आरसपानी

📖 About Araspani आरसपानी — मनाच्या ओलाव्यातून उमटलेले शब्द. (Araspani – Words born from the quiet drizzle of thought.) लेखक: डॉ. राजेश कापसे ✨ अनुभव, विचार आणि जीवनातील छोट्या क्षणांची गोष्ट. 🌐 www.rajeshkapsebooks.com 📸 Instagram: @rajubhai_bams

About Araspani / आरसपानी विषयी

📖 About Araspani आरसपानी — मनाच्या ओलाव्यातून उमटलेले शब्द. (Araspani – Words born from the quiet drizzle of thought.) लेखक: डॉ. राजेश कापसे ✨ अनुभव, विचार आणि जीवनातील छोट्या क्षणांची गोष्ट. 🌐 www.rajeshkapsebooks.com 📸 Instagram: @rajubhai_bams

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५

कपाळ, कुंकू, आई आणि तारा भवाळकर

प्रति, आदरणीय (डॅा.) श्रीमती तारा भवाळकर,

कुंकू आणि महिलांचे मानसिक आरोग्य, विधवा याबद्दल जे विचार आपण मांडले आहेत त्याबद्दल खरेतर मी काही लिहिणार नव्हतो. मी ते ऐकले आणि हल्लीच्या मराठीत सांगायचे झाले तर त्याला इग्नोअर मारले होते!

काल रात्री माझ्या ८५ वर्षांच्या इयत्ता ४ थी पास आई सोबत गप्पा मारताना तुमचा विषय निघाला. मी आईला कुंकवाबद्दलचे तुमचे संशोधनपर विचार सांगितले आणि आपण Ph.D डॅाक्टर, लेखिका आहात हेही सांगितले. तिची प्रतिक्रिया मला आवडली आणि ती आपल्यापर्यंत या जाहीर पत्रातून शेअर करावी असे वाटले.

आई म्हणाली, “ त्या बाईंना सांग, मी अशिक्षित आहे आणि मला हे कुणी सांगितले नव्हते की कुंकू लावले की मन आनंदित होते. तरीपण लग्न झाल्यावर मी तुझे वडील जिवंत असेपर्यंत कुंकू लावले. कपाळावरचे कुंकू हे माझ्यासाठी सौभाग्य होते. तुझ्या वडिलांवरील असलेल्या प्रेमाचे प्रतीक होते.तुझ्या वडिलांचा मुंबईत अपघात झाला व चार दिवसांनी एक पोलीस गंगाखेडला निरोप देण्यासाठी घरी आला. त्याने तुझे वडील सिरियस आहेत व तुम्ही लगेच मुंबईला या असे सांगितले तेंव्हा मनात शंका आली. आपल्या बाजूच्या भाभी दुसऱ्या धर्माच्या होत्या पण त्यांनी देवघरासमोरील करंड्यातील कुंकू एका कागदात बांधून ती पुडी मला ठेवायला दिली.माझं सौभाग्य टिकून राहण्यासाठी!पण ते गेले हे जेव्हा कळले तेंव्हा मी स्वतःच माझ्या कपाळावरचे कुंकू पुसले. कारण माझं सौभाग्य मला सोडून गेलं होत आणि आजपर्यंत मी कुंकू लावले नाही. त्यामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर काही परिणाम झाला नाही. दु:ख मात्र मनात कायम आहे. त्या भवाळकर बाईंना सांग, “प्रत्येक गोष्टीची नको ती चिकित्सा करायची नसते. भावना भावनेच्या ठिकाणी योग्य असतात. "

हे ऐकल्यावर मी स्तब्ध झालो. पण तुम्हाला परत काहीतरी सांगावेसे वाटले. हे पत्र लिहिण्याआधी मी तुमच्याबद्दल थोडे वाचले. आपण संशोधन केले आहे आणि आपल्या काही विद्यार्थ्यांना Ph.D देखील प्राप्त झाली आहे. मी स्वतः एक संशोधक आहे. University of London येथे M.Sc. केले आहे आणि प्रसिध्द जर्नल्समध्ये माझे शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. हे सांगण्याचे कारण असे की कोणत्याही संशोधनाबद्दल माहिती देताना त्याचा शास्त्रीय संदर्भ अभ्यासावा लागतो व मगच त्यावर चर्चा केली जाते. आपण अ.भा. साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठावरून जे काही सांगितले आहे त्याचा शास्त्रीय संदर्भ आपल्याला माहिती होता का? जर रस्त्यावर जाता येता आपण काही ऐकले असेल तर कोणत्याही शास्रीय संदर्भाशिवाय आपण मनात येईल ते बोलणे योग्य आहे का?

ग्रामीण भागातील अशिक्षित महिलांना असे संशोधन सांगितले तर त्या ते ऐकणार नाहीत आणि शहरी सुशिक्षित स्री त्यावर विश्वास ठेवणार नाही. तसे झाले असते तर कदाचित नवरात्रात नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या टिकल्या कपाळावर दिसल्या नसत्या.

आपण जे काही व्यक्त केले त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील प्रथा परंपरांचे पालन करणाऱ्या असंख्य स्त्रियांचा अपमान केला आहे.प्रथा परंपरा या भावभावनांशी संबंधित असतात. त्यांची अनावश्यक चिकित्सा करायची नसते हा सदसदविवेक तुमच्यासारख्या लेखिकेला असू नये याचे वैषम्य वाटते.

हिंदू धर्म व त्याच्या प्रथा/ रुढी हे दोन्हीही सनातन आहेत. (सनातनचा मूळ अर्थ जे चांगलं आहे ते टिकवणं, वाईट ते सोडून देणं व नवीन स्वीकारणं- थोडक्यात परिवर्तनशीलता . सनातनचा सध्याचा अर्थ वेगळा आहे!)

त्यामुळे टिकली न लावण्याची प्रथा पाळणाऱ्या किंवा टिकली/ कुंकू लावणाऱ्या दोन्ही महिला हिंदू धर्मातच आढळतात. विधवा-टिकली हे विषय मागे टाकून हिंदू समाज पुढे गेलाय हे तुम्हाला अजून उमजलेले नाही. तुम्ही अजून ५० वर्षांपूर्वीचाच विचार धरून बसला आहात.

हे मी माझे व्यक्त केलेले विचार आहेत. आपण दुखावल्या गेला असाल तर क्षमस्व.

-राजेश कापसे, ९८१९९१५०७०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा