Thursday, October 9, 2025

कल्याण ते दादर: असेही एक सिमोल्लंघन!

आम्ही आज शिवाजी पार्क दादर येथे स्वत:चे घर घेतले. मागे वळून बघताना बरेच काही आठवते.

२००७ मध्ये मला मुंबईत नोकरी मिळाली. मग घर कुठे करायचे याच्यावर बरीच चर्चा झाली. दादर,घाटकोपर,मुलूंड,ठाणे,डोंबिवली उतरत्या क्रमाने सगळीच ठिकाणं महाग न परवडणारी म्हणून कल्याण त्यातल्या त्यात बरे म्हणून नक्की केले. पुढची पाच वर्षे कल्याणहून दादर १ तास व तिथून मालाड ४५ मि. व तसाच परतीचा प्रवास दररोज किमान चार तास लागणार.अनेकवेळा वाटले की दादरला शिफ्ट व्हावं.पण मनाची तयारी व्हायची नाही. महाग असेल,परवडणार नाही शाळांचा खर्च परवडेल का? असे प्रश्न.कल्याणहून एकवेळ अमेरिकेत शिफ्ट होणे सोपे असेल पण माझ्या मराठी मनाची दादरला जाण्याची हिम्मत होत नसे.

माझे त्यावेळचे बाॅस आणि त्याहीपेक्षा मित्र श्रीनिवास सावंत हे २०१० ते २०१२ सातत्याने मला कल्याणहून दादरला शिफ्ट होण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. मला असं वाटत की त्यांनी उपनगरात राहणाऱ्या मराठी माणसांनी दादरमध्ये रहायला यावे यासाठी सतत प्रयत्न करण्याचा पण केला आहे. शेवटी २०१२ मध्ये मी दादरला राहण्यास यायचे ठरवले. दोन वर्ष लागली मनाची तयारी करायला!

माझ्यासोबत काम करणारी पूजा म्हणाली, "अरे किंग जाॅर्ज शाळेत तुझ्या मुलाच्या प्रवेशासाठी अर्ज तर कर. मिळेल ॲडमिशन". मी अर्ज केला आणि साधारणत: एक महिन्याने मला शाळेतून फोन आला. प्रवेशासाठी तुमच्या मुलास कागदपत्रांसह घेवून या!" अजून दादरमध्ये घर घ्यायचे होते. पण अर्णवला शाळेत घेऊन गेलो. शाळेत त्याला प्रवेश मिळाला पण दादरमध्ये घर असेल तरच असे सांगण्यात आले. तो थोडाच कल्याण ते दादर प्रवास करणार होता!

मग घराची शोधाशोध सुरू झाली. डाॅ. अनंत पंढरे सरांना फोन केला. मी त्यांना संकटमोचक म्हणतो. आजपर्यंतच्या माझ्या यशाचे ते शिल्पकार आहेत. त्यांनी परांजपे काकांचा फोन दिला आणि मग श्री. प्रमोद जोशींची ओळख झाली. त्यांना परदेशात मुलाकडे रहायला जायचे होते व त्यांचे दादरचे घर भाड्याने द्यायचे होते. त्यांनी मला ओळखत असलेल्या दोन व्यक्तींचा फोन द्यायला सांगितला. मी म्हणालो विद्यार्थी परिषदचं मी काम केलं आहे. त्यांनी विनयजी सहस्त्रबुद्धे यांना फोन केला. मग म्हणाले 'विनयजींनी सांगितलं आहे नि:शंकपणे राजेशला घर द्या. तो परिषदेचा कार्यकर्ता आहे." घराची व्यवस्था झाली. प्रमोदकाकांनी मला मागचे पाच वर्षे त्यांच्या मुलासारखे प्रेम केलंय. मग केले नक्की आणि दादरला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.

माझी पत्नी प्रज्ञाने मला पुर्ण साथ दिली आणि आम्ही कल्याणहून दादरला आलो. डाॅ. नियती चितालीया मॅडमनी आम्हाला दादरमध्ये स्थिरावण्यासाठी मदत केली. त्यांच्या मदतीशिवाय इथे स्थिरावणे शक्यच नव्हते.

या प्रवासात मदत केलेल्या सर्वांचे आभार, या सर्वांच्या आशीर्वादामुळेच हे सिमोल्लंघन शक्य झाले.

-राजेश कापसे, 9819915070

deepakniramay@gmail.com

Saturday, October 4, 2025

शेवटचे दिवस


शेवटचे दिवस नेहमीच अवघड ठरतात.

जन्म देऊन, काळजाचा ठाव काढून वाढवलेली लेकरं,

आनंदाने ओतप्रोत खर्चून केलेली लग्नं,

घरातली गजबज, हशा, आरास…

पण आयुष्याच्या संध्याकाळी

ते सारेच कसे दुरावून जातात!

घरात उरतो केवळ एक शांतपणा—

भिंतींवर घुमणाऱ्या आठवणींचा,

आणि सोबतीला असते एक अनोळखी कामवाली.

तिलाही जगण्यासाठी पर्याय नसतो,

म्हणून तीच ठरते खरी सोबतीण

त्या अखेरच्या क्षणांची.

शेवटचे दिवस सरले की मात्र,

पुन्हा उमटतात ओळखीचे चेहरे.

आठवणींनी भारलेली लेकरं,

दुःखाच्या सावल्या पुसायला धावणारे नातेवाईक,

आणि मग घरभर पसरेल

गोडजेवणाचा सुगंध—

जणू मृत्यूही झाला असेल

फक्त एक सोहळा.

-राजेश कापसे 

Saturday, June 7, 2025

माप!

आज सकाळी काही जुने भांड्यांचे डबे उघडले आणि त्यात हे “माप” सापडले. गंगाखेडच्या कितीतरी आठवणी जाग्या झाल्या. दरवर्षी ज्वारी, गहू दुष्काळात मिलो मोजून घेताना आई हे माप वापरायची. आठ मापं म्हणजे पाच किलो! गेले ते दिवस.काळागणीक अनेक गोष्टी बदलतात. हे मापही बदलले आहे.

-राजेश कापसे, 9819915070

deepakniramay@gmail.com

Tuesday, May 27, 2025

संन्यस्त साधू आणि त्यांचे आई बाबा !

साधारणतः एक वर्षापूर्वी माझी ओळख एका संन्यासी स्वामींबरोबर झाली. माझ्या एका डॉक्टर मित्राने मला फोन केला आणि सांगितले,”अरे माझा M.B.B.S चा एक मित्र स्वामी योगी अनंत (नाव बदलले आहे) तुझ्या हॉस्पिटलजवळच एका आश्रमात राहतो आणि तिथे त्याला मोफत नेत्र शिबीर घ्यायचे आहे. अनेक मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांना त्याचा फायदा होईल. त्यांना भेट नक्की.” मला जरा आश्चर्यच वाटले. कारण M.B.B.S चा क्लासमेट, संन्यासी हे जरा माझ्यासाठी अजबच होते. मी लगेच गाडी काढली आणि त्यांच्या आश्रमाकडे निघालो. त्या आश्रमामध्ये स्वामींची ओळख झाली. त्यांनी माझे खूप प्रेमाने आणि विनम्रपणे स्वागत केले, “नमो नारायण डॉ राजेश! तुमचे स्वागत आहे.” त्यांनी त्या आश्रमात एक आरोग्य केंद्र सुरु केले होते आणि जवळपासच्या ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांमध्ये ते आरोग्य सेवा देण्याचे काम करत होते. 

   “M.B.B.S झाल्यानंतर का संन्यास घेतला असेल?” हा प्रश्न माझ्या मनात आहे हे त्यांनी माझ्या चेहऱ्यावरील हावभावांवरून ओळखले. अनेक जण M.B.B.S करून पुढे M.D, D.M असे बरेच शिक्षण घेऊन श्रीमंत होण्याची स्वप्न बघतात. अकरावी, बारावीमध्ये तर दिवस रात्र एक करून अभ्यास करून सर्वोत्तम मार्क मिळाले तरच M.B.B.S साठी प्रवेश मिळतो. काही पालक तर करोडो रुपये देऊन या अभ्यासक्रमाला आपल्या मुलांना प्रवेश मिळवून देतात. M.B.B.S साठी काहीपण अशी मानसिकता असणारे अनेक पालक आणि विदयार्थी मी बघितले आहेत. किंबहुना मी सुद्धा त्यापैकीच एक होतो आणि या माणसाने नामवंत अशा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून M.B.B.S चे शिक्षण अत्यंत चांगल्या मार्काने पूर्ण करून चक्क संन्यास घेतला! स्वामीजी मला म्हणाले, “राजेश, हे बघ ही ईश्वरी इच्छा होती. तुम्ही लोक संसार करून समाजासाठी मोठे योगदान देता. मी संन्यस्त राहून वैद्यकीय सेवा देतो. प्रत्येकाचा मार्ग आणि त्यातून मिळणार आनंद वेगळा.” मी त्यांना भेटून भारावून गेलो. मग आम्ही त्यांच्या आश्रमात मोफत नेत्र शिबिरे घ्यायला सुरुवात केली. अनेक रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आमच्या आय हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या. स्वामीजी स्वतः त्या रुग्णांसोबत हॉस्पिटलमध्ये येत असत. आमची खूप चांगली ओळख झाली. 

   एक दिवस मला स्वामीजींचा फोन आला. म्हणाले, “राजेश, तुझ्या हॉस्पिटलमध्ये श्री व सौ राणे (नाव बदलले आहे) येतील. ते साधारणतः ८५ आणि ८० वर्षांचे आहेत आणि त्यांना डोळ्यांची तपासणी करायची आहे. त्यांची योग्य ती काळजी घे. ते डायबेटिक आहेत. त्यामुळे जरा वेळेत उपचार होतील असे बघ.” मी त्या दोघांना हॉस्पिटलच्या स्वागत कक्षात भेटलो आणि त्यांची तपासणी व उपचार लवकर होतील याची व्यवस्था केली. त्या काकांना बघितल्यानंतर मला स्वामीजी आणि त्यांच्यामध्ये खूप साम्य जाणवले. मी विचार करत होतो, “हे स्वामीजींचे आई वडील तर नसतील?” त्याची तपासणी झाल्यानंतर त्यांना सोडण्यासाठी मी त्यांच्या कारपर्यंत गेलो. माझ्या मनात जे चालले होते, ते न राहवून मी व्यक्त केले, “काका, स्वामीजी तुमच्यासारखे दिसतात.” ते म्हणाले, “हो, ते माझे चिरंजीव होते. ते आता संन्यासी आहेत.” हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते. दुसरे कुणी असते तर दु:खी कष्टी दिसले असते पण मुलाने M.B.B.S झाल्यानंतर घेतलेला संन्यास त्यांनी सहजपणे आनंदाने स्वीकारला होता. आपल्या अपेक्षांचे ओझे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मुलांवर ठेवणारे पालक आणि एकुलत्या एक मुलाने M.B.B.S झाल्यानंतर घेतलेला संन्यास सहज स्वीकारणारे हे पालक बघून आश्चर्य आणि आदर या संमिश्र भावनांनी मी त्यांना निरोप दिला.

-राजेश कापसे, 9819915070

deepakniramay@gmail.com

Friday, May 23, 2025

चढा आणि उतरलेला तबला

परवा बासरीचा क्लास संपल्यानंतर गुरूजी तबला उतरवून ठेवत होते. मी सहज विचारले, “सर, उद्या परत लागणार आहे तबला. उतरवून का ठेवताय?” म्हणाले, “अरे उन्हाळ्यात त्याचा स्वर खूप चढतो. म्हणून उतरवावा लागतो. नाहीतर उद्या नीट स्वर लागणार नाही. हिवाळ्यात याच्या उलट असते. तो खूप उतरतो. मग त्याचा स्वर चढवून ठेवावा लागतो.” मी विचार केला, "आपल्या मनाच्या अवस्थाही तबल्यासारख्याच असतात नाही का ? कधी सूर चढलेला तर कधी खूप उतरलेला ! ते स्वीकारून योग्य सूर लागण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. उतरलेल्या सूराला जरा वर चढवावे लागते तर चढलेले सूर उतरवावे लागतात तरच षड्ज चांगला लागतो !"

-राजेश कापसे, 9819915070

deepakniramay@gmail.com

Saturday, April 5, 2025

परिसस्पर्श!

काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि आपलं आयुष्यच बदलून जातं. २००५ मध्ये मी संभाजीनगरच्या (औरंगाबाद) सार्वजनिक वाचनालयात काही पुस्तकं शोधत होतो आणि पुर्णिया हाती लागलं आणि दिवसभरात ते मी वाचून संपवलं. मला त्यातली सहज सरळ लिखाणाची शैली इतकी आवडली की त्यानंतर महिन्याभरात डॅा. अनिल अवचटांची त्या वाचनालयातील सगळी पुस्तकं वाचून काढली. आणि पुण्यात जावून त्यांना एकदा भेटायचं ठरवलं.

एवढा मोठा माणूस मला भेटेल का? किती वेळ देईल? जरा मनात भीती होतीच. त्यांचा फोन नंबर  शोधायला सुरुवात केली.माझ्या विद्यार्थी परिषदेतील मित्र रत्नाकर पाटील यांनी त्यांचा नंबर मला दिला. फोन केला तो त्यांनीच उचलला.काय बोलावे सुचेना, मी म्हणालो तुम्हाला भेटायचे आहे. त्यांनी सांगितलं, “अरे मी आज जरा व्यस्त आहे, तू उद्या सकाळी ये ८ वाजता.” घराचा पत्ता दिला. माझं जवळचं कुणीतरी माझ्याशी बोलत आहे असं वाटलं. काही माणसांशी आपण क्षणात जोडले जातो.

भेटल्यानंतर ते म्हणाले, “ मला तू  ए बाबा म्हण!” मला संकोचाने एवढ्या मोठ्या व्यक्तीला अरेतुरे कसे म्हणायचे ते कळेना.त्यांनी दहा वेळा तसं म्हणवून घेतलं आणि मी त्यांचा जवळचा मुलगा झालो कायमचा! माझे वडील मी लहान असतांनाच वारले. अनेक वर्षांनी बाबा मिळाला. मग आम्ही खूप गप्पा मारल्या.त्यांनी बासरी वाजवली. मी ही बासरी शिकायचो. मी भुप वाजवायचा प्रयत्न केला. न कंटाळता त्यांनी तो ऐकला आणि म्हणाला, ‘एक सुर वाजवल्यानंतर त्यातूनच सहज दुसरा सुर लागला पाहिजे,अगदी अलगद.बघ प्रयत्न कर !’ मी त्या भेटीत खुप काही शिकलो.त्यांना संभाजीनगरला (औरंगाबादला) आलात की नक्की या म्हणालो. त्यांनी ओरिगामीने तयार केलेला मोर मला दिला. ते संभाजीनगरला (औरंगाबादला) एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर अनेकजण त्यांच्या बरोबर होते. मी त्यांना 'बाबा मी राजेश 'असं म्हणालो. त्यांनी जवळ घेतलं. हा माझा मुलगा राजेश !अशी ओळख करून दिली.’ ते रूग्णालय बघायला आले. सगळ्यांशी गप्पा झाल्या.माझ्या घरीही आले. एवढा मोठा माणूस पण कुठलाही अहंभाव नाही.

हेडगेवार रूग्णालयाच्या वतीने मी त्सुनामी मदत कार्यासाठी अंदमानला जातोय असे त्यांना सांगितले. लगेच त्यांनी मला त्याच्या ओळखीच्या आय.पी.एस. अधिकाऱ्याचा नंबर दिला.मी तिथे येतोय, त्याला काही मदत लागली तर नक्की करा असेही सांगितले. मी अंदमानला गेल्यानंतर त्या पोलिस अधिक्षक मॅडम मला घ्यायला आल्या!

काही वर्षांनंतर मी माझी नोकरी सोडायचा निर्णय घेतला आणि मुंबईत जायचे ठरवले. मला मुंबईत काम काही जमत नव्हते. मी खूप निराश झालो. डिपरेशनमध्ये गेलो. बाबाला फोन केला. त्याने मला पुण्याला बोलावले.मला त्याच्या गाडीत स्वत: ड्राईव्ह करत एका जवळच्याच डोंगरावर घेऊन गेला. भरपूर गप्पा मारल्या. डॉ.आनंद नाडकर्णींचा मला नंबर दिला. त्यांना फोन करून माझी काळजी घ्यायला सांगितले. म्हणाला, “ डॅा. आनंदला भेट, आनंदी होशील.” मी बरा झालो.मग प्रमोशन झालं. परदेशात गेलो. माझ्या करिअरमध्ये खुप प्रगती केली.

एकदा माझ्या जवळच्याच मित्राने मला फसविले. मी खूप अस्वस्थ होतो. बाबाला फोन केला. त्याने एक सुंदर दोहा सांगितला, “जावे सो मेरा नहीं मेरा सो जावे नही”.

मागच्या १७ वर्षांत अनेकवेळा अनेक चढउतारांमध्ये बाबाकडे गेलो. त्याला भेटलं की एक नवीन उत्साह, नवीन एनर्जी मिळायची.

कांही वर्षां पूर्वी मी बाबाला फोन केला होता. त्याचा आवाज खूपच थकलेला जाणवला. मी म्हणालो, “बाबा, मी राग भैरव शिकलो आहे, वाजवू का?” ‘जागो मोहन प्यारे 'ही बंदिश मी वाजवली. तो म्हणाला, “वा ! वा! छान वाजवलीस. मला नक्की पाठव.”

     दोन दिवसांनी कळले की, बाबा गेला.काही माणसं ही परिसासारखी असतात. त्यांच्या स्पर्शाने सोनं होतं. माझ्यासारख्या असंख्य मुलांची आयुष्य बाबानी घडवली. Baba We miss you!

-राजेश कापसे, 9819915070

deepakniramay@gmail.com

Saturday, March 22, 2025

माझे ओपन हाऊस !

माझ्या मुलाची (ओजसची) युनिट टेस्ट संपल्यावर ओपन हाऊससाठी शाळेची ई मेल आली. मी रजा टाकली आणि आम्ही ओपन हाऊससाठी शाळेत गेलो. जरा लवकरच पोचलो. कारण गर्दी झाली असती. सगळ्यात आधी त्याच्या वर्गात गेलो. मग त्याच्या क्लास टीचरने त्याचे सर्व पेपर काढून दिले. आम्ही  प्रत्येक विषयाचे पेपर बघितले आणि त्यात काय चुकले ते समजून घेतले. मार्क चांगले मिळाले होते.मी ओजसचे अभिनंदन केले आणि “अजून चांगला अभ्यास कर!” असा सल्ला दिला. मग आम्ही क्लास टीचरना भेटलो आणि नेहमीप्रमाणे “कसा काय नीट अभ्यास करतो ना हा? वर्गात नीट वागतो ना?” असे प्रश्न विचारले. त्या म्हणाल्या, “ तो हुशार आहे, व्यवस्थित लक्ष देतो, प्रश्न विचारतो.गुणी आहे मुलगा. जरा बडबड जास्त करतो पण ठीक आहे. सिली मिस्टेक टाळायला हव्यात.हस्ताक्षर चांगले करायला पाहिजे.”  सही करून आम्ही त्याच्या वर्गातून बाहेर पडलो. मग तो मला त्याच्या विविध विषयांच्या शिक्षकांना भेटायला घेऊन गेला. सर्वांनी त्याचे कौतुक केले. मला त्याची प्रगती पाहून अभिमान वाटला. बाबाला सर्वांनी चांगले सांगितले होते त्यामुळे आमचे चिरंजीव आनंदात होते. मग आम्ही कॅंटीनमध्ये नाश्ता केला आणि निघालो.

घरी आल्यावर मनात विचार आला, “प्रत्येक तीन महिन्यांनी माझेही असेच ओपन हाऊस झाले तर?” मग मी कल्पना विश्वात रमून गेलो. “कसे असेल माझे ओपन हाऊस?” माझ्या हॅास्पिटलचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, माझे बासरीचे गुरूजी, माझ्या पुस्तकाचे प्रकाशक, माझे आर्थिक सल्लागार वसंत कुळकर्णी, माझे कार्डिओलॅाजिस्ट, हे सगळे माझे तीन महिन्यांचे स्कोअर कार्ड घेऊन बसलेले असतील. आता आई थकली आहे.अण्णा कधीचेच हे जग सोडून गेले.त्यांच्यापैकी कोणी येणार नाही ओपन हाऊससाठी! मीच असेन, माझे यश अपयशाचे स्कोअर कार्ड तपासायला! आपण मोठे होतो, पायावर उभे राहतो.आई-वडील थकलेले असतात किंवा दोघांपैकी एक किंवा दोघेही नसतात.कधी पालक जिवंत असतानाही आपण आपल्याला पोरके करून टाकतो! काय हरकत आहे आपले विचार त्यांच्या बरोबर शेअर करायला? जसा मला अभिमान वाटला,आनंद झाला तसेच त्यांनाही वाटेल नक्कीच! जरा या विचाराने डोळे पाणावले. मग विचार चक्र सुरू झाले.

माझे बोर्ड ॲाफ डिरेक्टर्स नंबर्स आणि नफा यांच्या मी तयार केलेल्या प्रेझेंटेशनवर मला तासतील.डेफिसीट कमी करण्यासाठी, बिझनेस वाढविण्यासाठी स्टॅटर्जीज सांगतील.मग ओपन हाऊस (त्रैमासिक मिटींग) संपेल.त्यातले तसे काही डिरेक्टर म्हणतील, “राजेश, you are doing good but you know you need to work hard to achieve more numbers!!” काहीजण जरा त्रागा व्यक्त करतील. मग लंच करून ओपन हाऊस संपेल.८०% टार्गेट पूर्ण केल्यामुळे “सा** नोकरी नाही जाणार.” हे समाधान आणि पुढच्या तीन महिन्यांचे टार्गेटचे ओझे घेवून मी बाहेर येईन..

मग बासरीचे ठाकूर गुरूजी म्हणतील, “राजेश तिसऱ्या परीक्षेचे सात राग चांगले तयार झाले आहेत. पण भैरवी नीट नाही झाली.जरा कोमल रिषभ चढा लागतो.बासरीची फुंक अजून मजबूत व्हायला हवी.प्रत्येक स्वर चांगलाच वाजायला हवा. पण खूप सुधारणा आहे.कौतुक आहे हो तुमचं.युनिट हेड म्हणून काम करूनही खूप वेळ काढून बासरी शिकताय तुम्ही! तुमचा वृंदावनी सारंग मस्त जमला आहे!”

आर्थिक सल्लागार कुळकर्णी म्हणतील, “राजेश तुमचा पोर्टफोलीओ बरा आहे पण अजून गुंतवणूक वाढवायला हवी.तुम्हाला पेन्शन नाही.मुले मोठी होत आहेत,त्यांच्या शिक्षणाची सोय करायला हवी पण ठीक आहे एकूण १२% रिटर्न मिळतो आहे. छान!”

मग रक्त, ईसिजी, स्ट्रेस टेस्ट, 2D Echo, वजन असे रिपोर्ट बघून कार्डिओलॅाजीस्ट म्हणतील,” कोलेस्टेरॅाल जरा वाढले आहे राजेश. ब्लड प्रेशर ठीक आहे.बाकी रिपोर्ट नीट आहेत पण वजन वाढले आहे खूप.जरा डायट करा.खूप स्ट्रेस घेताय तुम्ही.रात्री झोप लागायला हवी.गोळ्या चुकवू नका. जरा मीठ कमी करा.व्यायामासाठी वेळ काढा.मेडिटेशन करा.” मग ते प्रिस्क्रिप्शन देतील आणि मी रिलॅक्स होऊन बाहेर पडेन.

संध्याकाळची 6.37 ची वडाळा लोकल पकडून वडाळ्याला माझ्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशकाकडे जाईन. ते म्हणतील, “राजेश, पुस्तक बरं झालं आहे पण काही ठिकाणी भरकटले आहे.जरा काही भाग काढून टाकला पाहिजे. मग ते १६०-१७० पानांचे झाले की वाचनीय होईल. तुमचे लिखाण वाचून छान वाटले.तीन महिन्यांनी प्रकाशित करू आपण!” मी एकदम आनंदाने तिथून बाहेर पडून स्कूटर स्टार्ट करून मग दादरला घरी येईन. ओपन हाऊस तसे बरे झालेले. त्यामुळे मग आम्ही सगळे जेवायला बाहेर जाऊ.शिवाजी पार्कला फिरताना बायकोबरोबर दिवसभराच्या गप्पा होतील.घराचा ई एम आय,शिल्लक कर्ज, मालवणच्या घराचे काम,मोठ्या मुलाची CET, त्याचा अभ्यास,पुढच्या तीन महिन्यातील आमच्या दोघांचे कामामुळे होणारे प्रवास,घराचे नियोजन म्हणता म्हणता रात्रीचे अकरा कधी वाजतील ते कळणार नाही. ओपन हाऊस संपताना मनात विचार असतील, “पुढच्या तिमाहीत मला किती नंबर्स करायचे आहेत, किती नफा व्हायला हवा नाहीतर पुढची बोर्ड मिटींग अवघड असेल, वजन कमी करण्यासाठी परत दिक्षीत डायट करायला पाहिजे बॅास, नाहीतर परत कार्डिओलॅाजिस्ट ओरडतील.बासरीच्या परीक्षेतील थेअरी राहिली आहे, झपताल अजून लक्षात रहात नाही,बायको म्हणेल, “अरे सकाळी ७.१० ची लोकल पकडायची आहे ना? नाहीतर लेट मार्क होईल. बस झाले विचार करणे, झोप आता.”

मग सकाळची ७.१० ची लोकल, हॅास्पिटल,नंबर्स, पेशंट, बासरी क्लास पुढच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळण्यासाठी प्रयत्न.पुढच्या ओपन हाऊस ची तयारी.असो "ये जीवन है, इस जीवनका यही है रंगरूप..."

-राजेश कापसे, 9819915070

deepakniramay@gmail.com