Wednesday, February 26, 2025

कपाळ, कुंकू, आई आणि तारा भवाळकर

प्रति, आदरणीय (डॅा.) श्रीमती तारा भवाळकर,

कुंकू आणि महिलांचे मानसिक आरोग्य, विधवा याबद्दल जे विचार आपण मांडले आहेत त्याबद्दल खरेतर मी काही लिहिणार नव्हतो. मी ते ऐकले आणि हल्लीच्या मराठीत सांगायचे झाले तर त्याला इग्नोअर मारले होते!

काल रात्री माझ्या ८५ वर्षांच्या इयत्ता ४ थी पास आई सोबत गप्पा मारताना तुमचा विषय निघाला. मी आईला कुंकवाबद्दलचे तुमचे संशोधनपर विचार सांगितले आणि आपण Ph.D डॅाक्टर, लेखिका आहात हेही सांगितले. तिची प्रतिक्रिया मला आवडली आणि ती आपल्यापर्यंत या जाहीर पत्रातून शेअर करावी असे वाटले.

आई म्हणाली, “ त्या बाईंना सांग, मी अशिक्षित आहे आणि मला हे कुणी सांगितले नव्हते की कुंकू लावले की मन आनंदित होते. तरीपण लग्न झाल्यावर मी तुझे वडील जिवंत असेपर्यंत कुंकू लावले. कपाळावरचे कुंकू हे माझ्यासाठी सौभाग्य होते. तुझ्या वडिलांवरील असलेल्या प्रेमाचे प्रतीक होते.तुझ्या वडिलांचा मुंबईत अपघात झाला व चार दिवसांनी एक पोलीस गंगाखेडला निरोप देण्यासाठी घरी आला. त्याने तुझे वडील सिरियस आहेत व तुम्ही लगेच मुंबईला या असे सांगितले तेंव्हा मनात शंका आली. आपल्या बाजूच्या भाभी दुसऱ्या धर्माच्या होत्या पण त्यांनी देवघरासमोरील करंड्यातील कुंकू एका कागदात बांधून ती पुडी मला ठेवायला दिली.माझं सौभाग्य टिकून राहण्यासाठी!पण ते गेले हे जेव्हा कळले तेंव्हा मी स्वतःच माझ्या कपाळावरचे कुंकू पुसले. कारण माझं सौभाग्य मला सोडून गेलं होत आणि आजपर्यंत मी कुंकू लावले नाही. त्यामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर काही परिणाम झाला नाही. दु:ख मात्र मनात कायम आहे. त्या भवाळकर बाईंना सांग, “प्रत्येक गोष्टीची नको ती चिकित्सा करायची नसते. भावना भावनेच्या ठिकाणी योग्य असतात. "

हे ऐकल्यावर मी स्तब्ध झालो. पण तुम्हाला परत काहीतरी सांगावेसे वाटले. हे पत्र लिहिण्याआधी मी तुमच्याबद्दल थोडे वाचले. आपण संशोधन केले आहे आणि आपल्या काही विद्यार्थ्यांना Ph.D देखील प्राप्त झाली आहे. मी स्वतः एक संशोधक आहे. University of London येथे M.Sc. केले आहे आणि प्रसिध्द जर्नल्समध्ये माझे शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. हे सांगण्याचे कारण असे की कोणत्याही संशोधनाबद्दल माहिती देताना त्याचा शास्त्रीय संदर्भ अभ्यासावा लागतो व मगच त्यावर चर्चा केली जाते. आपण अ.भा. साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठावरून जे काही सांगितले आहे त्याचा शास्त्रीय संदर्भ आपल्याला माहिती होता का? जर रस्त्यावर जाता येता आपण काही ऐकले असेल तर कोणत्याही शास्रीय संदर्भाशिवाय आपण मनात येईल ते बोलणे योग्य आहे का?

ग्रामीण भागातील अशिक्षित महिलांना असे संशोधन सांगितले तर त्या ते ऐकणार नाहीत आणि शहरी सुशिक्षित स्री त्यावर विश्वास ठेवणार नाही. तसे झाले असते तर कदाचित नवरात्रात नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या टिकल्या कपाळावर दिसल्या नसत्या.

आपण जे काही व्यक्त केले त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील प्रथा परंपरांचे पालन करणाऱ्या असंख्य स्त्रियांचा अपमान केला आहे.प्रथा परंपरा या भावभावनांशी संबंधित असतात. त्यांची अनावश्यक चिकित्सा करायची नसते हा सदसदविवेक तुमच्यासारख्या लेखिकेला असू नये याचे वैषम्य वाटते.

हिंदू धर्म व त्याच्या प्रथा/ रुढी हे दोन्हीही सनातन आहेत. (सनातनचा मूळ अर्थ जे चांगलं आहे ते टिकवणं, वाईट ते सोडून देणं व नवीन स्वीकारणं- थोडक्यात परिवर्तनशीलता . सनातनचा सध्याचा अर्थ वेगळा आहे!)

त्यामुळे टिकली न लावण्याची प्रथा पाळणाऱ्या किंवा टिकली/ कुंकू लावणाऱ्या दोन्ही महिला हिंदू धर्मातच आढळतात. विधवा-टिकली हे विषय मागे टाकून हिंदू समाज पुढे गेलाय हे तुम्हाला अजून उमजलेले नाही. तुम्ही अजून ५० वर्षांपूर्वीचाच विचार धरून बसला आहात.

हे मी माझे व्यक्त केलेले विचार आहेत. आपण दुखावल्या गेला असाल तर क्षमस्व.

-राजेश कापसे, ९८१९९१५०७०

Monday, February 24, 2025

80% फुल!

परवा माझा फोन चार्जिंग करायला ठेवला होता. बॅटरीचा रंग हिरवा झाला आणि ८०% फुल.बॅटरी चार्ज झाली आहे.तुम्ही फोन वापरू शकता, अशी सुचना फोनवर दिसली. बॅटरी पुर्णपणे चार्ज होण्यासाठी ८०% पुरेसे होते. १००% चार्ज होण्याची गरज नव्हती!

माझे विचार चक्र सुरू झाले…

सकाळी ध्यान करत असताना, Headspace या मोबाईल ॲप वर ८०% फुल-Hara hachi bun me (腹八分目) ही जपानी संकल्पना ऐकली. त्याचा अर्थ असा की पोट ८०% भरेल एवढे अन्न खायला हवे. २०% भाग रिकामाच ठेवायला हवा. असे केल्यास आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. चायनीज वैद्यकीय तज्ञ म्हणतात "Chīfàn qī fēn bǎo, sān fēn han" (吃飯七分飽、三分寒) जेवण पोटाचे सात भाग भरतील एवढेच करा, एक भाग रिकामा ठेवा. अरब देशांमध्ये सुर्फैत (Surfeit) (अती खाणे) टाळावे असा सल्ला दिला जातो. आपल्याकडेही आपण स-अवकाश (सावकाश) जेवा असे म्हणतो. आम्हालाआयुर्वेद शिकवत असताना डॅा. नियती बडे चितालीया सदैव सांगत, “तुमच्या आमाशयाचे तीन भाग आहेत. एक भाग जेवण, एक भाग पाणी आणि एक भाग वायूसाठी रिकामा ठेवला तर ते आरोग्यदायी असते.”

सहज विचार केला, स-अवकाश.. ८०% पूर्ण २०% रिकामे हे जसे शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर असते तसेच ते मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही नक्कीच उपयोगी ठरू शकेल!

नवीन वर्ष सुरू झाले की मी ठरवायचो दररोज व्यायाम करायचा. मग मोबाईल ॲपवर दिवसागणिक कळायचे की किती दिवस व्यायाम केला किंवा चालायला गेलो. २५-३० दिवस झाले की काही तरी कारण, आजारपण, घरची अडचण इत्यादीमुळे त्यात खंड पडायचा. मग विचार येत असे , “नाही जमणार आपल्याला.” मग हा व्यायामाचा विषय कायमचा बंद होत असे आणि त्याहूनही मोठा परिणाम होता “मला हे नाही जमणार,मी असाच आरंभशूर आहे असे अनेक विचार मनात येत व स्वतःला आरोपी ठरवले जायचे. पण त्या ऐवजी जर २०% वेळा व्यायाम करायला जमणार नाही, ८०% वेळा जमले तरी हरकत नाही हे ठरवले असते तर कदाचित ही चांगली सवय कायमची बंद झाली नसती.

सगळे काही काटेकोरपणे झाले पाहिजे असा अट्टाहास करणारी माणसं आणि त्यांचा त्रागा बघितला की खुप वाईट वाटतं. घरातील स्वच्छता, वस्तू जागच्या जागी असणे, बेडवर बेडशीट १००% नीटनेटकी असलीच पाहिजे ह्या टोकाच्या आग्रहामुळे अनेकदा मानसिक स्वास्थ्य बिघडते. असा दुराग्रह करणारी काटेकोर व्यक्ती आणि तो सहन करणारी व्यक्ती असे दोघेही यामुळे अस्वस्थ होतात. त्या ऐवजी ८०% नीटनेटके असेल तर २०% अव्यवस्थितपणा स्वीकारायला काय हरकत आहे? त्यामुळे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते व सुधारणा शक्य होते. रॅाकेट सायन्समध्ये किंवा एखाद्या हृदयाच्या सर्जरीमध्ये सगळे काही १००% परिपूर्णच असायला हवे पण दररोजच्या सहज साध्या गोष्टींमध्ये २०% चूका असतील तर त्यांचा स्वीकार करून सुधारणेसाठी अवकाश ठेवायला हरकत नसावी. त्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहील असे वाटते.

-राजेश कापसे, ९८१९९१५०७०