Saturday, November 2, 2024

आनंद आणि दुःख 

विचार शून्य अवस्था आणि आनंद याबद्दल विचार करताना अनेक लहान सहान घटना आठवल्या. दिवसभर न आवडणारे काम आणि त्याहूनही नआवडणारा प्रवास केल्यानंतर जर जेवणात मनापासून आवडणारा पदार्थ असेल तर मी भान हरपून जेवण करतो आणि लगेच थकवा जाऊन फ्रेश वाटायला लागतं. 

भान हरवणे म्हणजेच विचार शून्य होणे. विचारशून्य अवस्था आणि आनंद या दोन गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. मराठीतील ‘मन हलके होणे’ हे वाक्य मला खुप आवडते. विचारांनी जड झालेलं मन विचारमुक्त झालं की हलक होतं आणि अल्हाददायक वाटायला लागतं. 

 मंबईतल्या सिमेंटच्या जंगलाचा आणि गर्दीचा कंटाळा आला की मी सिंधुदूर्गात जातो. तिथल्या निसर्गात मन कधी हरवून जातं ते कळतच नाही. मन हरवले की धावपळ, दगदग, कंटाळा हे विचार हद्दपार होतात आणि मी आनंदी होतो. 

सुंदर फुल, पेंटींग, सुगंध यामध्ये मन रमते आणि आनंददाई होते. 

संध्याकाळी जिममध्ये जाऊन व्यायाम करतांनाही विचार दूर पळून जातात. जिमधील वजने उचलतांना ज्या वेदना होतात त्यापूढे ॲाफिसात झालेल्या अपमानाच्या शाब्दिक वेदना क्षुल्लक वाटायला लागतात आणि माझा प्रवास परत आनंदी होण्याकडे सुरू होतो. 

माझ्या ऐका मित्राला पोहायला खुप आवडते. पाण्यात उडी  मारली की तो पाण्या सोबत एकरूप होतो आणि दुनिया विसरतो… भान हरपून पोहतो. 

सोमवार ही आठवड्याची सुरवात, त्या दिवशी ॲाफिसात बरीच कामे असतात.  सोमवारी संध्याकाळी माझा बासरीचा क्लास असतो. गुरूजींना नमस्कार करून फोन बंद केला आणि षड्ज लावला की पुढचा एक तास मी भान हरपून बासरी शिकतो. क्लास संपल्या नंतर मी आनंदाच्या अत्युच्च शिखरावर असतो. 

आपल्या आवडत्या गायकाचे गाणे ऐकताना आपली समाधीच लागते! म्हणजेच आपण विचारशुन्य होतो. 

दुःखातून जाताना आपल्या मनाची अवस्था नेमकी  विरुध्द असते. असंख्य विचार मनात असतात. आपली जवळची व्यक्ती जग सोडून गेल्या नंतर त्या व्यक्तीच्या आठवणींनी मन भरून जातं. डोळे भरून येतात. आपण दुःखाच्या गर्तेत लोटले जातो. 

कुणी टाकून बोलले, अपमान केला की त्याबद्दलचे विचार मनात चक्री वादळा सारखे घोंगावू लागतात आणि डोकं जड होतं. 

दुःखाकडून आनंदाकडे जाण्याचा मार्ग खुप सोपा आहे.. मन हलक करण्याचा मार्गही खुप सोपा आहे….भान हरवून जाईल असे काही तरी करावे. संगीत, व्यायाम, खेळ, आवडत्या व्यक्तीचा सहवास, आपल्या आवडत्या पेट (कुत्रा, मांजर) सोबत घालवलेला वेळ, जवळच्या मित्राशी मारलेल्या मोकळ्या गप्पा, चांदण्यांनी भरलेलं आकाश, हिरवागार डोंगर किंवा अथांग समुद्र ….हे अखर्चिक उपाय किती अमूल्य आहेत, नाही का?

-राजेश कापसे

९८१९९१५०७०

2 comments:

  1. Refreshed vintage thought which we have been forgetting. Wish I could implement it.

    ReplyDelete