काल आई सोबत गप्पा मारताना मोबाईल रिचार्जचा विषय निघाला. तिने नवरात्रात घडलेला एक प्रसंग सांगितला. ती म्हणाली,'२० रूपयांच्या रिचार्जलासुद्धा मोठी किंमत आहे रे!" मला काही कळले नाही. मी तिला म्हणालो, 'अगं पाच मिनिटात संपतो २० रू. रिचार्ज. काहीच होत नाही त्यात!
आई म्हणाली,"तुम्हां तरूण पिढीला नाही कळायचं ते!" नवरात्रीत एक आजी जोगवा मागत होत्या. मी १० रूपये टाकले आणि तुझ्या मावशीने १० ...झाले २० रूपये.
त्या आजी नंतर मला बाजूला घेवून गेल्या आणि खुप रडल्या. त्या म्हणाल्या, मोबाईल आहे पण मागचे दोन महिने रिचार्ज करायला पैसेच नाहीत. मुलाला विनंती केली पण तो सुद्धा नाही करत रिचार्ज. माझ्या भावाचा दोन महिने होऊन गेले पण अजुन फोन नाही आला. त्यालाही नाही पेन्शन बिन्शन..या उतार वयात नसतील पैसे त्याच्या- कडेही......माझी अवस्थाही तशीच.......मला सांगा २० रुपयांचे रिचार्ज होईल का हो?आज जोगव्यात मिळालेले २० रूपये वापरून करता येईल का मोबाईल रिचार्ज? जर तो करता आला तर मी करेन आणि बोलीन भावाला." आई त्यांना जवळच्या दुकानात घेवून गेली आणि फोन रिचार्ज करून दिला.२० रू. चा रिचार्ज! फोन रिचार्ज केल्यानंतर त्या भावाशी बोलल्या. त्यांना खुप बरं वाटलं.
२० रुपयाच्या मोबाइल रिचार्जबद्दल आईने जे सांगितले त्यामुळे मी खुप अस्वस्थ झालो. उतारवयात नसणारे पैसे, केलं जाणारं दुर्लक्ष, मनाला बोचरी वेदना देवून गेलं.