हे लिहिताना मी भावुक झालो आहे खरेतर. मी आईला घेवून पनवेलच्या नवीन घरात आलो. हे गंगाखेड सोडल्या नंतरचे ९ वे घर. २३ वर्षांपूर्वी मी आईला, गंगाखेड सोडून माझ्यासोबत संभाजीनगर (औरंगाबादला) येण्याची विनंती केली. कुठलाही विचार न करता तिने गंगाखेडचा वाडा विकला आणि आम्ही संभाजीनगरला (औरंगाबादला) आलो. एक खोलीचं घर. कधीच तक्रार नाही. तेव्हा मला कमी पगार होता. पण तिने सांभाळून घेतले.
मग आम्ही स्वत:चा फ्लॅट विकत घेतला. ई एम आय भरणे शक्य व्हायचे नाही पण ती घरात पैसे नाहीत म्हणून चिडली नाही कधी. घरी येणारा कधीच न जेवता गेला नाही.
ती मग डॅा. हेडगेवार रूग्णालयात सेवाव्रती म्हणून काम करायला लागली. जरा रमली संभाजीनगरला (औरंगाबादला) पण मी मुंबईत नोकरी करायचे ठरविले आणि कल्याणला शिफ्ट झालो. माझ्यासोबत ती कल्याणला आली. कोणतीही तक्रार नाही.
खरंतर माझे वडील मुंबईत लोकल अपघातात वारले होते. त्या कटू आठवणी असतांनाही ती कल्याणला आली. आम्ही ब्राम्हण सोसायटीत रहायला लागलो.
मला मुंबईतले काम जमत नव्हते. खुप घालमेल व्हायची त्या नोकरीत. तिला ते लक्षात यायचं पण ती कधीच रागावली नाही. मग मला दुसरी नोकरी मिळाली आणि तिथे मी रमलो. माझ्या चेहऱ्यावरचे समाधान बघून तिला हायसं वाटलं असावं.
मग जरा प्रगती झाली, मला लंडनला शिकायला जाण्याची संधी मिळाली. फार कधी मी तिला लंडनहून फोन केले नाही पण तिने कधी तक्रार केली नाही.
नंतर स्वत:चं घर घेतलं कल्याणला. इथवर तिचं शिवणकाम सुरू होतं. तिची अनेक वर्षांची सोबतीण, तिची लाडकी मशीन होती तिच्यासोबत. पण, नवीन घरात अडगळ नको म्हणून तिने ती देऊन टाकली. कुठलीही तक्रार नाही!
मग ती हातानेच विणकाम करायला लागली. लहान मुलींचे फ्रॅाक, साड्या कितीतरीजणींना हातानेच शिवून दिल्या असतील तिने. त्या लहान मुलीं जेंव्हा खुष व्हायच्या त्यातच तिचा आनंद आजही असतो.
मी लंडनहून परत आलो आणि मला लोकल ट्रेनचा प्रवास नकोसा वाटायला लागला. मी दादरला शिफ्ट व्हायचं ठरवलं. तर म्हणाली, “तू जा.. मी कल्याणला रहाते.” कोणतीच तक्रार नाही!!
मी नायजेरियाला जायचे ठरवले. मग ती नाशिकला रहायला गेली. जरा स्थिरावली तिथे. मी परत पुण्यात नोकरी घेतली आणि तिला म्हणालो ये पुण्यात, तिने नाशिक सोडलं. कोणतीच तक्रार नाही.
मी परत मुंबईत पनवेलला यायचं ठरवलं. आई आता ८४ वर्षांची झाली आहे. ती पनवेलला माझ्यासोबत आली. पनवेलच्या घरी परत तोच उत्साह. देवघर लावले, पूजा केली, जेवण तयार केलं.कोणतीच तक्रार नाही.
२३ वर्ष, अनेक शहरं, चढउतार...पण तक्रार मात्र मुळीच नाही!
राजेश कापसे,
९८१९९१५०७०
माऊलीला शतशः नमन
उत्तर द्याहटवाधन्यवाद धिरज. ती पाठीशी उभी होती म्हणून आजवर मी प्रगती करू शकलो.
उत्तर द्याहटवा