आरसपानी

📖 About Araspani आरसपानी — मनाच्या ओलाव्यातून उमटलेले शब्द. (Araspani – Words born from the quiet drizzle of thought.) लेखक: डॉ. राजेश कापसे ✨ अनुभव, विचार आणि जीवनातील छोट्या क्षणांची गोष्ट. 🌐 www.rajeshkapsebooks.com 📸 Instagram: @rajubhai_bams

About Araspani / आरसपानी विषयी

📖 About Araspani आरसपानी — मनाच्या ओलाव्यातून उमटलेले शब्द. (Araspani – Words born from the quiet drizzle of thought.) लेखक: डॉ. राजेश कापसे ✨ अनुभव, विचार आणि जीवनातील छोट्या क्षणांची गोष्ट. 🌐 www.rajeshkapsebooks.com 📸 Instagram: @rajubhai_bams

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

आयुष्य खरंच इतकं क्षणभंगुर आहे…

जवळचे मित्र अचानक निघून जातात, तेव्हा मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. मागच्या पंधरा दिवसांत घडलेल्या दोन घटनांनी मला अक्षरशः आतून हलवून टाकलं.

माझा जवळचा मित्र गजानन देशमुख.

मी पोदारमध्ये शिकत असताना तो नालासोपाऱ्यातील आयुर्वेद कॉलेजमध्ये BAMS करत होता. माझ्याच गावचा असल्यामुळे आमची खूप चांगली मैत्री झाली होती. परीक्षेच्या दिवसांत तो आवर्जून माझ्या हॉस्टेलवर यायचा, माझ्यासोबत राहायचा. पुढे आम्ही संभाजीनगरमध्ये सोबत प्रॅक्टिसही केली. रोज संध्याकाळी भेटणं, गप्पा मारणं, जुन्या आठवणींमध्ये रमणं… आयुष्याचा तो एक सुंदर काळ होता.

नंतर तो पुण्याला शिफ्ट झाला. काही काळ आमचा संपर्क कमी झाला. माझं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्याने ते आवर्जून वाचलं. मला अनेकदा फोन करून म्हणायचा,

“अरे वा! तू खूप सुंदर काम करतोयस. क्रिएटिव्ह काम सगळ्यांना जमत नाही. मला तुझा अभिमान वाटतो.”

त्याचं हे कौतुक मनात कायम राहिलं.

एक दिवस अचानक त्याचा फोन आला.

“राजेश, मला हार्ट अटॅक आला. मी रुबी हॉलमध्ये ॲडमिट आहे.”

मी त्याला भेटायला निघणार, इतक्यात त्याचाच पुन्हा फोन आला.

“अरे, अँजिओप्लास्टी झाली. आता डिस्चार्ज मिळालाय.”

मी म्हटलं, “ठीक आहे, मी तुला घरी येऊन भेटतो.”

पण कामाच्या गडबडीत ती भेट राहून गेली.

मनात होतं — चार-पाच दिवसांनी भेटू. आता तो ठीक असेल.

पण पाच दिवसांनी त्याच्या पत्नीचा फोन आला…

“राजेश, गजाननला परत हार्ट अटॅक आला… आणि तो गेला.”

काही क्षण मन सुन्न झालं.

ज्याला भेटायचं राहून गेलं, त्याच्याशी पुन्हा कधीच भेट होणार नाही, ही जाणीव फार वेदनादायक असते.

त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आमच्या जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येत होत्या. डोळ्यात पाणी येत होतं आणि मनात एकच विचार घोळत होता —

आयुष्य खरंच किती क्षणभंगुर आहे!

आणि त्यानंतर दुसरा धक्का…

माझा शाळेपासूनचा मित्र माधव आयाचित.

गंगाखेडमध्ये धार्मिक विधी आणि अंत्यविधींच्या कामात तो पारंगत होता. आम्ही लहानाचे मोठे झालो. बऱ्याच वर्षांनी माझं पुस्तक लिहिताना अंत्यविधींबद्दल काही माहिती हवी होती म्हणून त्याच्याशी पुन्हा संपर्क झाला. त्याने अत्यंत सविस्तरपणे मला सगळी माहिती दिली.

मागच्या महिन्यात वडिलांचं श्राद्ध होतं. माधवने अत्यंत व्यवस्थितपणे सगळा विधी करून दिला. आमचं बोलणं झालं —

“पुढच्या वर्षी परत भेटू. श्राद्धविधीही तुझ्याकडूनच करून घेईन.”

मनात होतं की आता दरवर्षी त्याची भेट होईल.

आणि काल फेसबुकवर त्याच्या निधनाची बातमी पाहिली.

ब्लड प्रेशरचा त्रास झाला. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. तिसऱ्या दिवशी मेंदूत रक्तस्राव झाला. कोमात गेला… आणि तोही निघून गेला.

पुन्हा एकदा तेच जाणवलं — पन्नाशीच्या आसपासचा माणूस, कालपर्यंत आपल्याशी गप्पा मारणारा मित्र… आणि आज अचानक सगळं संपलेलं.

या दोन घटनांनी मनात खूप काही बदलून टाकलं आहे.

आपण आयुष्यात किती गोष्टी धरून ठेवतो…

राग, लोभ, अपेक्षा, अहंकार, आकांक्षा, स्पर्धा, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, कोणीतरी आपल्याशी असं का बोललं, कोणीतरी आपल्याला महत्त्व का दिलं नाही, आपल्याला अजून हे मिळवायचं आहे, अजून तिथे पोहोचायचं आहे…

पण शेवटी?

कधी कोणता क्षण शेवटचा ठरेल, हे कोणालाच माहीत नाही.

म्हणून कदाचित आयुष्याकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहायला हवं.

मनात राग असेल तर शक्य असेल तेव्हा सोडून द्यायला हवं.

कोणाची आठवण येत असेल तर फोन करायला हवा.

कोणाला भेटायचं असेल तर “नंतर भेटू” असं म्हणत राहण्यापेक्षा शक्य असेल तेव्हा भेटायला हवं.

ज्यांच्यावर प्रेम आहे, त्यांना ते सांगायला हवं.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे — आयुष्य जगायला हवं.

कारण उद्या आपल्यासाठी आहे, याची कोणतीही खात्री नाही.

गजानन आणि माधव गेले… पण त्यांनी मागे ठेवलेल्या आठवणी कायम राहतील.

कदाचित त्यांच्या जाण्याने मला पुन्हा एकदा शिकवलं —

आयुष्य मोठं असण्यापेक्षा ते मनापासून जगलेलं असणं महत्त्वाचं आहे.

आज आपण आहोत. आपली माणसं आहेत. आपल्या हातात हा क्षण आहे.

म्हणून राग-लोभ, अपेक्षा-आकांक्षा, तक्रारी आणि मनस्ताप यापेक्षा…

थोडं अधिक प्रेम करूया.
थोडं अधिक हसूया.
थोडं अधिक भेटूया.
आणि मिळालेलं आयुष्य मनापासून जगूया.

कारण…

कधी कोणता क्षण शेवटचा असेल, खरंच सांगता येत नाही.

गजानन आणि माधव —
तुम्ही दोघेही कायम आठवणीत राहाल.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा