Thursday, September 26, 2024

निर्णय घेणे महत्वाचे, त्याचे परिणाम नंतरच समजतात!

संभाजीनगर (औरंगाबाद) पासून पंधरा कि.मी. अंतरावर असणाऱ्या चितेगाव या लहान गावात मी माझे क्लिनिक सुरु केले होते. सात आठ महिने प्रॅक्टिस केल्यानंतर मला त्याचा कंटाळा यायला लागला आणि काहीतरी वेगळे करावे असे मला सतत वाटत होते. माझी प्रॅक्टिस तशी बरी सुरु होती, कमाई तशी चांगली होत असे. पण त्यात मन रमत नसे. मला वाटायचे की अजून शिकले पाहिजे. त्याचबरोबर मला सामाजिक कामाचीही आवड होती. काहीतरी चांगले काम करायला हवे असेही वाटत असे. मी जे काही करतोय ते फक्त स्वतःसाठी आहे याची खंत वाटत असे. 

संभाजीनगर (औरंगाबाद) येथे असलेल्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाबद्दल आणि त्यांच्या सामाजिक कामाबद्दल बरेच ऐकले होते. माझे काही मित्रही तिथे काम करायचे. माझे क्लिनिक बंद करावे आणि डॉ. हेडगेवार रुग्णालयात काम करावे असे अनेक वेळा मनात येत असे. पण त्यात अनेक अडचणी होत्या. स्वतःची चांगली सुरु असलेली प्रॅक्टिस बंद करून नोकरी करणे हा तसा मोठा निर्णय होता. कारण प्रॅक्टिस सुरु करण्यासाठी बराच खर्च झाला होता. त्यामुळे अचानक ती बंद कारण्याचा निर्णय घरातील कुणीही मान्य केला नसता. त्यापेक्षाही एक महत्वाचा प्रश्न होता, नोकरीत पगार किती मिळणार हा. प्रशिक्षणार्थी म्हणून सुरुवातीला पगार नक्कीच कमी मिळणार होता. 

माझे क्लिनिक बंद करून नोकरी करण्याचा निर्णय जेंव्हा मी घरी सांगितला तेंव्हा आभाळ कोसळले. सर्वांनी त्याला कडाडून विरोध केला. माझ्या मनात "To be not to be" हा गोंधळ सुरु होता. या कठीण काळात माझी ओळख डॉ.अभय शिरसाट यांच्याशी झाली. डॉ.अभयचे माझ्यासारखेच बी.ए.एम.एस.पर्यंत शिक्षण झाले होते आणि तो संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये स्वतःचे क्लिनिक चालवत होता. अत्यंत शांत, सुस्वभावी असा डॉ.अभय खूप बॅलेन्सड आहे आणि त्याची विचार करण्याची पद्धत तर्कनिष्ठ (रॅशनल) होती. माझ्या मनातील सर्व गोंधळ मी त्याच्यासमोर व्यक्त केला. माझे सगळे बोलणे ऐकून घेतल्यानंतर तो म्हणाला, "राजेश, निर्णय घेणे महत्वाचे असते. आपण घेतलेला निर्णय बरोबर अथवा चूक आहे की नाही हे केवळ निर्णय घेतल्यानंतरच ठरते. पण निर्णय न घेणे किंवा अनिर्णित असणे ही अवस्था मात्र अत्यंत घातक असते. कोणताही निर्णय घेतल्यानंतर त्याचे चांगले वाईट परिणाम हे होतच असतात आणि त्याची मानसिक तयारी आपण करणे गरजेचे असते. त्यामुळे तुझ्या मनातला जो गोंधळ सुरु आहे तो केवळ निर्णय घेतल्यानंतरच संपणार आहे." 

मला त्याचे म्हणणे पटले. त्या रात्री बराच विचार केल्यानंतर माझे चितेगावचे क्लिनिक बंद करायचे आणि डॉ. हेडगेवार रुग्णालयात नोकरीसाठी अर्ज करायचा आणि मिळाली तर तेथे जॉईन व्हायचे असा निर्णय मी घेऊन टाकला. मन एकदम शांत झाले आणि नवीन मार्ग दिसायला लागला. अर्थात त्याचे चांगले वाईट परिणाम असणारच होते. 

कालांतराने सहा वर्ष डॉ. हेडगेवार रुग्णालयातील नोकरी सोडून मुंबईत नवीन नोकरी करण्याचा आणि मुंबईत कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा अत्यंत कठीण निर्णय घेण्याची जेंव्हा वेळ आली तेंव्हा मला डॉ. अभयचा सल्ला आठवला, "निर्णय घेणे महत्वाचे, परिणाम नंतरच कळतील!" मी मुंबईत परतलो आणि तिथे कायम स्वरूपी स्थायिक झालो. पुढे लंडनला शिकायला जाण्याचा निर्णय असेल किंवा नायजेरियामध्ये काम करण्याचा निर्णय असेल अथवा कल्याणहून डायरेक्ट दादरला स्थायिक होण्याचा निर्णय असेल मी ते सर्व निर्णय हिमतीने घेतले. कारण "निर्णय घेणे महत्वाचे असते" हा डॉ. अभयचा सल्ला मला सदैव आठवतो आणि प्रेरणा देतो.

राजेश कापसे

९८१९९१५०७०

https://rajeshkapsebooks.com/

आयुष्यात अनेक गोष्टी पॅकेज डीलसारख्या असतात : रत्नाकर पाटील

माझ्या पहिल्या नोकरीत साधारणतः पाच वर्षे काम केल्यानंतर माझ्या कुरबुरी वाढायला लागल्या. जरा खटके उडायला लागले. स्वतःकडून आणि संस्थेकडून अपेक्षा जास्त वाढल्या. पण ज्या चौकटीत मी काम करत होतो त्यामध्ये माझ्या वाढलेल्या आर्थिक अपेक्षा आणि हवी असलेली पदोन्नती त्यावेळी पूर्ण होणे शक्य नव्हते. मी जरा अधिकच अस्वस्थ होतो. त्यावेळी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे विद्यार्थी परिषदेचे प्रतिभा संगम हे साहित्य संमेलन होते.त्यासाठी रत्नाकर दादा आला होता. मी आवर्जून त्याला भेटायला गेलो.

नेहमीप्रमाणे त्याने "काय मित्रा, कसा आहेस?" असे म्हणून स्वागत केले. मी जरा नाराज असल्याचे त्याला जाणवले. "काय! सगळे ठीक सुरु आहे ना?" असे त्याने विचारले. मी माझ्या मनातील खदखद त्याच्यासमोर व्यक्त केली. माझ्या वाढत्या आर्थिक गरजा, मला अपेक्षित असलेली पदोन्नती आणि मी 'बी.ए.एम. एस'. असल्यामुळे माझ्या प्रगतीसाठी असणाऱ्या मर्यादा इ. मी त्याला सांगितले.

रत्नाकरदादाची प्रतिक्रिया खूप छान होती. तो म्हणाला," हे बघ, आयुष्यात अनेक गोष्टी ह्या पॅकेज डीलसारख्या असतात. पॅकेज म्हटले की त्यात चार चांगल्या वस्तू असतात, दोन कमी दर्जाच्या आणि काही अगदीच कामचलाऊ असतात. पॅकेज म्हणून आपण ते लगेच विकत घेतो. पण उघडल्यानंतर मात्र लक्षात येते की सगळेच काही चांगले नाही. तरीपण आपण ते स्विकारतो. जे चांगले आहे ते वापरतो आणि जे अगदीच कामचलाऊ असते ते बाजूला टाकतो. नोकरी, व्यवहार, मैत्री या सगळ्यात पॅकेज डील कुठेतरी असतंच. त्यात सगळेच मनासारखे आणि उत्तम कधीच मिळत नाही. जर ते टिकवायचे असेल तर चांगले ते घ्यायचे आणि वाईट ते सोडून द्यायचे. असे केले तरच दीर्घकाळ समाधानाने काम करता येते. पण त्यातले सगळेच नकोसे झाले तर मात्र पर्याय शोधणे गरजेचे असते. कारण आनंदी असणे गरजेचे तरच मजा आहे यार. बघ विचार करून..." आम्ही चहा घेतला आणि मी निघालो.

रत्नाकरदादाने सांगितलेल्या पॅकेज डीलच्या कन्सेप्टचाच मी दिवसभर विचार करत होतो. माझ्या त्या नोकरीत अनेक चांगल्या गोष्टी होत्या. सुरक्षितता होती. समाजासाठी काहीतरी उत्तम करत असल्याचे समाधान होते. चांगले सहकारी होते. काही अडचणी होत्या, नक्कीच. पण पॅकेज डीलप्रमाणे सगळेच कसे चांगले असेल. नंतर मी एक वर्ष तिथे काम केले. पण एक वेळ अशी आली की हाताशी असलेले पॅकेज डील बाजूला सारून त्यातून बाहेर पडून थोडे मोठे पॅकेज डील स्विकारायचे ठरवले.मी नोकरी सोडली. मुंबईत आलो. नवीन ठिकाणी नवे पॅकेज डील होते.पगार भरपूर होता. पद, प्रतिष्ठा होती, पण सुरक्षितता नव्हती. समाधान नव्हते.शेवटी हेही एक पॅकेज डीलच होते. थोडे गोड, थोडे खारट, थोडे कडू स्विकारणे गरजेचे होते!

राजेश कापसे

९८१९९१५०७०

https://rajeshkapsebooks.com/

Friday, September 20, 2024

आभाळा एवढी मोठी स्वप्नेही प्रत्यक्षात आणता येतात : डॉ अनंत पंढरे

डॉ. हेडगेवार रुग्णालयात दीड वर्ष विविध विभागात काम केल्यानंतर मला तिथे पर्मनन्ट करायचे असा निर्णय झाला. माझी नोकरी पक्की झाली. रुग्णालयाच्या नागरी सेवा वस्ती प्रकल्पावर वैद्यकीय अधिकारी म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली. रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक या जबाबदारी व्यतिरिक्त, नागरी सेवा वस्ती या प्रकल्पाचे पालक म्हणून डॉ अनंत पंढरे सर काम बघायचे. रुग्णालयात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतांना सरांसोबत ओळख झाली होती.त्यांचे भारदस्त व्यक्तिमत्व, प्रभावी आवाज, अनेक नामवंत व्यक्तींसोबत त्यांचा असलेला परिचय, रुग्णालयासाठी त्यांनी उभा केलेला निधी, या आणि अश्या अनेक गोष्टींमुळे त्यांच्याबद्दल आम्हां सर्वांमध्ये एक आदरयुक्त भीती होती.

माझी नागरी सेवा वस्ती प्रकल्पावर नियुक्ती झाल्यानंतर त्या प्रकल्पाचे पालक या नात्याने त्यांनी मला भेटायला बोलावले. मनात भीती होती.छातीत धडधडत होते. मी त्यांच्याकडे संकोचलेल्या अवस्थेत गेलो. त्यांच्या सहाय्यकाला सांगितले आणि प्रतीक्षागृहात त्यांच्या निरोपाची केबिन बाहेर वाट बघत बसलो. त्यांच्या सहाय्यकाने त्यांना मी आल्याचे सांगितले. आश्चर्य म्हणजे सर स्वतः बाहेर आले. त्यांनी माझे स्वागत केले आणि म्हणाले "काय राजेश, काय म्हणतोस?कसा आहेस? अरे एवढा घाम का आहे तुझ्या कपाळावर? बस.पाणी घे." त्यांच्या केबिनमध्ये हेडगेवार रुग्णालयाच्या त्यावेळी तयार झालेल्या आणि भविष्यातील भव्य वास्तूचे चित्र होते. 

ते म्हणाले "राजेश अभिनंदन! तुला शुभेच्छा देण्यासाठी मी बोलावले आहे. तू जे नागरी सेवा वस्त्यांमध्ये काम करणार आहेस ते तेथील लोकांसाठी आणि संस्थेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी तुला शुभेच्छा!" सरांनी मला एक सुंदर ग्रीटिंग कार्ड दिले, त्यावर त्यांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिले होते, "अंत्योदयासाठी हार्दिक शुभेच्छा! आपण सोबत मिळून मोठे काम करू.ऑल द बेस्ट!" आमची भेट संपली आणि भारावलेल्या अवस्थेत मी तेथून बाहेर पडलो.

माझे काम सुरु झाले. सरांसोबत प्रत्येक आठवड्यात आमची आढावा बैठक असे. त्यात ते आमच्यासमोर सदैव मोठे आव्हान ठेवायचे. प्रत्येक काम हे जागतिक दर्जाचे आणि भव्य असले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. त्यासाठी लागेल ते सर्व उभे करण्याची त्यांची तयारी असायची. मिलिंदनगर या सेवावस्तीमध्ये वस्ताद लहुजी साळवे आरोग्यकेंद्राची नवीन इमारत बांधायची होती. डॉ. दिवाकर कुलकर्णी सर म्हणाले, "आरोग्यकेंद्राची इमारत लहुजींचे व्यक्तिमत्व प्रकट करणारी असावी. त्यांचे ते स्मारक व्हावे." डॉ पंढरे सरांनी सर्वांशी चर्चा केली आणि वस्ताद लहुजी साळवे यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून ती इमारत कशी असेल याबद्दल वास्तुविशारदाला कळवले. वास्तुविशारदाने जेव्हा इमारतीचा आराखडा आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले तेव्हा संस्थेतील अनेकांनी असे मत व्यक्त केले की, "सेवावस्तीतील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एवढा खर्च का करायचा? साधी छोटी अशी इमारत बांधा खूप झाले." पण सर त्यांच्या मतावर ठाम होते.जे करायचे ते भव्यच असायला हवे, त्यात कोणतीही कसूर नको. या       इमारतीसाठी त्यांनी निधी उभा केला आणि एक भव्य स्मारक "वस्ताद लहुजी साळवे आरोग्य केंद्र" या रूपाने दिमाखात उभे राहिले. हे सर्व काम डॉ. हेडगेवार रुग्णालयाची त्यांची प्रमुख जबाबदारी सांभाळून ते करत असत. Passion या इंग्रजी शब्दाचा अर्थ डॉ अनंत पंढरे सरांच्या कामाची पद्धत अनुभवताना मला समजला!

काही दिवसांनी मला डॉ दिवाकर कुलकर्णी सर यांनी HIV-AIDS जनजागृती प्रकल्पाची जबाबदारी दिली. जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने काही कार्यक्रम करायचे होते. मी एक लहान रॅली करावी असे ठरवले आणि त्याबद्दल डॉ अनंत पंढरे सरांना सांगायला गेलो. सर म्हणाले, "लहान का? आपण संपूर्ण संभाजीनगर (औरंगाबाद) शहराला कळेल असे भव्य काहीतरी करू." क्षणाचाही विलंब न करता ते मला त्यांच्या कारमधून संभाजीनगर (औरंगाबाद)च्या प्रमुख अशा क्रांती चौक येथे घेऊन गेले आणि क्रांती चौक ते देवगिरी कॉलेज अशी भव्य मॅरेथॉन आयोजित करायचे नियोजन त्यांनी मला समजावून सांगितले. १ डिसेंबर रोजी या मॅरेथॉनसाठी संभाजीनगर (औरंगाबाद) मधील डिस्ट्रिक्ट कलेक्टर, कमिशनर, खासदार, आमदार, महापौर आणि सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. तो कार्यक्रम त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला!

HIV-AIDS या विषयावर काम करत असताना मी "Impact of Behaviour Change Communication on Slum Population " हा एक रिसर्च पेपर लिहिला आणि तो जपान मध्ये होणाऱ्या एक कॉन्फरंससाठी पाठवला आणि आश्चर्य म्हणजे त्याची निवडही झाली पण मला स्कॉलरशिप मिळाली नव्हती. मी हे सरांना सांगायला गेलो. क्षणार्धात ते म्हणाले, "राजेश,  २ जुलैला हा रिसर्च पेपर तू जपान येथील कोबे येथे सादर करायला जायचे आहेस! मी तुला सर्व ती मदत करतो." माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता! माझ्यासाठी असे काहीतरी अशक्यप्राय  होते कारण मी परदेशात सोडा, विमानानेही कधी प्रवास केला नव्हता! त्यात जपानला जाणे हे स्वप्नवतच होते. पण पंढरे सरांनी ठरवले की ते कितीही अशक्यप्राय असले तरीही प्रत्यक्षात येतच असे. केवळ एका महिन्यात त्यांनी माझ्या जपानवारीसाठी लागणाऱ्या निधीची व्यस्था केली आणि २ जुलै २००५ मध्ये मी माझा रिसर्च पेपर कोबे, जपान येथे सादर केला. माझे सादरीकरण झाल्यानंतर मी सरांना फोन केला. त्याच दिवशी सरांचा वाढदिवस होता. सर म्हणाले, "अभिनंदन राजेश! अभिमान वाटतो तुझा.माझ्या वाढदिवसाचे हे सर्वात मोठे गिफ्ट आहे."  ज्युनियरला डावलून स्वतः परदेशात जाणारे बॉस अनेकांनी बघितले असतील, पण माझ्यासारख्या ज्युनियरला परदेशात पाठवणाऱ्या बॉसबरोबर मी काम केले आहे याचा मला अभिमान वाटतो!

डॉ.हेडगेवार रुग्णालयातील अत्यंत नाविन्यपूर्ण अशी ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असणारा "सेवाव्रती" हा उपक्रम, जागतिक दर्जाची "दत्ताजी भाले" रक्त पेढी किंवा "संगणक प्रज्ञा" हा सेवावस्तीतील मुलांसाठी सुरु केलेला प्रकल्प, आसाममधील भव्य हॉस्पिटल  या आणि अश्या असंख्य प्रकल्पांची संकल्पना तयार  करणे, त्यासाठी लागणार निधी उभा करणे आणि ते उत्तम पद्धतीने चालतील यासाठी प्रयत्न करणे हे काम सर अव्याहतपणे करत आहेत.

अनेक वर्षांनी नुकताच मी डॉ.हेडगेवार रुग्णालयात काही कामानिमित्त गेलो होतो. २३ वर्षांपूर्वी डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या पूर्णाकृती इमारतीचे जे चित्र सरांच्या   केबिनमध्ये मी बघत असे नेमकी तशीच भव्य इमारत पाच एकर जागेत दिमाखाने उभी राहिली होती आणि एवढेच नाही तर "श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज" च्या त्याहूनही मोठ्या प्रकल्पाचे काम सुरु झाले होते.

अनंत भव्य दिव्य स्वप्नं प्रत्यक्षात आणणाऱ्या डॉ. अनंत पंढरे सर यांच्याबरोबर मला काही वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि मी मोठी स्वप्ने बघून प्रत्यक्षात आणायला शिकलो. ईश्वराचे रूप अनादी-अनंत असते हे मी ऐकले आहे. अनादी नाही पण "अनंत" रूप मी जवळून बघितले आहे

Saturday, September 14, 2024

अंधत्व समजून घेताना!

२ मे २००८, केतन सोबत साईटसेव्हर्स या संस्थेत रूजू झालो. या संस्थेमध्ये नोकरी  मिळण्यासाठी जी मुलाखत घेण्यात आली होती त्यामध्ये सामुहीक चर्चा (ग्रुप डिस्कशन ) हा एक  महत्वाचा भाग होता. मुलाखतीसाठी निवड झालेले सर्व उमेदवार त्यात सहभागी झाले होते. चर्चेचा विषय होता, “अंध व्यक्तींचे  शिक्षण”. मी जे काही थोडेफार वाचले होते त्याआधारे बोलायला सुरूवात केली. “ अंध व्यक्तींना शिक्षण देण्यासाठी ब्रेल भाषेचा वापर केला पाहिजे, ॲाडीओ बुक्सचे ग्रंथालय असले पाहिजे, त्यांच्यासाठी वेगळ्या शाळा असायला हव्यात इ .” मुलाखतीसाठी जे इतर उमेदवार होते त्यामध्ये एक अंध व्यक्ती होती. माझ्या नंतर त्या अंध व्यक्तीने बोलायला   सुरुवात केली. ते म्हणाले, “Nothing about us without us” हे वाक्य आधी लक्षात ठेवा. आमच्या बद्दल विचार करणार असाल तर तो आमच्या सहभागा- शिवाय करू नका आणि हो ब्रेल ही लिपी आहे भाषा नाही आणि अंधांसाठी वेगळ्या शाळा असाव्यात पण त्या फक्त प्राथमिकच, त्यानंतर त्यांना सर्व मुलांसोबतच शिक्षण दिले पाहिजे.”  हे सर्व केतन कोठारी अस्खलित इंग्रजीमध्ये ब्रिटीश लोकांच्या शैलीत बोलत होता. माझे अंध व्यक्ती आणि त्यांचे जग याबद्दलचे अज्ञान केतन कोठारीच्या एकदोन वाक्यातच स्पष्ट झाले.ही नोकरी मला मिळणार नाही हे मला सामुहिक चर्चेच्या सत्रानंतर मनोमन वाटायला लागले. केतनच्या व्यक्तीमत्वाने मी मात्र प्रभावित झालो तो कायमचा. नंतर माझे प्रेझेंटेशन आणि मुलाखत चांगली झाली पण केतन समोर मी काही टिकणार नाही हे माझ्या लक्षात आले. पुढील कांही दिवसांत ईमेल आली आणि माझी निवड झाली आहे आणि २ मे ला नोकरीवर रूजू व्हायचे आहे असे त्यात लिहीले होते. मनात विचार आला, “ एकच जागा होती, जर माझी निवड झाली असेल तर केतनला डावलले गेले असणार!” 
मी २ मे २००८ रोजी मालाड येथे असणाऱ्या साईटसेव्हर्सच्या कार्यालयात रूजू होण्यासाठी गेलो. तिथे केतनही जॅाईन होण्यासाठी आला होता. नंतर कळले की आधी एकच पोस्ट होती पण आम्हा दोघांचे इंटरव्ह्यू या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आवडले आणि त्यांनी आम्हां दोघांनाही कामावर घ्यायचे ठरवले. मला एक नवीन मित्र मिळाला. 

एका अंध व्यक्ती सोबत काम करण्याचा तसा हा माझा पहिलाच प्रसंग होता. हा प्रवास कसा करणार? ईमेल, संगणकाचे काय? ते कसे काय जमणार, जेवणाचे काय? आणि हा देशभर प्रवास कसा करणार? पैशांची देवाण घेवाण … असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते. 

आम्ही सोबत काम करायला सुरुवात केली आणि एक नवीन जग माझ्यासमोर उलगडू लागलं. केतनला कंप्युटर दिला गेला आणि त्यावर त्याने जॅाज नावाचे एक सॅाफ्टवेअर इन्स्टॅाल करून घेतले. केतन अत्यंत शिताफीने संगणक सुरू करायचा आणि नंतर जॅाजच्या मदतीने ते तो वापरायचा. ईमेल वाचणे, त्याला उत्तरे देणे, प्रोजेक्ट प्रपोजल तयार करणे अशी सर्व कामे तो करत असे. त्याने संगणक सुरू केले की जॅाजचा आवाज सुरू होत असे आणि त्या सॅाफ्टवेअरच्या सुचनांनुसार तो संगणकावर काम करत असे. जॅाज त्याला आलेले ईमेल वाचत असे आणि त्याने जे त्या मेलला उत्तर लिहीले आहे ते वाचून दाखवत असे. कानाला हेडफोन असायचा पण एक दोन तास काम केल्यानंतर तो हेडफोन काढून ठेवायचा. जॅाजचा आवाज सुरू असल्याने मला माझे काम करतांना त्रास होत असे. मी एकदा चिडून म्हणालो, “केतन अरे हेडफोन लाव ना. त्रास होतोय त्या आवाजाचा.” त्याचे उत्तर होते, “मित्रा फक्त पाच मिनिटे झाली आहेत हेडफोन काढून तर इतका कंटाळलास. तो आवाज हेच माझं आयुष्य आहे!” मी निःशब्द झालो. मला माझीच लाज वाटली. त्यानंतर मी त्याला कधीच त्या आवाजावरून बोललो नाही. नंतर माझीही त्या आवाजाशी मैत्री झाली. एकदा तो सहज म्हणून गेला, " जब बच्चा जन्म लेता है तो वह रोता है और सब सगे संबंधी खुषीसे हसते है! पर, बच्चा अगर अंधा हो तो बच्चा तो रोता है....मां बाप भी रोते है..." माझे डोळे पाणावले!

मला सतत वाटायचे माझा स्वतःचा लॅपटॅाप असावा. मी एकदा केतनसमोर ते व्यक्त केले, एका आठवड्यात या माझ्या मित्राने उत्तम स्थितीत असलेला लॅपटॅाप अत्यंत कमी किमतीत मला मिळवून दिला.
केतन ॲाडिओ बुक्स ऐकायचा. त्याच्याकडे अशा पुस्तकांची मोठी लायब्ररीच होती. मी कल्याण ते मालाड असा प्रवास करत असे. पुस्तक वाचण्या ऐवजी मी ॲाडिओ बुक्स ऐकावे असे ठरवले. केतनला सांगितले, तो म्हणाला आठवडाभर थांब. त्याने लॅमिंगटन रोडवर    जाऊन माझ्यासाठी एक एम पी ३ प्लेअर आणला आणि त्यात काही ॲाडिओ बुक्स टाकून दिली. त्याचे आभार कसे मानावे ते मला कळत नव्हते! 

केतनने राज्यशास्त्र विषयात एम.ए. केले होते आणि त्यात त्याला मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदकही मिळाले होते हे विशेष! आणि साइटसेव्हर्स मध्ये काम करताना तो सोशल आन्त्रप्रिनरशीपमध्ये नरसी मोन्जी कॅालेजात एम.बी.ए करत होता. क्रिकेट,साहित्य ते राजकारण अशा अनेकविध विषयांवर आमच्या गप्पा होत असत. 

आम्ही लोकलने सोबत प्रवास करत असू. तो माटुंग्याला उतरायचा. बांद्राचा नाला आला की तो लगेच म्हणायचा, “देख बांद्रा आ गया.” मी त्याला विचारले, कसे ओळखलेस तू? म्हणायचा “अरे सोपे आहे. एवढा घाण वास फक्त इथेच येतो."

माझ्या अनेक गुजराथी मित्रापैकी, गुजराथी भाषेच्या प्रभावाशिवाय स्वच्छ मराठी आणि उत्तम इंग्लिश बोलणारा हा माझा एकमेव मित्र!

आम्ही सोबत प्रवास करतांना मी त्याचा हात पकडायचो आणि त्याला सोबत घेऊन जायचो. एक दिवस मला न दुखावता तो म्हणाला असे ओढत जाऊ नकोस रे,मला चालता येते. त्याने अंध व्यक्तीला सोबत घेऊन कसे चालायचे याचे साईटेड मॅन टेक्निक समजावून सांगितले. मग मी त्याचा उजवा हात माझ्या डाव्या हाताजवळ ठेवायचो, तो माझा डावा दंड पकडायचा आणि आम्ही चालायचो, रस्त्यात खड्डा, पायरी असेल तर त्याला मी सांगयचो. 

कधी कधी आम्ही चर्चगेट जवळ असलेल्या एका हॅाटेलमध्ये जेवायला जात असू. स्टेशनला उतरल्यानंतर त्या हॅाटेलपर्यंतचा रस्ता केतन मला दाखवायचा. कधी बुफे असेल तर तिथे काय पदार्थ ठेवले आहेत हे सांगूनच त्याला वाढणे अपेक्षित असे. ‘पंगत’ ही भारतीय जेवणाची पध्दतीच सर्वसमावेशक आहे हे त्याचे ठाम मत असे. आम्ही सोबत एक दोन चित्रपटही बघितले. मला प्रश्न पडत असे की हा त्या चित्रपटांत काय बघणार? त्यावर केतनचे उत्तर असायचे, “चित्रपट बघायचा नसतो. अनुभवायचा असतो.” आम्ही कुठे मिटींगला गेलो की तो  म्हणायचा, “राजेश, मला फक्त खुर्चीला स्पर्श करून दे, मी माझा बसू शकतो.” 

आम्ही बऱ्याच वेळा परराज्यात प्रवासाला सोबत जात असू. जेंव्हा हॅाटेल मध्ये मुक्काम असायचा तेंव्हा त्याच्या रूममध्ये कुठे काय आहे ते त्याला दाखवून दिले की काम झाले. कधी कधी लाईट गेल्यानंतर माझी पंचाईत होत असे. लाईट कधी येणार याची मी अस्वस्थ होऊन वाट बघत असे. त्यावेळी केतन म्हणायचा “लाईट गेल्या नंतर तू अपंग होतोस. मला त्याचा काहीच त्रास होत नाही. हा फायदा आहे बघ अंध असण्याचा.” अशावेळी मी स्तब्ध होऊन त्याच्याकडे बघत असे. 

दर तीन महिन्यांनी त्याचा रेल्वेचा पास काढण्यासाठी मी त्याच्या सोबत जात असे. तो अंध आहे हे त्या रेल्वे क्लार्कला कळत असे पण अपंगत्व प्रमाणपत्राची प्रत द्यावी लागत असे आणि त्याची मुळ प्रतही दाखवणे गरजेचे असे. हे नसेल तर पास मिळायचा नाही. केतन म्हणायचा,” अरे प्रत नसेल तर झेरॅाक्सच्या दुकानात धक्के खात जा आणि परत या हे नेहमीचेच असते. जरा जास्त वेळ काढूनच मी ही कामे करतो." 

सहा वर्ष आम्ही सोबत काम केले आणि मी अंधत्व अनुभवले. त्यातले चढ उतार बघितले. केतन आता सेंट झेवियर्स कॅालेजात मोठ्या पदावर काम करतो. केतननी दिलेली ॲाडीओ बुक्स, लॅपटॅाप, उत्तम इंग्रजी बोलण्यासाठी केलेले मार्गदर्शन आणि त्याहीपेक्षा अत्यंत खडतर स्थितीमध्ये हसत खेळत जगण्याचा त्याचा स्वभाव यामुळे मी समृध्द झालो.          

Saturday, September 7, 2024

विचार-शुन्य अवस्था आनंद आणि दुःख

 

विचारशून्य अवस्था आणि आनंद याबद्दल विचार करताना अनेक लहान सहान घटना आठवल्या. दिवसभर न आवडणारे काम आणि त्याहूनही नआवडणारा प्रवास केल्यानंतर जर जेवणात मनापासून आवडणारा पदार्थ असेल तर मी भान हरपून जेवण करतो आणि लगेच थकवा जाऊन फ्रेश वाटायला लागतं. 


भान हरवणे म्हणजेच विचारशून्य होणे. विचारशून्य अवस्था आणि आनंद या दोन गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. मराठीतील मन हलके होणे हे वाक्य मला खुप आवडते. विचारांनी जड झालेलं मन विचारमुक्त झालं की हलकं होतं आणि आल्हाददायक वाटायला लागतं. 


 मुंबईतल्या सिमेंटच्या जंगलाचा आणि गर्दीचा कंटाळा आला की मी सिंधुदुर्गात जातो. तिथल्या निसर्गात मन कधी हरवून जातं ते कळतच नाही.मन हरवले की धावपळ,दगदग,कंटाळा हे विचार हद्दपार होतात आणि मी आनंदी होतो. 

सुंदर फुलं,पेंटींग,सुगंध यामध्ये मन रमते आणि आनंददाई होते. 


संध्याकाळी जिममध्ये जाऊन व्यायाम करतांनाही विचार दूर पळून जातात. जिममधील वजने उचलतांना ज्या वेदना होतात त्यापुढे ॲाफिसात झालेल्या अपमानाच्या शाब्दिक वेदना क्षुल्लक वाटायला लागतात आणि माझा प्रवास परत आनंदी होण्याकडे सुरू होतो. माझ्या एका मित्राला पोहायला खूप आवडते. पाण्यात उडी मारली की तो पाण्यासोबत एकरूप होतो आणि दुनिया विसरतो. भान हरपून पोहतो. 


सोमवार ही आठवड्याची सुरुवात, त्या दिवशी ॲाफिसात बरीच कामे असतात.सोमवारी संध्याकाळी माझा बासरीचा क्लास असतो.गुरूजींना नमस्कार करून फोन बंद केला आणि षड्ज लावला की पुढचा एक तास मी भान हरपून बासरी शिकतो. क्लास संपल्यानंतर मी आनंदाच्या अत्युच्च शिखरावर असतो. 


आपल्या आवडत्या गायकाचे गाणे ऐकताना आपली समाधीच लागते! म्हणजेच आपण विचारशून्य होतो. 


दुःखातून जाताना आपल्या मनाची अवस्था नेमकी  विरुध्द असते.असंख्य विचार मनात असतात.आपली जवळची व्यक्ती जग सोडून गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या आठवणींनी मन भरून जाते.डोळे भरून येतात.आपण दुःखाच्या गर्तेत लोटले जातो. कुणी टाकून बोलले,अपमान केला की त्याबद्दलचे विचार मनात चक्रीवादळासारखे घोंगावू लागतात आणि डोकं जड होतं. 


दुःखाकडून आनंदाकडे जाण्याचा मार्ग खूप सोपा आहे. मन हलकं करण्याचा मार्गही खूप सोपा आहे.भान हरवून जाईल असे काहीतरी करावे. संगीत, व्यायाम, खेळ, आवडत्या व्यक्तीचा सहवास, आपल्या आवडत्या पाळीव (कुत्रा, मांजर) प्राण्यासोबत घालवलेला वेळ, जवळच्या मित्राशी मारलेल्या मोकळ्या गप्पा, चांदण्यांनी भरलेलं आकाश, हिरवागार डोंगर किंवा अथांग समुद्र ….हे अखर्चिक उपाय किती अमूल्य आहेत, नाही का?