हायची नाही. महाग असेल,परवडणार नाही शाळांचा खर्च परवडेल का? असे प्रश्न.कल्याणहून एकवेळ अमेरिकेत शिफ्ट होणे सोपे असेल पण माझ्या मराठी मनाची दादरला जाण्याची हिम्मत होत नसे.
आज सकाळी काही जुने भांड्यांचे डबे उघडले आणि त्यात हे “माप” सापडले. गंगाखेडच्या कितीतरी आठवणी जाग्या झाल्या. दरवर्षी ज्वारी, गहू दुष्काळात मिलो मोजून घेताना आई हे माप वापरायची. आठ मापं म्हणजे पाच किलो! गेले ते दिवस.काळागणीक अनेक गोष्टी बदलतात. हे मापही बदलले आहे.
परवा बासरीचा क्लास संपल्यानंतर गुरूजी तबला उतरवून ठेवत होते. मी सहज विचारले, “सर, उद्या परत लागणार आहे तबला. उतरवून का ठेवताय?” म्हणाले, “अरे उन्हाळ्यात त्याचा स्वर खूप चढतो. म्हणून उतरवावा लागतो. नाहीतर उद्या नीट स्वर लागणार नाही. हिवाळ्यात याच्या उलट असते. तो खूप उतरतो. मग त्याचा स्वर चढवून ठेवावा लागतो.” मी विचार केला, "आपल्या मनाच्या अवस्थाही तबल्यासारख्याच असतात नाही का ? कधी सूर चढलेला तर कधी खूप उतरलेला ! ते स्वीकारून योग्य सूर लागण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. उतरलेल्या सूराला जरा वर चढवावे लागते तर चढलेले सूर उतरवावे लागतात तरच षड्ज चांगला लागतो !"
काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि आपलं आयुष्यच बदलून जातं. २००५ मध्ये मी संभाजीनगरच्या (औरंगाबाद) सार्वजनिक वाचनालयात काही पुस्तकं शोधत होतो आणि पुर्णिया हाती लागलं आणि दिवसभरात ते मी वाचून संपवलं. मला त्यातली सहज सरळ लिखाणाची शैली इतकी आवडली की त्यानंतर महिन्याभरात डॅा. अनिल अवचटांची त्या वाचनालयातील सगळी पुस्तकं वाचून काढली. आणि पुण्यात जावून त्यांना एकदा भेटायचं ठरवलं.